Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Saturday 30 December 2017

तो एक सेकंद....

मागे काही दिवसांपूर्वी सहज म्हणून मामा मामी कडे गेलो. बरेच दिवस त्यांच्याकडे जाणं झालं नव्हतं, म्हणून आवर्जून त्यांच्याकडे गेलो.नेहमीप्रमाणे चहा पाण्याचे सोपस्कार पार पडल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पांना सुरुवात झाली.
मामी सांगत होत्या, गणपतीच्या वेळी त्यांचा मुलगा कसा डेंगीने आजारी पडला आणि तो बरा होतोय तोवर त्याही आजारी पडल्या आणि त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येत कसा परिणाम झाला ते. विषयाचा ओघ आजकाल कुणाला काय होईल आणि काय नाही याचा नेम नाही असाच होता.सगळं काही अशाश्वत. माणूस आज आहे तर उद्या नाही असे सांगत मामानी काही किस्सेही सांगितले.विषयाचा ओघ पाहून मी ही मामांच्या म्हणण्याला दुजोरा देत पुस्ती जोडली की , जगात दर सेकंदाला दोन व्यक्ती मरतात आणि त्याच सेकंदात चारजण जन्माला ही येतात.या काहीशा सकारात्मक आणि सत्य परिस्थितीवर एकमत होऊन तो विषय आम्ही तिथे संपवला.
आज जेव्हा मी कधी तो संवाद आठवून घडयाळाकडे पाहतो तेव्हा मी काहीसा अंतर्मुख होतो.घड्याळातील ते दोन मोठे काटे प्रत्येक आकड्यावर विसावा घेत जात असताना एक बारीकसा सेकंद काटा मात्र कुठल्याही आकड्याशी बांधील न राहता सरसर पुढे सरकत असतो.दुनिया जरी मिनिट आणि तासांच्या परिभाषेत जगत असली तरी तो सेकंद काटा जाणीव करून देतो की त्यांचं मोजमाप त्याच्या शिवाय करणं अशक्य आहे.तो सेकंद काटा जाणीव करून देतो जगातील अशाश्वत गोष्टींची ज्या आज आहेत त्या उद्या नक्कीच नसणार,न जाणो आपल्या कळत नकळत जगात त्या प्रत्येक सेकंदाला किती लोक अनंतात विलीन होत असतील आणि किती जन्माला येत असतील.त्यात आपलाही एखादा सेकंद येईल त्या मृत्यू पावणाऱ्या दोन आकड्यात भर घालायला.
म्हणूनच कदाचित सेकंद काटा कुठल्याही आकड्याशी बांधील नसावा तो आपला सरकत असतो कुठेही विसावा न घेता. तो एक जसा अनाहूत सल्लाच आहे आपल्यासाठी की कुठल्याही व्यक्ती आणि परिस्थितीत बांधील न राहता पुढे जाण्याचा.जे आज आहे ते उद्या नसणार हे जर सत्य आहे तर आजच्या दुःखासाठी रडत का बसा आणि आज जे सुख वाटतंय त्याचा माज तरी का करावा.आपण फक्त पुढे जावं जीवनाच्या प्रत्येक क्षणात समरस होऊन.विशिष्ट गोष्टींची वाट पाहून उत्सव साजरा करण्यापेक्षा जीवनच उत्सव केला तर काय वाईट.
शेवटी आपलाही एक सेकंद येणार आहे आणखी चार जनातील एकाला जागा करून द्यायला.

(प्रिय वाचक, नवीन वर्षाच्या तुम्हांला खूप साऱ्या शुभेच्छा.प्रत्येक क्षण नवीन आहे फक्त त्याचं आवर्तन पूर्ण झाल्यावर आपण ते नूतन वर्ष म्हणून साजरं करतो.साजरं फक्त नवीन वर्ष करू नका प्रत्येक क्षण साजरा करा.)

