Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Tuesday 30 December 2014

कर्मकांड

आज 'राजकुमार हिरानीचा' pk release होऊन दहा दिवस उलटून गेले आहेत आणि जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे धार्मिक संघटनांचे जत्थे त्याविरोधात लाठ्या काठ्या आणि जाळपोळीच साहित्य घेऊन नरसिंहाच्या अवतारात रस्त्यांवर उतरले आहेत.

आता यात राजकारणाचा भाग किती हा भाग अलाहिदा पण आपल्या लोकांची मनोवृत्ती किती अपरिपक्व आणि कुपमंडूक वृत्तीची आहे याच प्रत्यंतर येत. तस पाह्यला गेल तर चित्रपटात आक्षेपार्ह म्हणाव अस काहीच नाही, पण लोक कर्मकांडालाच धर्म समजु लागली आहेत त्यात त्यांचा तरी काय दोष. हजारो वर्षांपूर्वी जी   स्थिती  हिंदू धर्मात निर्माण झाली होती त्याच मुळ हेच होत. त्यावेळी गौतम बुद्धांनी याच कर्म कांडाविरोधात आवाज उठवला होता अगदी निशस्त्र होऊन आणि आज बुद्ध धर्म जगात दुसरया क्रमांकाचा धर्म आहे.पण यात सुद्धा एक गोम आहे, अहिंसेचा संदेश देणारा बौद्ध धर्माचा अंगिकार केलेला चीनसारखा मोठा देश जेव्हा आपली ताकत आजमावू पाहतो, आपल्याच शांतीप्रिय शेजारयावर कुरखोडी करून अशांतता पसरवतो तेव्हा तो आपला मूळ धर्म विसरून कर्मकांडालाच महत्व देत नाही का?

तशीच स्थिती आज भारतीय राजकीय जीवनात निर्माण झाली आहे. कर्मकांड सगळीकडेच फोफावलं आहे शिक्षण, सहकार,साहित्य, क्रिडा आणि समाज सगळीकडेच… जिथे-जिथे मूळ हेतूला तिलांजली देऊन निव्वळ औपचारिकता बळावते तिथे कर्मकांड वाढणारच. आज भारतात फार मोठया प्रमाणावर पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात पण राजरोसपणे आणि अवास्तव रित्या वाढणारया फि विरोधात कोणी आवाज उठवत नाही हे कर्मकांड. सहकारात राजकारण, भले सामान्य गरीब जनतेला आणि सहकाराच्या मूळ तत्वाला ते धरून का नसेना हे कर्मकांड. साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला साहित्यिक कमी आणि गावगन्ना पुढारी जास्त हे कर्मकांड. क्रिडा संघटनांच्या सर्वोच्चपदी राजकारणी हा अलिखित नियम भले त्याचा खेळाशी बाप जन्मी संबंध का आला नसेना हे कर्मकांड. आणि सर्वात महत्वाच सार्वजनिक निवडणुकात राजकीय वारसा आणि घरातुन आलेल्या उमेदवारालाच निवडून देणे भले तो लायक का नसेना  हे कर्मकांड...

आवाज उठवायाचाय तर ह्या विरोधात उठवा. pk चित्रपटातील धार्मिक मुद्दा हा फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, आपल्या देशात तर कर्मकांड सगळीकडेच आहे आणि दुर्दैव हे कि तोच आपला सध्याचा धर्म आहे.
आज आपल्याला या कर्मकांडा विरोधातच आवाज उठवायचा आहे, कारण जे लोक कर्म कांडालाच महत्व देतात ते मानसिक दृष्ट्या दुबळे आणि गुलाम होतात. आणि अशा गुलामी मनोवृत्तीच्या लोकांवर परकीय शक्तींना राज्य करण नेहमीच सोप जात जे याआधी इंग्रजांनी सिद्ध केल आहे. आणि आज अप्रत्यक्षपणे अमेरिका आपल्या social service द्वारे आणि चीन बाजारपेठांवर वर्चस्व गाजवून हे सिद्ध करत आहे. तेव्हा आपण वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

सरतेशेवटी या विचाराला पुरक असा स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील एक प्रसंग फार बोलका आहे.
स्वामी विवेकानंदांना मांसाहार खाण्यातच नाही तर मांसाहारी अन्न बनवण्यात हि आवड आणि रुची होती. तेव्हा रामकृष्ण परमहंसांच्या काही शिष्यांनी त्यांच्यापाशी नरेंद्रच्या या रुची विषयी चाहाडी केली. रामकृष्ण आपला प्रिय शिष्य नरेंद्र कोण आणि कसा आहे हे चांगलेच जाणून होते. तेव्हा ते शांतपणे आपल्या शिष्यांना एव्हडढेच म्हणाले 'मी गाईला कधी खोटे बोलताना पाहिले नाही, पण गाय ती गायच राहते...

