(पार्श्वभूमी - भारत जरी निधर्मी राष्ट्र असले तरी भारतात धर्म आणि धार्मिकतेला किती महत्व आहे हे अधोरेखित करण्याची गरज नाही.आणि जिथे धर्म तिथे गुरू आलेच आणि गुरू पाठोपाठ त्यांचे अनुयायी!पण हे अनुयायी खरंच डोळसपणे त्यांच्या गुरूंचा अनुनय करतात का? ही अंतर्मुख होऊन विचार करण्याची गोष्ट आहे.या लेखाद्वारे हाच एक प्रामाणिक प्रयत्न)
माझा भाऊ आणि मी म्हणजे अगदी दोन ध्रुवावरची दोन टोके आहोत,आमच्या दोघांमध्ये जरी चर्चा झाली ना तरी ती वादाच्या अंगानेच होते.थोडक्यात विषयावर यायचं म्हणजे काही दिवसांपूर्वी असाच आमचा चर्चा वजा वाद रंगला. कारण पाहायला गेलं तर काही विशेष असं नाही पण नीटपणे विचार केला तर नक्कीच अंतर्मुख करणार होतं.
तात्याने (भावाचं आदरार्थी उपनाम) सुरुवात केली,"तुला सांगतो, मी आजपर्यंत गुरुजींइतकं प्रभावशाली व्यक्तित्व पाहिलं नाही"
मी पुस्तक वाचत होतो, मला त्याच्या 'सो कॉल्ड' गुरूभक्तीची पूर्ण कल्पना होती.मी छद्मी हास्य करत पुस्तकावरचं लक्ष्य जराही ढळू दिलं नाही,आणि त्यानेही त्याचा योग्य अर्थ काढत नाराजीचा सूर ओढला जो त्याच्या आवाजात स्पष्ट जाणवत होता.
"तुला ना सांगून समजणार नाही.एखाद्या व्यक्तीला टी. व्ही वर पाहण्यात आणि प्रत्यक्षात पाहण्यात जितका फरक असतो ना तेव्हढाच पण गुरुजींच्या बाबतीत जरा काकणभर जास्तच फरक आहे. तू त्यांना टी. व्ही वर पाह्यलंय ना!ते प्रत्यक्षात पाहिल्यास काहीच नाही.."
माझी पुस्तकावरची नजर आता ढळू लागली होती आणि इकडे याची तोंडाची पट्टी सुरूच होती.
"अरे मी त्यांना प्रत्यक्षात पाहिलंय, काय त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज,तो गोरा रंग..पाहताच वाटावं या व्यक्तीत काहीतरी जादू आहे.."
"तुझ्या गुरुंसारखे असे जगात कितीतरी असतील" मी उगीच खोडा घातला.
"अं हं, हा तुझा गैरसमज आहे.तू त्यांना प्रत्यक्षात पाहिलं नाहीस ना? म्हणून!" पुन्हा तेच
"बरं, मला सांग तुम्ही तुमच्या गुरूंना किती फॉलो करता रे?"माझा प्रतिप्रश्न.
"त्याचा इथे काय संबंध?" त्याची शंका
"ते स्वयं शंकराचा अवतार आहेत" सर्व गोष्टींवर कडी करणारी त्याची पुस्ती.
"मला फक्त एव्हढंच सांगायचं आहे की ते तुझ्या माझ्यासारखेच एक मनुष्य आहेत." माझं ठोक उत्तर.
"तुला नाही समजायचं!"त्याने पॉज घेत माझ्याकडे तिरकस दृष्टिक्षेप टाकला.
"समजायचंय काय त्यात?मला फक्त एव्हढंच सांगायचंय की तुझ्या गुरुंसारखे प्रभावशाली व्यक्तित्व असणारे जगात कितीतरी लोक असतील.मला सांग तुझे गुरू इतकेच प्रभावशाली आहेत तर तुम्ही लोक त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुकरण का करत नाही?" माझा प्रतिहल्ला.
मला तात्याच्या व्यक्तिकेंद्रीत आंधळ्या गुरुभक्तीची मनस्वी चीड होती.