                      ।।शुभम भवतु।।

                                   - विशाल बळवंत बर्गे

Sunday 24 December 2017

स्वार्थ

'तर स्वार्थ म्हणजे स्वतःचे हित पाहणे आणि परमार्थ म्हणजे दुसऱ्याचे हित पाहणे'
रमेश त्याच्या आवडत्या वर्ग शिक्षकाचे म्हणणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता.
'हा! तर स्वार्थ म्हणजे स्वतःचे हित पाहणे व परमार्थ म्हणजे दुसऱ्याचे!' सरांचे वाक्य रमेशच्या मनात रुंजी घालत होते.कुमारवयीन रमेश आजपर्यंत घेतलेल्या अनुभवांचा वरील वाक्याशी ताळेबंद करु पहात हॊता.
बसल्या जागी त्याच्या मनात एक विचार आला
'स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टी एव्हढ्या साध्या का आहेत?स्वार्थी विचार आल्याशिवाय माणूस पुढे कसा जाईल? आणि परमार्थ करायचा म्हणजे दुसऱ्यांच्या हिताचा विचार प्रथम करायला हवा , बाप रे!'
रमेशचं मन द्विधा अवस्थेत होतं,एव्हढ्यात त्याला आईची हाक ऐकू आली.
'रमेश, ऐ रमेश, एव्हढं एक काम करतो का रे?'
'काय?' रमेश जरा वैतागूणच म्हणाला
'दुकानातून जरा किराणाचं सामान आणशील का?'
'हे काय? जरा कुठे निवांत बसलो की काम! वैताग नुसता' त्याच्या मनात विचार आला.
तो आईला रागातच म्हणाला
'मी नाही जाणार'
आता आईने आपला आज्ञाधारी सूर थोडा मवाळ केला तिला चांगल्या प्रकारे माहित होतं  की रमेश कडून हे काम कसं करून घ्यायचं ते,
'असं काय करतोस रे बाळा! जा ना, हवं तर उरलेले पैसे तुलाच ठेव!'
आईचं हे वाक्य कानी येताच रमेश खुश झाला जसं काही तो याचं गोष्टीची वाट पहात होता.तो लगेच दुकानात जायला तयार झाला.
दुकानात जात असताना त्याच्या मनाने मघाशी सार्थ चिंतनपर तुटलेला दुवा लगेच सांधला. त्याच्या मनात पुन्हा स्वार्थ आणि परमार्थाचे विचार येऊ लागले.
'अरे मी एव्हढा स्वार्थ आणि परमार्थाचा विचार करतोय खरा पण आईचं एक छोटंसं करण्यासाठी मी उरलेले पैसे स्वतःकडे ठेवण्याची लाच स्वीकारली, म्हणजे माझी ही कृती सुद्धा स्वार्थीच नाही का?'
रमेशला त्याच्या या कृतीचं वाईट वाटलं.
दुसऱ्या दिवशी रमेश त्याचा मित्र विनू कडे गेला,नाहीतरी सुट्टीत घरी बसून त्याला कंटाळाच यायचा.विनूकडे गेल्यावर त्याच्याकडे कॉम्प्युटर गेम्स खेळून त्याचा तेवढाच विरंगुळा व्हायचा.
बाहेर दिवाणखान्यात विनूचे वडील कोणाशीतरी बोलत हॊते, म्हणून विनू त्याला आतल्या खोलीत घेऊन गेला.बाहेरच्या खोलीतून आवाज येत होता,
'एव्हढं आमच्या नव्या फॅक्टरीसाठी कर्ज मंजूर करून द्या'
'ठीक आहे मी सांगितलेली कागदपत्रे तयार आहेत ना?'
'हो'
'मग ती मला द्या'
'या वेळी तरी होईल ना काम?आता जवळ जवळ एक महिना होत आला.'
'अहो मला मान्य आहे, पण बँकेतून कर्ज मंजूर करून घेणं एव्हढं का सोपं आहे'
'बरं प्रयत्न तरी करा'
'हो तर, तुम्ही काळजी करू नका.आणि हो जरा वरचे पैसे लागतील.'
'ठीक आहे,देईन'
'बरं मग येतो मी'
एजंट होता वाटतं, कर्ज मंजुरीसाठी केव्हढा हा खटाटोप आणि पैशांची काय भानगड?त्याचा मनात विचार येऊन गेले.
विनूकडून घरी आल्यावर त्याने सहज म्हणून पेपर चाळायला घेतला. एका पानावर ठळक अक्षरात बातमी होती,
पत्रकार जुडीथ मिलर ला अटक
पूर्ण बातमी वाचल्यावर समजलं की या पत्रकार महिलेने विद्यमान अध्यक्षांच्या विरुद्ध बातमी देणाऱ्या एका व्यक्तीचे नाव उघड करण्यास नकार दिला त्यामुळे तिला अमेरिकी न्यायालयाने अटक केली होती.
'अरे ही तर हुकूमशाही आहे, हे बरोबर नाही.आणि हा तर चक्क सरकारी स्वार्थ!'
विनूच्या मनात पुन्हा विचारांच काहूर माजलं
इथून तिथून कुठेही जा स्वार्थ सगळीकडेच आहे, तो त्याचा असो वा माझा,छोटा असो वा मोठा...
आणि हो आता मी या स्वार्थाख्यानाचा शेवट माझे नाव लिहून मी माझा स्वार्थ पूर्ण करतो.