(प्रिय वाचक तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबीयांना नववर्षाच्या हार्दिक - हार्दिक शुभेच्छा. या नववर्षात तुम्ही आपल्या देव, देश आणि धर्माबद्दल जागरूकपणे विचार करावा अशी सदिच्छा...अस्तु )    

Saturday 13 December 2014

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेले सुखद अनुभव रुंजी घालत होते… बारा तास अडून राहिलेले messages धडा धड टिक टिक  करत अक्षरश:  कोसळत होते. एक एका group वर पंधरा ते वीस pending messages highlight होत  होते.

बहुदा असे message काय असेल अशी उत्सुकता निर्माण करतात, मी हि उत्सुक होतो... म्हणून एका group वर मी click केल आणि माझा सर्व मुडच बदलुन गेला... पहिला message एका भिबत्स बलात्कारा संधर्भात होता. पण मग गोष्ट इथेच संपत नव्हती, त्या खालो-खाल त्या पिडीतेचे तितकेच भयाण आणि भिभस्त pics टाकले होते. साहजिकच त्या message मध्ये त्या घटनेचा स्पष्टपणे निषेध केला होता पण एव्हढच पुष्कळ आहे ?

जेव्हा पासुन लोकांकडे smart phones उपलब्ध झाले आहेत twitter, whtsapp आणि facebook सारख्या social networking sites ची विपुलता निर्माण झाली आहे, तेव्हापासून लोकांकडे media सारख एक सशक्त माध्यम एखाद्या खेळण्यासारख उपलब्ध झाल आहे. पण त्याचा वापर कितपत आणि कसा करावा याची तितकी समज त्यांच्यात विकसित झाली नाही . हि गोष्ट या  घटनेपुरतीच मर्यादित नाही, तर बरयाचदा खुन, अपघात अशा दुर्दैवी घटनांचे विदारक चित्रण आणि अनाठायी तपशील दिला जातो याचा परिणाम असा होतो कि लोकांना अशा घटनांचे बळी ठरलेल्यांबद्दल सहानुभूती वाटते, पण त्यात अनुभूतीचाच भाग अधिक असतो, आणि जेव्हा अनुभूतीचा अतिरेक होतो तेव्हा ती विकृती धारण करते, आणि हळू-हळु  अशा घटनांच्या post पाहणे हि निव्वळ उत्सुकता राहते आणि जिथे निव्वळ उत्सुकता राहते तिथे अशा घटना आणि त्यांच छायाचित्रण किंवा चित्रीकरण एक मनोरंजनाच साधन बनुन राहतात.

दुर्दैवाने  या social साक्षरतेच्या अभावी जगात आणि भारतात अशा कित्येक विकृत स्वरूप धारण केलेल्या post वनव्या सारख्या पसरत आहेत. ज्या लोकांच्या भावना बधीर करत आहेत. जस शस्त्रक्रिया करताना डॉक्टर त्या अवयवाची चिरफाड करतो पण ती जाणवत नाही, पण शस्त्रक्रिया आपल काम मात्र करत असते. तशा प्रकारे या posts लोकांच्या भावना बधीर करून त्यात विकृती पसरवण्याच काम करत आहेत. आणि  आश्चर्याची गोष्ट म्हणजे हि विकृती पसरवण्याच काम आपण स्वतः च करत आहोत.

अस म्हणतात कि समाजाचच प्रतिबिंब माध्यमांद्वारे व्यक्त होत. तेव्हा अशा समाजात एखाद्या दुर्दैवी घटनेत बळी गेलेल्या मुलाच्या आईला किंवा आत्याचारीत मुलीच्या वडीलांना किंवा स्वतः पिडीत व्यक्तीला 'आप को कैसा लग रहा है?'  हा प्रश्न सहजपणे विचारला जातो, तिथे सनसनीखेज बातम्यांमध्ये निव्वळ उत्सुकता चाळवणारे प्रसंग दाखवले जातात, तिथे अपघात किंवा अगदी बलात्कारासारखे प्रसंग चित्रित करायला कॅमेरे सरावतात पण मदतीचा हात पुढे येत नाही.

मित्रांनो, समाज पुरुष हा एक फार मोठा प्राणी आहे. तिथे कोणाला दोषी ठरवता येत नाही, मात्र दोषी सर्वच असतात. तेव्हा जागरूक व्हा... आत्मपरीक्षण करा. घडणारा प्रसंग घडून जातो, अत्याचारी त्याच काम करून शिक्षाही भोगतो, पण अशा दुर्दैवी घटनांचा प्रसार करून आपण अप्रत्यक्षपणे त्या घटनांच उद्दतीकरण तर करत नाही ना? याच भानही ठेवायला हव.

शेवटी भावना दाखवण्याची नाही तर व्यक्त करण्याची गोष्ट आहे. सोप्या भाषेत सांगायच तर कॅलेंडर वरच्या मॉडेल्स भावना (?) दाखवतात तेव्हा तोंडातून 'आह' येत... पण जेव्हा तीच भावना एखादी अभिनेत्री फक्त डोळ्याने व्यक्त करते तेव्हा आतून 'वाह' येत. बाकी सांगणे न लगे तुम्ही सुज्ञ  असा. 

अस्तु ….