"म्हणजे?" तात्या
"म्हणजे,तुमच्या गुरूंनी तुम्हाला सेवा करण्यासाठी मग ती कोणत्याही प्रकारची असो करायला सांगितली आहे,बरोबर!" मी
"हो"
"मग मला सांग तू आतापर्यन्त किती सेवा केली आहेस?"
तात्या थोडा विचारात पडला आणि त्याने नकारार्थक मान हलवली.
"सेवा म्हणजे नक्की काय करायचं तेच समजत नाही रे!तुला काय वाटतं सेवा म्हणजे काय?"तात्याचा प्रश्न
"सेवा म्हणजे असं नाही की तू रस्त्यावरचा कचरा गोळा करत बस किंवा म्हाताऱ्या लोकांचे हात पाय दाबत बस! अरे सेवा म्हणजे रस्त्याने जाताना वाटेतील दगड अथवा काचेचा तुकडा बाजूला टाकलास किंवा साधा सिग्नल पाळल्यास ती समाजाभिमुख सेवाच नाही का? आणि एव्हढंच कशाला घरातही स्वतः चं अंथरून स्वतः च काढलंस तरी ती सेवाच!" शेवटी माझा त्याला उगीच एक टोमणा.
तात्या थोडा विचारात पडला,मला बरं वाटलं.
"कधीही सेवा आपल्या घरापासून सुरुवात केली तर चांगली.दिव्याखाली अंधार अशी स्थिती नको व्हायला!बाहेर मस्त रस्त्यावरचा कचरा साफ करायला झाडू घेऊन सरावतो पण घरातला कचरा साफ करायला वाकवत नाही, ही काही सेवा म्हणता येत नाही.ही तर विनोबाजींच्या गोष्टीतल्या मुलासारखी अवस्था जो पाय भाजू नयेत म्हणून अख्या जगाला चामडं अंथरायला चाललेला पण स्वतः पायात चप्पल घालायला विसरलेला" माझा उपदेश सुरूच होता,"प्रत्येकाने जर घरातूनच सेवा करायला सुरुवात केली तर कुणाला कुणाच्या सेवेची विशेष गरजचं उरणार नाही.याच प्रकारच्या सेवेने तुम्हाला मुक्ती मिळेल.म्हणूनच तर गौतम बुद्ध म्हंटले असावेत,जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुमची मदत केवळ तुम्हीच करू शकता"
तात्याने थोडा पॉज घेतला,
"नाही गुरुजीच आम्हाला मुक्ति मिळवून देतील"
माझा आनंद क्षणार्धात मावळला, माझ्या सांगण्याचा मतितार्थ त्याने समजून घेतला नसावा.
'याला म्हणतात आंधळे अनुयायी!' मला तात्याचं म्हणणं बिलकुल पटलं नाही .
"अरे गुरुजी काही तुम्हाला शेवट पर्यंत पुरणार नाहीत, त्यांच्या नंतर तुमच्या अशा वागण्याने त्यांनी शिकवलेले सर्व ज्ञान हवा होऊन जाईल कारण तुम्ही गुरुजींचे व्यक्ती पूजक आहात, त्यांच्या विचारांचे नाही.तुमच्या अशा वृत्तीमुळे गुरुजींनाही नाईलाजाने पुन्हा जन्म घ्यावा लागेल.त्यांना मुक्ती मिळणार नाही." मी
"शक्यच नाही,तू गुरुजींना नाही समजू शकत" इति तात्या
तात्याच्या आंधळ्या गुरुभक्तीने पुन्हा डोकं वर काढलं.
"बरं! मला सांग,गुरुजींनी उद्या काही अनैतिक कार्य केलं तरी त्यांच्यावरची तुमची भक्ती अशीच अढळ राहील का रे?" माझा परीक्षा घेण्याचा मुड झाला.
"गुरुजी तसं कधी वागणारच नाहीत" तात्याने मला साफ उडवून लावलं.
"अरे फक्त तसं समज!असं झालंच तर तुम्ही त्यांची साथ द्याल का?"
"हो देणारच!" तात्या ठाम होता.