                                     - विशाल बळवंत बर्गे

Saturday 16 December 2017

उत्तरदायित्व

परवा काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं पण काही कारणाने ते काम काही पूर्ण झाले नाही,काम न झाल्याबद्दल मनात काही विशेष खेद नव्हता.
मी बाहेर येऊन स्कूटर स्टँडवरून काढली आणि नेहमीप्रमाणे उजव्या बाजूला कलती करून एक जोराची किक मारली,पण प्रतिसाद काहीच नाही.अगदी त्यावेळच्या पावसासारखा.जुलै महिना संपत आला तरी या महाशयांचा पत्ता नाही.दरवेळी पाऊस म्हटलं की रस्त्यावर असणारी चीक चीक , पायात स्लीपर घालून फडक फडक कुठे जात असताना अचानक जाणवतं की आपल्या पॅन्ट आणि शर्टवर चिखलाचे शिंतोडे उडाले आहेत आणि त्यावेळी होणारा त्रागा.
पण आता मात्र मला पावसात दाटणारी हिरवळ , मातीचा सुगंध आणि हवेतील आल्हाद आठवायचा.किती खरं आहे की माणसाला त्याच्या सुखाच्या क्षणात दुःखाची क्षुल्लकशी छायाही नकोशी असते आणि दुःखाच्या वेळी तो सुखाची आठवण करत बसतो.दुसऱ्या वेळी मी पुन्हा एकदा किक मारली आणि स्कूटर माझ्या मनगटाच्या तालावर गुरगुरायला लागली.समाधानाने मी तिथून निघालो तितक्यात पावसाला सुरवात झाली. पहिल्यांदा बारीकश्या भुरभुरीचे अचानक मोठ्या सरीत रूपांतर झाले व नाईलाजाने मला एका पान टपरीचा आश्रय घ्यावा लागला.तिथून मी पावसाची रिमझिम तटस्थपणे पहात होतो.रस्त्यावरील बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर पाऊस म्हटलं की तो यायचाच असे मुर्दाड भाव नव्हते तर एकदाचा आला बाबा असे सस्मित भाव होते.
पण एव्हढ्यात व्हायचं तेच झालं, वरून राजाने आपला हात अचानक आखडता घेतला.याचकांना दान देता देता राजाने अचानक माघार घ्यावी व त्यावेळी उर्वरित याचकांची जी भावावस्था व्हावी त्याप्रमाणे त्यावेळी बहुतेक लोकांची झाली असावी.
तर,पावसाचा जोर ओसरल्यावर तिथून निघणार इतक्यात एक पासष्टी पार केलेले बाबा म्हणाले,
'पवार वस्ती?'
मी म्हणालो,
'शाहूनगर!'
'ठीक है,वहाँ तक छोड़ दोगे बेटा'
इति बाबा
'ठीक है,बैठिये'
आणि आम्हा दोघांचा प्रवास सुरू झाला. साहजिकच एखाद्या व्यक्तीने थोडीफार मदत केली की त्याच्याशी प्रेमपूर्ण वार्तालाप करून शिष्टाचार पाळण्याचे काम बाबांनी सुरू केले
'अभी तो बारिश ही नही है'
'हाँ - हाँ!'
मी बाबांच्या प्रत्येक गोष्टीत हामी भरत होतो,ही मला अगदी जडून गेलेली सवयच आहे कोणाच्याही कोणत्याही गोष्टीला हो ला हो म्हणून अनुमोदन देण्याची.या सवयीमध्ये भिडस्तपणा असण्यापेक्षा दुसऱ्याच्या मतांचा आपण आदर करत आहोत ही वृत्तीच जास्त.
'पाप बहोत बढ़ गया है'
'हाँ - हाँ'
'माँ - बाप को कोई पूछता ही नही,बस में बैठने के लिए बूढों को जगह नही देते...,
इत्यादी इत्यादी
यावेळी मला जाणवलं की बाबा स्वतः घेतलेले अनुभवच मला गप्पांच्या ओघात सांगत आहेत.मला वाटतं बाबांच्या ऐवजी माझ्या बरोबर कोणी चाळीशीची व्यक्ती असती तर तिने असे आपले पूर्वी घेतलेले अनुभव चुकूनही सांगितले नसते,कारण त्याला माहित आहे की तो जेव्हा बसमधून प्रवासाला कुठे जात असतो तेव्हा तो बसमधल्या म्हाताऱ्या जोडप्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या बायका पोरांच्या सोयीसाठी त्यांना जागा करून देण्यातच धन्यता मानेल. याउलट आणखी कमी म्हणजे पंचवीशीचा एखादा युवक असता तर तो संबंध प्रवासात माझ्याशी बहुदा तुरळक किंवा काहीच बोलला नसता,कारण त्याला त्याच्या इच्छीत स्थळी पोहचण्याची घाई असते व आपल्याला तिथे जाऊन काय करायचंय याचे तो आडाखे बांधत असतो,म्हणजे तो स्व-केंद्रित वृत्तीचा असतो.
म्हणजे पंचविशीचा युवक जो स्व-केंद्रित वृत्तीचा असतो,स्वतःची ध्येये आणि स्वप्नपूर्ती याकडेच ज्याचं सारं लक्ष एकवटलेले असतं तो लग्नानंतर अचानक आपल्या बायकोबद्दल नंतर मुलांबद्दल सजग राहतो व त्यांच्या सुखाचा विचार करू लागतो व मग शेवटी उतारवयात जेव्हा तो एकटासा पडतो तेव्हा त्याला जाणवतं की आपलं तसं कोणी नाही व इतरांनी जाणून- बुजून केलेल्या दुर्लक्षामुळे त्याचा त्रागा होतो व असा कोणत्याही प्रसंगी आपल्या मनातले भाव व्यक्त करण्यास ते प्रवृत्त होतात.
एकंदरीत काय तर माणूस आपल्या क्षमतांचा वापर उमेदीच्या काळात एक तर स्वतःसाठी आणि नंतर फक्त आपल्या लोकांसाठी करतो , समाजाप्रतीची जाणीव किंवा दायित्व या गोष्टींपासून तो अलिप्त राहतो व उमेदीची वर्ष ओसरल्यावर समाजाच्या दायित्वाची त्याला आठवण होते.
एव्हाना शाहूनगरच्या वळणावर गाडी आली होती, बाबा 'थँक्यू' म्हणून तिथे उतरले आणि मी ही माझे उत्तरदायित्व पार पाडून माझ्या वाटेला लागलो.

