Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Friday 20 February 2015

लाइफ इन के पी ओ इंडस्ट्रीची ओझरती झलक खास तुमच्यासाठी...

 गर्भांतरीचे अनुभव आणि परिवर्तनाचे त्रिकालबाधित वास्तव



अस म्हणतात कि मुल आईच्या गर्भात असल्यापासुनच  त्याच्यावर संस्कार होत असतात, एका अजाण अजन्मा बीजावर जर  अप्रत्यक्षरित्या संस्कार होत असतील तर ती निसर्गाची किमयाच  म्हणायला हवी .
बीजाच - रोपट्यात, रोपट्याच- कळीत, कळीच- फुलात आणि शेवटी फुलाच कोमेजण हे चक्र सर्व सजीवांना समान आहे. पण या चक्रात अनुभवाची कित्येक वलय असतात आणि तीच प्रत्येकाची घडण वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या मार्गाने करत असतात. आजपर्यंत मी असंख्य अनुभव घेतले आणि भविष्यातही मला येतील. इथे मी मांडलेले अनुभव म्हणजे अगदी एक लहानसा हिस्सा आहे पण तो हि कुठेतरी बदल आणि प्रगल्भतेची जाणीव करून देतो.

कंपनीतीतील एक वर्षाचा लहानसा कालावधीही असाच गर्भांतरीच्या अनुभवासारखा होता. अनुभवला खरा पण शब्दांच्या आवाक्यात येत नाही. जेव्हा केव्हा तुम्ही तुमच स्वप्न साकार करता तेव्हाच नव्या स्वप्नांची बीजेही पेरली जातात आणि तीच पेरलेली बीज जेव्हा फोफावतात तेव्हा प्रत्येक वेळी बाहेर पडण जिकिरीच होऊन जात आणि त्यातूनच अपेक्षाभंग होतो आणि आपण स्वतःला दुर्भागी समजतो… काय गंमत आहे स्वतः च्या आत्ममग्न स्थितीत आपण स्वप्नात गुंग होऊन जातो आणि आपल्याला बाहेरच्या जगाचा विसर पडतो आणि जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा बाहेरच जग आपल्याला विसरलेल असत.

नोकरीला लागण माझ स्वप्न होत आणि ते पूर्ण झाल्यानंतरही मी जी स्वप्नांची इतर बीजे तिथे रोवली ती काही पूर्णत्वास गेली अस नाही. मी त्या नव्या स्वप्नांच्या पूर्ततेतच एव्हढा गुंतलो होतो कि पूर्ण झालेल्या स्वप्नांचा आस्वाद घेणच काहीसा विसरलो. गर्भातून बाहेर पडण्यासाठी धडपडणार मुल जेव्हा लहानपण ते म्हातारपण या दिर्घ टप्प्यातही अनेक वेळा धरपडत तेव्हा त्याच बीज जस गर्भातच सामावलेल असत, तसच इथे विस्तृत केलेले अनुभव जणू माझ्यासाठी गर्भांतारीचे अनुभव  आहेत.

'Change is the only thing which is permanent'

किती खरय! अगदी खरयाहून खर … बदल हीच एक शाश्वत गोष्ट आहे. बदल म्हटल्यावर तोंड वेंगाडणारा मी, माझ्यातच आजपर्यंत किती बदल झाला हे जेव्हा पहातो तेव्हा तो स्वीकारण्याऐवजी एक त्रयस्थ विचारसरणी डोक्यात येते, मी कुठे बदललोय? मी तर आहे तसाच आहे. बहुतांश हे प्रत्येकाच उत्तर असत, कदाचित माणसाला बदलाचा इतका तिटकारा असतो कि तो जाणवूनही स्वीकारण्याची मानसिक तयारी त्याची नसते.

कंपनीतल्या शेवटच्या दिवशी जेव्हा बसने मी घरी येत होतो तेव्हा असेच डोक्यामध्ये संसारातल्या परिवर्तनासंबंधीचे विचार चाललेले, बहुदा हे विसंगत वाटेल पण कंपनी सोडल्याच जे  दुःख किंवा जी भावनिक हुरहुर होती तिच्यावर ते मलमपट्टीच काम करत होत, आणि असही माणसाला दुःखाच्या वेळीच तत्वज्ञानाचा  खूप आधार वाटतो. बस प्रवास जेमतेम फक्त १५ ते २० मिनिटांचा होता पण या काळात विचारांचा जो काही उहापोह झाला तो तीन तासांच्या  प्रवचनासारखा होता.

