गर्भांतरीचे अनुभव आणि परिवर्तनाचे त्रिकालबाधित वास्तव
अस म्हणतात कि मुल आईच्या गर्भात असल्यापासुनच त्याच्यावर संस्कार होत असतात, एका अजाण अजन्मा बीजावर जर अप्रत्यक्षरित्या संस्कार होत असतील तर ती निसर्गाची किमयाच म्हणायला हवी .
बीजाच - रोपट्यात, रोपट्याच- कळीत, कळीच- फुलात आणि शेवटी फुलाच कोमेजण हे चक्र सर्व सजीवांना समान आहे. पण या चक्रात अनुभवाची कित्येक वलय असतात आणि तीच प्रत्येकाची घडण वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या मार्गाने करत असतात. आजपर्यंत मी असंख्य अनुभव घेतले आणि भविष्यातही मला येतील. इथे मी मांडलेले अनुभव म्हणजे अगदी एक लहानसा हिस्सा आहे पण तो हि कुठेतरी बदल आणि प्रगल्भतेची जाणीव करून देतो.
कंपनीतीतील एक वर्षाचा लहानसा कालावधीही असाच गर्भांतरीच्या अनुभवासारखा होता. अनुभवला खरा पण शब्दांच्या आवाक्यात येत नाही. जेव्हा केव्हा तुम्ही तुमच स्वप्न साकार करता तेव्हाच नव्या स्वप्नांची बीजेही पेरली जातात आणि तीच पेरलेली बीज जेव्हा फोफावतात तेव्हा प्रत्येक वेळी बाहेर पडण जिकिरीच होऊन जात आणि त्यातूनच अपेक्षाभंग होतो आणि आपण स्वतःला दुर्भागी समजतो… काय गंमत आहे स्वतः च्या आत्ममग्न स्थितीत आपण स्वप्नात गुंग होऊन जातो आणि आपल्याला बाहेरच्या जगाचा विसर पडतो आणि जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा बाहेरच जग आपल्याला विसरलेल असत.
नोकरीला लागण माझ स्वप्न होत आणि ते पूर्ण झाल्यानंतरही मी जी स्वप्नांची इतर बीजे तिथे रोवली ती काही पूर्णत्वास गेली अस नाही. मी त्या नव्या स्वप्नांच्या पूर्ततेतच एव्हढा गुंतलो होतो कि पूर्ण झालेल्या स्वप्नांचा आस्वाद घेणच काहीसा विसरलो. गर्भातून बाहेर पडण्यासाठी धडपडणार मुल जेव्हा लहानपण ते म्हातारपण या दिर्घ टप्प्यातही अनेक वेळा धरपडत तेव्हा त्याच बीज जस गर्भातच सामावलेल असत, तसच इथे विस्तृत केलेले अनुभव जणू माझ्यासाठी गर्भांतारीचे अनुभव आहेत.
'Change is the only thing which is permanent'
किती खरय! अगदी खरयाहून खर … बदल हीच एक शाश्वत गोष्ट आहे. बदल म्हटल्यावर तोंड वेंगाडणारा मी, माझ्यातच आजपर्यंत किती बदल झाला हे जेव्हा पहातो तेव्हा तो स्वीकारण्याऐवजी एक त्रयस्थ विचारसरणी डोक्यात येते, मी कुठे बदललोय? मी तर आहे तसाच आहे. बहुतांश हे प्रत्येकाच उत्तर असत, कदाचित माणसाला बदलाचा इतका तिटकारा असतो कि तो जाणवूनही स्वीकारण्याची मानसिक तयारी त्याची नसते.
कंपनीतल्या शेवटच्या दिवशी जेव्हा बसने मी घरी येत होतो तेव्हा असेच डोक्यामध्ये संसारातल्या परिवर्तनासंबंधीचे विचार चाललेले, बहुदा हे विसंगत वाटेल पण कंपनी सोडल्याच जे दुःख किंवा जी भावनिक हुरहुर होती तिच्यावर ते मलमपट्टीच काम करत होत, आणि असही माणसाला दुःखाच्या वेळीच तत्वज्ञानाचा खूप आधार वाटतो. बस प्रवास जेमतेम फक्त १५ ते २० मिनिटांचा होता पण या काळात विचारांचा जो काही उहापोह झाला तो तीन तासांच्या प्रवचनासारखा होता.
माझ्या बाबतीत सांगायच झाल तर परिवर्तन कुठे नाही झाल? नोकरी लागण्यापूर्वीचा मी आणि नोकरी लागल्यानंतरचा मी, नोकरी मिळाल्याचा खुप आनंद वाटणारा मी ते तीच नोकरी सोडण्याचा विचार करणारा मी आणि अशी किती म्हणून परिवर्तनाची आवर्तन माझ्या बाबतीत घडली. इथे परिवर्तन चांगल कि वाईट हा प्रश्नच राहत नाही, तुमची इच्छा असो वा नसो परिवर्तन हे घडतच असत, त्याला कारणीभूत घटक कधी आसपासची परिस्तिथी असते तर कधी तुमचे स्वतःचे निर्णय असतात तर कधी दुसऱयांचे निर्णय निर्णायक ठरत असतात. कारण काहीही असल तरी परिवर्तन हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
आयुष्य हि गती आहे तर परिवर्तन दिशादर्शक आहे जी गतिमान आयुष्याला कोणतीतरी दिशा निश्चित करून त्या दिशेने अग्रेसर करते व आयुष्याला अर्थही प्राप्त करून देते. खचितच हे परिवर्तन कदाचित माझ्या आयुष्याला योग्य दिशा देईल. परिवर्तनाच त्रिकालबाधित वास्तव हेच असाव.
- विशाल बर्गे
(लाइफ इन के पी ओ इंडस्ट्री )
लेखक - विशाल बर्गेप्रदर्शन तारीख - २१ मार्च २०१५