                                     - विशाल बळवंत बर्गे

Tuesday 5 December 2017

वारसा

बहुतांश लोकांची अशी सुप्त इच्छा असते की त्याची जगातील कोणत्यातरी लहान मोठ्या, सजीव - निर्जीव वस्तूवर त्याची स्वतः ची एक छत्री सत्ता असावी.हीच इच्छा त्याच्या मरणासन्न अवस्थेतही कायम राहते, म्हणूनच की काय त्याच्या मृत्यूनंतरही ती सत्ता त्याच्या पुत्ररुपी अंशाने चालवावी किंवा वाढवावी अशी व्यवस्था लावूनच तो पायउतार होतो आणि जगाचा निरोप घेतल्यानंतरही त्याचा वारसा तो मागे ठेऊन जातो.
वारसा मूक राहूनही सांगत असतो की मी या विवक्षित गोष्टीचा एकमात्र मालक आहे.आमच्या पूर्वजांनी त्यांच्या पराक्रमाने तिच्यावर हक्क प्रस्थापित केला आहे आणि वर्तमान काळात मी तिचा राजा आहे आणि भविष्यातही मी ठरवेल तोच तिचा वारस असेल.
वारसा ही जरी व्यक्तीनिष्ठ संकल्पना असली तरी तिचा व्यापक दृष्टीने समाज हितावर परिणाम होतो.जसे आज भारत हा लोकशाही देश म्हणून स्वतःला अभिमानाने मिरवत असला तरी स्वातंत्र्यानंतर बहुतांश सत्ता गांधी घराण्याकडेच सुपूर्द झाली आहे.पंडित नेहरूनंतर त्यांची मुलगी पंतप्रधान होते आणि त्यानंतर राजीव गांधी आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सोनिया गांधी या त्यांच्या पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत आणि त्यांनीही त्यांचा पुत्र राहुल गांधी यास पक्षाचा वारस करण्याची पुरेशी व्यवस्था लावली आहे. तर मग प्रश्न असा पडतो की लोकशाहीतच जर घराणेशाही सुप्तपणे शिरकाव करत असेल तर त्या लोकशाहीला अर्थच काय?
दुसरे आणखी एक उदाहरण घ्यायचं झाले तर ठाकरे घराण्याचे.प्रसिद्ध लोकप्रबोधनकार के.सी.ठाकरे यांच्या संस्काराची ताकद अफाट म्हणायला हवी की त्यांनी ज्याप्रकारे लोकांच्या अस्मितेस किर्तनाद्वारे जाग आणली तोच अस्मितेचा जागर मराठी मना मनात आपल्या कृतीद्वारे पेटवला तो त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांनी परंतु त्यांनीही आपल्या पक्षाचा वारस त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना केलं.
वरील उदाहरणं देशांतर्गत असली तरी हीच स्तिथी विदेशातही कायम आहे मग तो देश प्रगत असो वा अप्रगत, इथून तिथून माणसाची कोणालातरी सर्वोच्च स्थानी बसवून त्यानंतर त्याच्या वारसांना पूजण्याची मूळ स्वाभाविक वृत्ती सारखीच दिसते ज्याला आपण मेंढरांच्या कळपाची उपमा देऊ शकतो.
घराणेशाहीचा मला इथे विरोध करायचा नाही परंतु घराणेशाहिमध्ये निर्माण होणारे वारस त्या कार्यास लायक असतीलच असे नाही आणि त्यामुळे जर इतरांच्या संधी डावलल्या जात असतील अथवा इतरांचे नुकसान होत असेल तर निश्चितच ही स्वतः समाजाने ओढवून घेतलेली दुर्दैवी बाब आहे.ती तिथेच मोडीत काढणे हे सर्व समाज घटकांचं कर्तव्य आहे.
सहसा लोकांचा असा दृष्टिकोन असतो की त्याचे वडील असे होते तर त्याचा मुलगाही त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपला उद्धार करेल परंतु ते हे विसरतात की तो पाऊल टाकेल पण ठसा उमटवेल याची काय शाश्वती?
माणूस म्हटला की स्वार्थ आलाच पण स्वार्थ दोन प्रकारचे असतात एक वैयक्तिक स्वार्थ तर दुसरा सामाजिक . सामाजिक स्वार्थ हा सर्वात घातक कारण तो एका व्यक्तीला केंद्र बिंदू ठेवून संपूर्ण समाजाला वेठीस धरून त्याचं नुकसान करतो.स्वार्थ ही भावना मुळात वाईट नाही ती नैसर्गिकच आहे आणि म्हणून उपयोगीही परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक विनाशास कारणीभूत ठरतो.
आपण ज्या मेहनतीने सत्ता कमावली ती सत्ता सहजा सहजी दुसऱ्या आणि घराबाहेरील व्यक्तीस देणं म्हणजे अगदीच काही सोप्पं काम नाही, मग ती त्रयस्थ व्यक्ती त्यासाठी कितीही लायक असली तरी.टाटा आणि इन्फोसिस ह्या कॉर्पोरेट जगतातील सायरस मिस्त्री आणि विशाल सिक्का ही उदाहरणं तर ताजीच आहेत.
वैयक्तिक संपत्तीबाबत स्वार्थ किंवा आणखी सुसंस्कृत शब्दात वारसदार ही संकल्पना ठीक आहे परंतु जर ती समाजाप्रती वाहिलेली संस्था अथवा संघटना असेल तर इथे घराणेशाहीचा शिरकाव निश्चितच घातक आहे.
सामाजिक स्तरावर जिथे सर्व समाजाचं हित निहित आहे अशा ठिकाणी या वारसदार संकल्पनेस पायबंद घालणे आज अगदी आवश्यक झाले आहे.या करता लोकांनीच एकत्र येऊन पुढाकार घेणं आवश्यक आहे.जिथे जिथे तुम्हाला घराणेशाहीचा शिरकाव होताना दिसेल तिथे तिथे तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवून त्याला नकार द्यायला हवा हा तुमचा आणि संपूर्ण समाजाचा हक्क आहे.हा नकार तुम्ही सार्वजनिक निवडणुकीत उभ्या राहिलेल्या एखाद्या बड्या नेत्याच्या नालायक मुलाविरुद्ध वापरू शकता किंवा सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्थेत शिरकाव करू पाहणाऱ्या बड्या असामीचा.आज असं करणं ही काळसुसंगत आवश्यक बाब आहे. नाहीतर ज्या प्रकारे फ्रान्समध्ये राज्यक्रांती होऊन तेथील सामान्य जनतेने संपूर्ण सत्ता पालट केला तो दिवस दूर नाही.