"हे, यालाच म्हणतात आंधळे अनुयायी!" मी थेट मुद्दयावर आलो.
"तुम्ही जेव्हा एखाद्याला गुरू मानता तेव्हा तुम्ही तुमच्या श्रद्धेबरोबरच तुमची बुद्धीही त्या व्यक्तीकडे गहाण टाकता, आणि हाच तर मोठा प्रश्न आहे.भक्ती असावी, मात्र डोळस!गुरुचे अंधानुकरण करणारे अनुयायी नसून,गुरूच्या विचारांचा मतितार्थ जाणून त्यांच्या विचारांचं अनुसरण करणारे तेच खरे अनुयायी."
"बरोबर आहे तुझं!" तात्या विचाराधीन होऊन बोलला.मला समाधान वाटलं.आम्हा दोघा भावांचा वाद तिथेच संपला,पण काही दिवसांनंतर याचं विषयाला अनुसरून विचारांची आवर्तन सुरू झाली,कारणच तसं होतं.त्याच दरम्यान अण्णांचं (हजारे) उपोषण सुरू होतं. अण्णा उपोषणाला बसलेले होते दिल्लीला पण संपूर्ण देशभर त्यांच्या समर्थनार्थ आंदोलनाच पेव फुटलं होतं. सोशल नेटवर्क साईट्स,एस.एम.एस सगळीकडे अण्णाच - अण्णा भरून राहिले होते.माझा एक मित्र असाच एका सामाजिक संस्थेत सक्रिय होता.त्याने मला अण्णांच्या समर्थनार्थ बाईक रॅली मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं, पण मी थोडा दुविधेत सापडलो कारण त्यावेळी अण्णांचा आदेश होता की,'आंदोलन शांततेत पार पडावं, दुसऱ्या व्यक्तीला आंदोलनाचा त्रास होता कामा नये' मी विचार केला, बाईक रॅली म्हणजे शेकड्याने समर्थक जमा होणार.एका बाईक वर दोन म्हणजे कमीत कमी पन्नास बाईक्स तरी असणार मग वाहतुकीची कोंडी ओघाने आलीच. बाईक आहे म्हटल्यावर हॉर्न वाजवणं आलंच म्हणजे शांततेचा भंग आणि अण्णांच्या आदेशाचाही! नकार देणं मला भागचं होतं, मी त्याला फोनवर सौजन्याने रॅलीत सहभागी न होण्याचं कारण सांगितलं,अर्थातच ते त्याला पटलं नाही पण मग मी शांतता मोर्चात सहभागी होण्याचं आश्वासन दिल्यावर त्यानेही फोर्स केला नाही,पण अनुयायांच्या अंधानुकरणाचा प्रश्न काही सुटला नाही उलट ही समस्या मला आणखी प्रकर्षणाने जाणवू लागली.बहुतकरून समूह किंवा आपण ज्याला समाज म्हणतो तो इंडिव्हिज्युअली इंटलेक्टच्युअल असला तरी तो एका ठिकाणी जमा झाल्यावर,एकत्रित आल्यावर भावना प्रधान होतो, त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन त्याच्याकडून निर्णय घेतले जाऊ शकतात.भलेही ते त्यांच्या लिडरच्या विरोधात का जाईनात.आणि आताच्या उदाहरणात तीच परिस्तिथी होती.अण्णांच्या आंदोलना मागची पार्श्वभूमीच फक्त आंदोलन करणाऱ्यांना माहीत होती 'भ्रष्टाचार' पण अण्णांना हे आंदोलन कशा प्रकारे म्हणजे शांततेत पार पाडायचं आहे हे ते सोयीस्करपणे विसरले.यामुळे होतं काय की विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच येतं आणि अनुयायांच्या धुसमुसळेपणाने चांगल्या कारणांसाठी पुकारलेल्या आंदोलनांनाही काळी किनार लागते.महात्मा गांधींनाही अशा अंधानुयायांचा फटका बसला आहे.दंगली मागचं कारणही पाहिलं असता अनुयायांचं अंधानुकरण हाच मुद्दा वर येतो.कोणी नेता प्रक्षोभक भाषण करतो आणि इकडे जनता पेटून उठते आणि हे तर त्रिकालबाधित सत्य आहे की जमावाला अक्कल नसते.तो भावना प्रधान असतो,त्यामुळे नुकसानीचीच शक्यता वाढते.