माझ्या बाबतीत सांगायच झाल तर परिवर्तन कुठे नाही झाल? नोकरी लागण्यापूर्वीचा मी आणि नोकरी लागल्यानंतरचा मी, नोकरी मिळाल्याचा खुप आनंद वाटणारा मी ते तीच नोकरी सोडण्याचा विचार करणारा मी आणि अशी किती म्हणून परिवर्तनाची आवर्तन माझ्या बाबतीत घडली. इथे परिवर्तन चांगल कि वाईट हा प्रश्नच राहत नाही, तुमची इच्छा असो वा नसो परिवर्तन हे घडतच असत, त्याला कारणीभूत घटक कधी आसपासची परिस्तिथी असते तर कधी तुमचे स्वतःचे निर्णय असतात तर कधी दुसऱयांचे निर्णय निर्णायक ठरत असतात. कारण काहीही असल तरी परिवर्तन हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.

आयुष्य हि गती आहे तर परिवर्तन दिशादर्शक आहे जी गतिमान आयुष्याला कोणतीतरी दिशा निश्चित करून त्या दिशेने अग्रेसर करते व आयुष्याला अर्थही प्राप्त करून देते. खचितच हे परिवर्तन कदाचित माझ्या आयुष्याला योग्य दिशा देईल. परिवर्तनाच त्रिकालबाधित वास्तव हेच असाव.

                                                                                                                     -  विशाल बर्गे 
                                                                                                             (लाइफ इन के पी ओ इंडस्ट्री )    
                                                                                                                   लेखक - विशाल बर्गे
                                                                                                          प्रदर्शन तारीख - २१ मार्च २०१५



Saturday 14 February 2015

काटेरी गुलाब


काटेरी गुलाब

फुला सारखा सुंदर चेहरा 
आणि दगडाच काळीज
चेहऱयावरती निरलस गोडवा 
आणि हृदयात विखार 
भुललो तिच्या सौंदर्यावर 
आणि झुलत राहिलो तिच्या तालावर 
तिच्या शिवाय रहावत नव्हत 
जणु नशाच ती झिंगच चढायची 
एक दिवस सोडून गेली झटक्यानिशी 
आश्चर्य करायला हि फुरसत नव्हती 
मी म्हणालो,
खर आहे गुलाबाला नेहमी काटेच असतात
ती म्हणाली,
नाही! तुझ लक्ष केवळ गुलाबावर होत 
पण काटयावरच भान तुझ उडाल होत….

- विशाल बळवंत बर्गे


(शब्दस्नेह प्रकाशन प्रस्तुत, विशाल बर्गे लिखित Life In KPO E-industry (LIKE)...लवकरच  ) 

Check out Vishal Barge.....

Google+
 
Twitter
 
Life In KPO E-industry (Facebook Page)
www.facebook.com/LIKEbvishal  
 
Facebook

Sunday 4 January 2015

सुबोध लोकमान्य

आज 'लोकमान्य, एक युगपुरुष' हा चित्रपट पाहायला गेलो. प्रतिसाद अपेक्षेहून प्रचंड होता. एकंदरीत मला चित्रपट फार आवडला. ओम राउतचा पहिला चित्रपट असुनही त्याच दिग्दर्शकीय कौशल्य वाखाणण्याजोग आहे. चित्रपटाच निर्मितीमुल्य हि छान आहे, पण एव्हढ्या मोठया चित्रपटाचा डोलारा ज्या व्यक्तीरेखेवर अवलंबुन होता त्या 'टिळकांची' भूमिका ज्या प्रकारे सुबोध भावेने साकारली आहे त्याला तोड नाही, अगदी अप्रतिम.

खर तर मी चित्रपट पहात नव्हतो तर सुबोधच्या अभिनयाच रसग्रहण करत होतो, संपूर्ण चित्रपटात तो कुठेही सुबोध भावे वाटत नाही तो 'लोकमान्य टिळकच' वाटतो. टिळकांसारख व्यक्तिमत्व साकारताना या माणसाने आपली कल्पनाशक्ती किती पणाला लावली असेल याच राहून राहून आश्चर्य वाटत. अभिनयाची नैसर्गिक जाणच नव्हे तर खोली आणि रुंदी काय असते याचा वस्तुपाठच सुबोधने घालुन दिला आहे.

माझ्या मते अभिनयात ८० टक्के आवाज, १५ टक्के डोळ्यातील भाव आणि ५ टक्के प्रसंगानुरूप देहबोली यांचा सर्वस्वी प्रभाव साकारत असलेल्या भुमिकेवर पडत असतो. मग ती काल्पनिक असो वा ऐतिहासिक आणि  इथेच सुबोधच कौतुक करावंस वाटत. त्याने संपुर्ण चित्रपट भर 'लोकमान्य' हि व्यक्तिरेखा साकारताना कुठेही आवाजाचा पोत आणि पल्ला यावरच नियंत्रण हरवु दिल नाही आणि इथेच त्याने लोकमान्यांच्या व्यक्तीरेखेवरील पकड मजबुत केली. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो  मी मिळवणारच' हे वाक्य म्हणजे त्याच्या वाचिक अभिनयाचा उत्कृष्ट नमुना आहे तुम्ही अगदी डोळे बंद करूनहि टिळकांना  (सुबोधला) पाहु शकता.