                                      - विशाल बळवंत बर्गे

Sunday 3 December 2017

शक्यतेचा ध्यास

उस्मानने एका क्षणात झटपट एक व्यंगचित्र काढलं, व्यंगचित्रात त्याचा हात आता चांगलाच बसला होता.समीरने त्याच्या कलेबद्दल ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात त्याने अनुभूती घेतली,परंतु न्यूनगंडाची एक अनामिक लहर त्याच्या अंगात संचारली आणि त्याचा निचरा करणं त्याला आवश्यक होतं.
व्हीलचेअर काही बोलण्याच्या इराद्याने त्याने पुढे सरकवली.
"यार उस्मान, व्यंगचित्र फार सही काढतोस रे!"
उस्मान थोडं हसून म्हणाला
"काही नाही रे, सरावाने सगळं काही होतं"
"यार, मला जर वेळ असता ना...तर.."
समीरने सवयीप्रमाणे वाक्य योग्य ठिकाणी अर्धवट सोडलं, पण उस्मानला त्याच्या अर्धवट वाक्यातून व्हायचा तो बोध झाला.पण उस्मानने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला,
"अरे मी सुद्धा सुरवाती - सुरवातीला साधी आणि बालिश चित्र काढायचो"
समीरने फक्त एक हुंकार दिला, त्याची निराशा साफ झळकत होती. पण शेवटी त्याने उस्मानला एका खोचक प्रश्नाचा गुगली टाकलाचं जो त्याला कधीच आवडायचा नाही.
"उस्मान,तू इतकी वर्षे व्यंगचित्रे काढतोयस पण मी तुझं एकही व्यंगचित्र कुठल्याही दिवाळी अंकात किंवा पेपरमध्ये पाहिलं नाही .असं का बरं?"
उस्मानला समीरचा हा प्रश्न खोचक की साधेपणाने विचारला गेला आहे हे कळायला काही मार्ग नव्हता,तो जरा भोळाच होता.पण समीरचा तो प्रश्न त्याला खोलवर कोठेतरी डाचला.त्याला आता आपली पडती बाजू सांभाळायची होती.जमेल तेव्हढा निश्चिन्त चेहरा करून तो म्हणाला,
"मीच कधी व्यंगचित्र छापायला दिली नाहीत,मी फक्त छंद म्हणून व्यंगचित्र काढतो."
उस्मान असं बोलला खरं पण प्रत्यक्षात त्याला प्रसिद्धीची मनापासून इच्छा होती.त्याचाकडे कला असूनही त्याद्वारे प्रसिद्धी मिळवण्याचा त्याचा ध्यास कुठेतरी कमी पडत होता.
एव्हढ्यात तिथे उस्मानचा मित्र कणगुले आला.
कणगुले! ग्रामीण भागातून आलेला मुलगा , साधा होता पण गबाळा नव्हता. कुणाला काही विचारण्यात खोचकतेपेक्षा रोचकता जास्त.यानेच उस्मानकडून व्यंगचित्र काढण्यातलं तंत्र आणखी मजबूत करून घेतलं होतं.आपल्या ग्रामीण बाजाच्या भाषेबद्दल कोणताच न्यूनगंड नसलेला पण योग्य वेळी योग्य तेच बोलणारा, बोलण्यापेक्षा याला ऐकण्यात भारी रस! मनाने स्वतः सरळ म्हणून बाकीचेही याला त्याच्या सारखे सरळ आणि चांगले वाटायचे. या सर्व नैसर्गिक भावनांचा आणि गुणांचा परिपोष काय?तर चेहऱ्यावर झळकणारा साधेपणा आणि निरागसता  जी कोणालाही दिखाऊपणा करून साधता आली नसती.
समीर आणि उस्मानला स्मित करून त्याने उत्साही चेहऱ्याने उस्मानला सांगितले,
"आरं, आज म्या पुण्याच्या पेपर एजन्सीतं तुला काल दाखावल्यालं यंगचित्र पाठवलंय"
उस्मान नाटकीय चेहरा करून म्हणाला,
"काय सांगतोस?अरे व्वा!"
समीर मक्खपणे कणगुले कडे पहात होता,पण कणगुले मात्र पेपरात आपले व्यंगचित्र एक - दोन आठवडयात छापून येईल या आशेने खुश होता.