याचं पठडीतील आणखी एक उदाहरण येथे सांगणं योग्य ठरेल ते म्हणजे निर्मल बाबांचं.हे तेव्हा हाइलाईट झाले जेव्हा त्यांच्या पूर्व अनुयायांनीच त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.न्यूज चॅनलवर पूर्ण केस उलगडून दाखवल्यावर मला असं जाणवलं की बाबां विरोधात फसवणुकीची केस दाखल करणंच मूर्खपणा आहे.खरंतर या पूर्ण केसमध्ये बाबांपेक्षा जास्त चीड त्यांच्या भोळसट (की मूर्ख म्हणू?)अनुयायांची येत होती.हे अनुयायी बाबांकडे त्यांचे वैयक्तिक समस्या घेऊन यायचे आणि बाबा त्यावर अगदी बालिश वाटावे असे उपाय सांगायचे,जसं की;
भक्त : "बाबा,मला व्यवसायामध्ये फार नुकसान होत आहे"
बाबा : "तुझं कुलदैवत कोणतं?"
भक्त : "आई माताजी!"
बाबा : "कुलदेवतेचं दर्शन घेऊन किती काळ लोटला?"
भक्त : "दीड - दोन वर्षे"
बाबा : "इथेच तर कृपा अडली आहे! कुलदेवतेचं दर्शन घे सर्व काही व्यवस्तीथ होईल"
किंवा दुसरं उदाहरण म्हणजे,
भक्त : "बाबा मला परीक्षेत यश येत नाही,काय करू?"
बाबा : "पेन कोणता वापरतोस?"
भक्त: "कोणताही" (बावचळून)
बाबा : "तरी काय किमतीचा?"
भक्त: "तीस - पस्तीस"
बाबा : "शंभर - दीडशेचा वापर,यश येईल"
भक्त : "बरं!"
वरील दोन्ही उदाहरण पाहिली तर आपल्याला सहज जाणवेल की,लोकांना त्यांचा रक्षणकर्ता हवा आहे जो त्यांचा पूर्ण भार घेईल,आणि अशावेळी एखादी व्यक्ती त्यांचा रक्षणकर्ता म्हणून उभी राहते आणि लोक त्याच्या चरणी आपली बहुमूल्य श्रद्धा वाहतात,आणि एकदा का श्रद्धेने कोणापुढे लोटांगण घातलं तर बुद्धीलाही शरणागती पत्करावी लागते,कारण प्रश्न विश्वासाचा असतो आणि हीच तर खरी शोकांतिका आहे.विश्वास आणि अंधविश्वासातील फरक ओळखणारी बुद्धीच गहाण पडलेली असते.इथे निर्मल बाबांनी लोकांच्या भोळ्या श्रद्धेचा फायदा घेतला पण लोकांनीही त्याचवेळी अंतर्मुख होउन बुद्धीचा कौल आजमावला असता तर आपल्या अंधश्रद्धेची त्यांना व्यवस्तीथ जाणीव झाली असती व ते वेळीच सावध झाले असते. मग अशावेळी डेरा सच्चा सौदा मधील प्रमुख बाबा रामरहिम म्हणा किंवा राधे माँ म्हणा लोकांच्या श्रद्धेस तडा देतात व लोक फक्त आपला अहंकार आणि अनुयायित्व सिद्ध करण्यासाठी अंधपणे हिंसाचाराचा अवलंब करतात.
म्हणूनच सांगावसं वाटतं की लोकांनी डोळस श्रद्धा ठेवावी आणि आपल्या गुरू अथवा नेत्याच्या व्यक्तित्व अथवा वक्तृत्वावर वाहवत न जाता त्याच्या विचारांना जाणून घ्यावं आणि आपल्या बुद्धीचा कौल आजमावून मगच अनुयायित्व पत्करावं,तेच खरे अनुयायी!
- विशाल बळवंत बर्गे