माझ्यासाठी दुसरी  आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे डोळ्यातील भाव. सुबोधने टिळकांच्या डोळ्यातील भाव कसे पकडले असतील? मला विचाराल तर काल्पनिक व्यक्तिरेखा साकारताना डोळ्यातील भाव व्यक्त करताना रुदन, क्रोध, आनंद, दुःख इत्यादी नेहमीच आव्हानात्मक असतात, पण ऐतिहासिक व्यक्तित्व साकारताना तर असंभवच होतात, कारण लोकांनी  एकतर त्या विवक्षित व्यक्तीच चित्र किंवा छायाचित्र पाहिलं असत आणि त्या व्यक्तीला ते त्या विवक्षित चित्र किंवा  छायाचित्रानुसार त्याच व्यक्तिमत्व 'कस' यापक्षी 'असच' असेल याचा कायमस्वरूपी ठोकताळा मांडतात आणि इथेच खर आव्हान असत लोकांवर छाप पडण्याच आणि सुबोधने हे आवाहन लीलया पेलल आहे. टिळकांच्या डोळ्यातील करारीपणा त्याने हुबेहूब साकारला आहे.

मला राहुन राहून आश्चर्य वाटत, हि तीच व्यक्ती आहे का? जिने बालगंधर्व साकारले! ते हि दोन रुपात एक 'स्त्री' आणि दुसरा 'पुरुष' आणि आता याच व्यक्तीने 'टिळक' साकारले हा नुसता अभिनेता नाही तर जादुगार आहे.
तिसरी गोष्ट देहबोलीची.'एके काळी आपल्या देशातुन सोन्याचा धुर निघत होता, आणि आता या देशाची माती सुद्धा आपली नाही' या वाक्यात 'आणि आता या वाक्यानंतर एक pause घेत हातातली काठी दोन वेळा  जमिनीवर आपटत पुढील वाक्य म्हणण काय, आणि सिंहगडावरील कड्यावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने दोन्ही हात पसरवत स्वतःला 'devil टिळक' म्हणुन टिळकांची भव्यता दाखवण काय... 'अप्रतिम' या छोट्या- छोट्या गोष्टी पण अतिशय प्रभावी ठरतात.

मला आवर्जून सांगावसं वाटत, कि ज्यांना अभिनयाची जाण आहे किंवा जे अभिनय करू इच्छितात त्यांनी हा चित्रपट एकदा अभिनयासाठी तरी अवश्य पहावाच. सुबोध भावे सारखे कलाकार असतात जे कलाकार होऊ घातलेल्या किंवा अभिनय करू इच्छीनाऱया व्यक्तीला खाडकन जागेवर आणतात आणि अप्रत्यक्षपणे म्हणतात 'मुर्खा याला अभिनय म्हणतात' तुमच दिसण आणि असण यापेक्षा अभिनय हि कला किती मोठी आहे याची जाणीव करून देतात. जे दिलीप कुमारने भूमिकांमधील वैविध्य आणि भावपूर्ण डोळ्यांनी  दाखवलं (असा असामान्य अभिनेता जो कॅमेराकडे पाठ करूनही आपल्या भावना लोकांपर्यंत पोहचवु शकत होता )   जे राजेश खन्नाने अभिनय कौशल्याने  दाखवलं जे अमिताभ ने आपल्या प्रेझेन्स ने सिद्ध केल जे आमिरने आपल्या वैविध्याने आणि शाहरुखने अभिनयातील सहजतेने सिद्ध केल, नाना पाटेकरने अप्रतिम संवादफेकीने सिद्ध केल आणि इतकच नव्हे तर रॉबर्ट डी निरोने आपल्या प्रतिभेच्या उंचीने जे दाखवलं तेच सुबोध भावे हा मराठी कलाकार आणि मराठी सिनेइतिहासातील उत्कृष्ट अभिनेता अभिनय म्हणजे काय हे दाखवुन देत आहे.

सुबोध तुझ्या अभिनय कौशल्याला माझी मनापासुन दाद आहे. तु भविष्यात याहुनहि सर्वोत्तम देशील असा मला विश्वास वाटतो परमेश्वर तुला सहाय्य करो, हिच माझी सदिच्छा...