                                      - विशाल बळवंत बर्गे

Friday 24 November 2017

अनुयायी

(पार्श्वभूमी - भारत जरी निधर्मी राष्ट्र असले तरी भारतात धर्म आणि धार्मिकतेला किती महत्व आहे हे अधोरेखित करण्याची गरज नाही.आणि जिथे धर्म तिथे गुरू आलेच आणि गुरू पाठोपाठ त्यांचे अनुयायी!पण हे अनुयायी खरंच डोळसपणे त्यांच्या गुरूंचा अनुनय करतात का? ही अंतर्मुख होऊन विचार करण्याची गोष्ट आहे.या लेखाद्वारे हाच एक प्रामाणिक प्रयत्न)

माझा भाऊ आणि मी म्हणजे अगदी दोन ध्रुवावरची दोन टोके आहोत,आमच्या दोघांमध्ये जरी चर्चा झाली ना तरी ती वादाच्या अंगानेच होते.थोडक्यात विषयावर यायचं म्हणजे काही दिवसांपूर्वी असाच आमचा चर्चा वजा वाद रंगला. कारण पाहायला गेलं तर काही विशेष असं नाही पण नीटपणे विचार केला तर नक्कीच अंतर्मुख करणार होतं.
तात्याने (भावाचं आदरार्थी उपनाम) सुरुवात केली,"तुला सांगतो, मी आजपर्यंत गुरुजींइतकं प्रभावशाली व्यक्तित्व पाहिलं नाही"
मी पुस्तक वाचत होतो, मला त्याच्या 'सो कॉल्ड' गुरूभक्तीची पूर्ण कल्पना होती.मी छद्मी हास्य करत पुस्तकावरचं लक्ष्य जराही ढळू दिलं नाही,आणि त्यानेही त्याचा योग्य अर्थ काढत नाराजीचा सूर ओढला जो त्याच्या आवाजात स्पष्ट जाणवत होता.
"तुला ना सांगून समजणार नाही.एखाद्या व्यक्तीला टी. व्ही वर पाहण्यात आणि प्रत्यक्षात पाहण्यात जितका फरक असतो ना तेव्हढाच पण गुरुजींच्या बाबतीत जरा काकणभर जास्तच फरक आहे. तू त्यांना टी. व्ही वर पाह्यलंय ना!ते प्रत्यक्षात पाहिल्यास काहीच नाही.."
माझी पुस्तकावरची नजर आता ढळू लागली होती आणि इकडे याची तोंडाची पट्टी सुरूच होती.
"अरे मी त्यांना प्रत्यक्षात पाहिलंय, काय त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज,तो गोरा रंग..पाहताच वाटावं या व्यक्तीत काहीतरी जादू आहे.."
"तुझ्या गुरुंसारखे असे जगात कितीतरी असतील" मी उगीच खोडा घातला.
"अं हं, हा तुझा गैरसमज आहे.तू त्यांना प्रत्यक्षात पाहिलं नाहीस ना? म्हणून!" पुन्हा तेच
"बरं, मला सांग तुम्ही तुमच्या गुरूंना किती फॉलो करता रे?"माझा प्रतिप्रश्न.
"त्याचा इथे काय संबंध?" त्याची शंका
"ते स्वयं शंकराचा अवतार आहेत" सर्व गोष्टींवर कडी करणारी त्याची पुस्ती.
"मला फक्त एव्हढंच सांगायचं आहे की ते तुझ्या माझ्यासारखेच एक मनुष्य आहेत." माझं ठोक उत्तर.
"तुला नाही समजायचं!"त्याने पॉज घेत माझ्याकडे तिरकस दृष्टिक्षेप टाकला.
"समजायचंय काय त्यात?मला फक्त एव्हढंच सांगायचंय की तुझ्या गुरुंसारखे प्रभावशाली व्यक्तित्व असणारे जगात कितीतरी लोक असतील.मला सांग तुझे गुरू इतकेच प्रभावशाली आहेत तर तुम्ही लोक त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुकरण का करत नाही?" माझा प्रतिहल्ला.
मला तात्याच्या व्यक्तिकेंद्रीत आंधळ्या गुरुभक्तीची मनस्वी चीड होती.
"म्हणजे?" तात्या
"म्हणजे,तुमच्या गुरूंनी तुम्हाला सेवा करण्यासाठी मग ती कोणत्याही प्रकारची असो करायला सांगितली आहे,बरोबर!" मी
"हो"
"मग मला सांग तू आतापर्यन्त किती सेवा केली आहेस?"
तात्या थोडा विचारात पडला आणि त्याने नकारार्थक मान हलवली.
"सेवा म्हणजे नक्की काय करायचं तेच समजत नाही रे!तुला काय वाटतं सेवा म्हणजे काय?"तात्याचा प्रश्न
"सेवा म्हणजे असं नाही की तू रस्त्यावरचा कचरा गोळा करत बस किंवा म्हाताऱ्या लोकांचे हात पाय दाबत बस! अरे सेवा म्हणजे रस्त्याने जाताना वाटेतील दगड अथवा काचेचा तुकडा बाजूला टाकलास किंवा साधा सिग्नल पाळल्यास ती समाजाभिमुख सेवाच नाही का? आणि एव्हढंच कशाला घरातही स्वतः चं अंथरून स्वतः च काढलंस तरी ती सेवाच!" शेवटी माझा त्याला उगीच एक टोमणा.
तात्या थोडा विचारात पडला,मला बरं वाटलं.
"कधीही सेवा आपल्या घरापासून सुरुवात केली तर चांगली.दिव्याखाली अंधार अशी स्थिती नको व्हायला!बाहेर मस्त रस्त्यावरचा कचरा साफ करायला झाडू घेऊन सरावतो पण घरातला कचरा साफ करायला वाकवत नाही, ही काही सेवा म्हणता येत नाही.ही तर विनोबाजींच्या गोष्टीतल्या मुलासारखी अवस्था जो पाय भाजू नयेत म्हणून अख्या जगाला चामडं अंथरायला चाललेला पण स्वतः पायात चप्पल घालायला विसरलेला" माझा उपदेश सुरूच होता,"प्रत्येकाने जर घरातूनच सेवा करायला सुरुवात केली तर कुणाला कुणाच्या सेवेची विशेष गरजचं उरणार नाही.याच प्रकारच्या सेवेने तुम्हाला मुक्ती मिळेल.म्हणूनच तर गौतम बुद्ध म्हंटले असावेत,जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुमची मदत केवळ तुम्हीच करू शकता"
तात्याने थोडा पॉज घेतला,
"नाही गुरुजीच आम्हाला मुक्ति मिळवून देतील"
माझा आनंद क्षणार्धात मावळला, माझ्या सांगण्याचा मतितार्थ त्याने समजून घेतला नसावा.
'याला म्हणतात आंधळे अनुयायी!' मला तात्याचं म्हणणं बिलकुल पटलं नाही .
"अरे गुरुजी काही तुम्हाला शेवट पर्यंत पुरणार नाहीत, त्यांच्या नंतर तुमच्या अशा वागण्याने त्यांनी शिकवलेले सर्व ज्ञान हवा होऊन जाईल कारण तुम्ही गुरुजींचे व्यक्ती पूजक आहात, त्यांच्या विचारांचे नाही.तुमच्या अशा वृत्तीमुळे गुरुजींनाही नाईलाजाने पुन्हा जन्म घ्यावा लागेल.त्यांना मुक्ती मिळणार नाही." मी
"शक्यच नाही,तू गुरुजींना नाही समजू शकत" इति तात्या
तात्याच्या आंधळ्या गुरुभक्तीने पुन्हा डोकं वर काढलं.
"बरं! मला सांग,गुरुजींनी उद्या काही अनैतिक कार्य केलं तरी त्यांच्यावरची तुमची भक्ती अशीच अढळ राहील का रे?" माझा परीक्षा घेण्याचा मुड झाला.
"गुरुजी तसं कधी वागणारच नाहीत" तात्याने मला साफ उडवून लावलं.
"अरे फक्त तसं समज!असं झालंच तर तुम्ही त्यांची साथ द्याल का?"
"हो देणारच!" तात्या ठाम होता.
"हे, यालाच म्हणतात आंधळे अनुयायी!" मी थेट मुद्दयावर आलो.
"तुम्ही जेव्हा एखाद्याला गुरू मानता तेव्हा तुम्ही तुमच्या श्रद्धेबरोबरच तुमची बुद्धीही त्या व्यक्तीकडे गहाण टाकता, आणि हाच तर मोठा प्रश्न आहे.भक्ती असावी, मात्र डोळस!गुरुचे अंधानुकरण करणारे अनुयायी नसून,गुरूच्या विचारांचा मतितार्थ जाणून त्यांच्या विचारांचं अनुसरण करणारे तेच खरे अनुयायी."
"बरोबर आहे तुझं!" तात्या विचाराधीन होऊन बोलला.मला समाधान वाटलं.आम्हा दोघा भावांचा वाद तिथेच संपला,पण काही दिवसांनंतर याचं विषयाला अनुसरून विचारांची आवर्तन सुरू झाली,कारणच तसं होतं.त्याच दरम्यान अण्णांचं (हजारे) उपोषण सुरू होतं. अण्णा उपोषणाला बसलेले होते दिल्लीला पण संपूर्ण देशभर त्यांच्या समर्थनार्थ आंदोलनाच पेव फुटलं होतं. सोशल नेटवर्क साईट्स,एस.एम.एस सगळीकडे अण्णाच - अण्णा भरून राहिले होते.माझा एक मित्र असाच एका सामाजिक संस्थेत सक्रिय होता.त्याने मला अण्णांच्या समर्थनार्थ बाईक रॅली मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं, पण मी थोडा दुविधेत सापडलो कारण त्यावेळी अण्णांचा आदेश होता की,'आंदोलन शांततेत पार पडावं, दुसऱ्या व्यक्तीला आंदोलनाचा त्रास होता कामा नये' मी विचार केला, बाईक रॅली म्हणजे शेकड्याने समर्थक जमा होणार.एका बाईक वर दोन म्हणजे कमीत कमी पन्नास बाईक्स तरी असणार मग वाहतुकीची कोंडी ओघाने आलीच. बाईक आहे म्हटल्यावर हॉर्न वाजवणं आलंच म्हणजे शांततेचा भंग आणि अण्णांच्या आदेशाचाही! नकार देणं मला भागचं होतं, मी त्याला फोनवर सौजन्याने रॅलीत सहभागी न होण्याचं कारण सांगितलं,अर्थातच ते त्याला पटलं नाही पण मग मी शांतता मोर्चात सहभागी होण्याचं आश्वासन दिल्यावर त्यानेही फोर्स केला नाही,पण अनुयायांच्या अंधानुकरणाचा प्रश्न काही सुटला नाही उलट ही समस्या मला आणखी प्रकर्षणाने जाणवू लागली.बहुतकरून समूह किंवा आपण ज्याला समाज म्हणतो तो इंडिव्हिज्युअली  इंटलेक्टच्युअल असला तरी तो एका ठिकाणी जमा झाल्यावर,एकत्रित आल्यावर भावना प्रधान होतो, त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन त्याच्याकडून निर्णय घेतले जाऊ शकतात.भलेही ते त्यांच्या लिडरच्या विरोधात का जाईनात.आणि आताच्या उदाहरणात तीच परिस्तिथी होती.अण्णांच्या आंदोलना मागची पार्श्वभूमीच फक्त आंदोलन करणाऱ्यांना माहीत होती 'भ्रष्टाचार' पण अण्णांना हे आंदोलन कशा प्रकारे म्हणजे शांततेत पार पाडायचं आहे हे ते सोयीस्करपणे विसरले.यामुळे होतं काय की विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच येतं आणि अनुयायांच्या धुसमुसळेपणाने चांगल्या कारणांसाठी पुकारलेल्या आंदोलनांनाही काळी किनार लागते.महात्मा गांधींनाही अशा अंधानुयायांचा फटका बसला आहे.दंगली मागचं कारणही पाहिलं असता अनुयायांचं अंधानुकरण हाच मुद्दा वर येतो.कोणी नेता प्रक्षोभक भाषण करतो आणि इकडे जनता पेटून उठते आणि हे तर त्रिकालबाधित सत्य आहे की जमावाला अक्कल नसते.तो भावना प्रधान असतो,त्यामुळे नुकसानीचीच शक्यता वाढते.
याचं पठडीतील आणखी एक उदाहरण येथे सांगणं योग्य ठरेल ते म्हणजे निर्मल बाबांचं.हे तेव्हा हाइलाईट झाले जेव्हा त्यांच्या पूर्व अनुयायांनीच त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.न्यूज चॅनलवर पूर्ण केस उलगडून दाखवल्यावर मला असं जाणवलं की बाबां विरोधात फसवणुकीची केस दाखल करणंच मूर्खपणा आहे.खरंतर या पूर्ण केसमध्ये बाबांपेक्षा जास्त चीड त्यांच्या भोळसट (की मूर्ख म्हणू?)अनुयायांची येत होती.हे अनुयायी बाबांकडे त्यांचे वैयक्तिक समस्या घेऊन यायचे आणि बाबा त्यावर अगदी बालिश वाटावे असे उपाय सांगायचे,जसं की;
भक्त : "बाबा,मला व्यवसायामध्ये फार नुकसान   होत आहे"
बाबा : "तुझं कुलदैवत कोणतं?"
भक्त : "आई माताजी!"
बाबा : "कुलदेवतेचं दर्शन घेऊन किती काळ लोटला?"
भक्त : "दीड - दोन वर्षे"
बाबा : "इथेच तर कृपा अडली आहे! कुलदेवतेचं दर्शन घे सर्व काही व्यवस्तीथ होईल"
किंवा दुसरं उदाहरण म्हणजे,
भक्त : "बाबा मला परीक्षेत यश येत नाही,काय करू?"
बाबा : "पेन कोणता वापरतोस?"
भक्त: "कोणताही" (बावचळून)
बाबा : "तरी काय किमतीचा?"
भक्त: "तीस - पस्तीस"
बाबा : "शंभर - दीडशेचा वापर,यश येईल"
भक्त : "बरं!"
वरील दोन्ही उदाहरण पाहिली तर आपल्याला सहज जाणवेल की,लोकांना त्यांचा रक्षणकर्ता हवा आहे जो त्यांचा पूर्ण भार घेईल,आणि अशावेळी एखादी व्यक्ती त्यांचा रक्षणकर्ता म्हणून उभी राहते आणि लोक त्याच्या चरणी आपली बहुमूल्य श्रद्धा वाहतात,आणि एकदा का श्रद्धेने कोणापुढे लोटांगण घातलं तर बुद्धीलाही शरणागती पत्करावी लागते,कारण प्रश्न विश्वासाचा असतो आणि  हीच तर खरी शोकांतिका आहे.विश्वास आणि अंधविश्वासातील फरक ओळखणारी बुद्धीच गहाण पडलेली असते.इथे निर्मल बाबांनी लोकांच्या भोळ्या श्रद्धेचा फायदा घेतला पण लोकांनीही त्याचवेळी अंतर्मुख होउन बुद्धीचा कौल आजमावला असता तर आपल्या अंधश्रद्धेची त्यांना व्यवस्तीथ जाणीव झाली असती व ते वेळीच सावध झाले असते. मग अशावेळी डेरा सच्चा सौदा मधील प्रमुख बाबा रामरहिम म्हणा किंवा राधे माँ म्हणा लोकांच्या श्रद्धेस तडा देतात व लोक फक्त आपला अहंकार आणि अनुयायित्व सिद्ध करण्यासाठी अंधपणे हिंसाचाराचा अवलंब करतात.
म्हणूनच सांगावसं वाटतं की लोकांनी डोळस श्रद्धा ठेवावी आणि आपल्या गुरू अथवा नेत्याच्या व्यक्तित्व अथवा वक्तृत्वावर वाहवत न जाता त्याच्या विचारांना जाणून घ्यावं आणि आपल्या बुद्धीचा कौल आजमावून मगच अनुयायित्व पत्करावं,तेच खरे अनुयायी!

                                 - विशाल बळवंत बर्गे