Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Tuesday, 30 December 2014

कर्मकांड

आज 'राजकुमार हिरानीचा' pk release होऊन दहा दिवस उलटून गेले आहेत आणि जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे धार्मिक संघटनांचे जत्थे त्याविरोधात लाठ्या काठ्या आणि जाळपोळीच साहित्य घेऊन नरसिंहाच्या अवतारात रस्त्यांवर उतरले आहेत.

आता यात राजकारणाचा भाग किती हा भाग अलाहिदा पण आपल्या लोकांची मनोवृत्ती किती अपरिपक्व आणि कुपमंडूक वृत्तीची आहे याच प्रत्यंतर येत. तस पाह्यला गेल तर चित्रपटात आक्षेपार्ह म्हणाव अस काहीच नाही, पण लोक कर्मकांडालाच धर्म समजु लागली आहेत त्यात त्यांचा तरी काय दोष. हजारो वर्षांपूर्वी जी   स्थिती  हिंदू धर्मात निर्माण झाली होती त्याच मुळ हेच होत. त्यावेळी गौतम बुद्धांनी याच कर्म कांडाविरोधात आवाज उठवला होता अगदी निशस्त्र होऊन आणि आज बुद्ध धर्म जगात दुसरया क्रमांकाचा धर्म आहे.पण यात सुद्धा एक गोम आहे, अहिंसेचा संदेश देणारा बौद्ध धर्माचा अंगिकार केलेला चीनसारखा मोठा देश जेव्हा आपली ताकत आजमावू पाहतो, आपल्याच शांतीप्रिय शेजारयावर कुरखोडी करून अशांतता पसरवतो तेव्हा तो आपला मूळ धर्म विसरून कर्मकांडालाच महत्व देत नाही का?

तशीच स्थिती आज भारतीय राजकीय जीवनात निर्माण झाली आहे. कर्मकांड सगळीकडेच फोफावलं आहे शिक्षण, सहकार,साहित्य, क्रिडा आणि समाज सगळीकडेच… जिथे-जिथे मूळ हेतूला तिलांजली देऊन निव्वळ औपचारिकता बळावते तिथे कर्मकांड वाढणारच. आज भारतात फार मोठया प्रमाणावर पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात पण राजरोसपणे आणि अवास्तव रित्या वाढणारया फि विरोधात कोणी आवाज उठवत नाही हे कर्मकांड. सहकारात राजकारण, भले सामान्य गरीब जनतेला आणि सहकाराच्या मूळ तत्वाला ते धरून का नसेना हे कर्मकांड. साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला साहित्यिक कमी आणि गावगन्ना पुढारी जास्त हे कर्मकांड. क्रिडा संघटनांच्या सर्वोच्चपदी राजकारणी हा अलिखित नियम भले त्याचा खेळाशी बाप जन्मी संबंध का आला नसेना हे कर्मकांड. आणि सर्वात महत्वाच सार्वजनिक निवडणुकात राजकीय वारसा आणि घरातुन आलेल्या उमेदवारालाच निवडून देणे भले तो लायक का नसेना  हे कर्मकांड...

आवाज उठवायाचाय तर ह्या विरोधात उठवा. pk चित्रपटातील धार्मिक मुद्दा हा फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, आपल्या देशात तर कर्मकांड सगळीकडेच आहे आणि दुर्दैव हे कि तोच आपला सध्याचा धर्म आहे.
आज आपल्याला या कर्मकांडा विरोधातच आवाज उठवायचा आहे, कारण जे लोक कर्म कांडालाच महत्व देतात ते मानसिक दृष्ट्या दुबळे आणि गुलाम होतात. आणि अशा गुलामी मनोवृत्तीच्या लोकांवर परकीय शक्तींना राज्य करण नेहमीच सोप जात जे याआधी इंग्रजांनी सिद्ध केल आहे. आणि आज अप्रत्यक्षपणे अमेरिका आपल्या social service द्वारे आणि चीन बाजारपेठांवर वर्चस्व गाजवून हे सिद्ध करत आहे. तेव्हा आपण वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

सरतेशेवटी या विचाराला पुरक असा स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील एक प्रसंग फार बोलका आहे.
स्वामी विवेकानंदांना मांसाहार खाण्यातच नाही तर मांसाहारी अन्न बनवण्यात हि आवड आणि रुची होती. तेव्हा रामकृष्ण परमहंसांच्या काही शिष्यांनी त्यांच्यापाशी नरेंद्रच्या या रुची विषयी चाहाडी केली. रामकृष्ण आपला प्रिय शिष्य नरेंद्र कोण आणि कसा आहे हे चांगलेच जाणून होते. तेव्हा ते शांतपणे आपल्या शिष्यांना एव्हडढेच म्हणाले 'मी गाईला कधी खोटे बोलताना पाहिले नाही, पण गाय ती गायच राहते...

(प्रिय वाचक तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबीयांना नववर्षाच्या हार्दिक - हार्दिक शुभेच्छा. या नववर्षात तुम्ही आपल्या देव, देश आणि धर्माबद्दल जागरूकपणे विचार करावा अशी सदिच्छा...अस्तु )    

Saturday, 13 December 2014

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेले सुखद अनुभव रुंजी घालत होते… बारा तास अडून राहिलेले messages धडा धड टिक टिक  करत अक्षरश:  कोसळत होते. एक एका group वर पंधरा ते वीस pending messages highlight होत  होते.

बहुदा असे message काय असेल अशी उत्सुकता निर्माण करतात, मी हि उत्सुक होतो... म्हणून एका group वर मी click केल आणि माझा सर्व मुडच बदलुन गेला... पहिला message एका भिबत्स बलात्कारा संधर्भात होता. पण मग गोष्ट इथेच संपत नव्हती, त्या खालो-खाल त्या पिडीतेचे तितकेच भयाण आणि भिभस्त pics टाकले होते. साहजिकच त्या message मध्ये त्या घटनेचा स्पष्टपणे निषेध केला होता पण एव्हढच पुष्कळ आहे ?

जेव्हा पासुन लोकांकडे smart phones उपलब्ध झाले आहेत twitter, whtsapp आणि facebook सारख्या social networking sites ची विपुलता निर्माण झाली आहे, तेव्हापासून लोकांकडे media सारख एक सशक्त माध्यम एखाद्या खेळण्यासारख उपलब्ध झाल आहे. पण त्याचा वापर कितपत आणि कसा करावा याची तितकी समज त्यांच्यात विकसित झाली नाही . हि गोष्ट या  घटनेपुरतीच मर्यादित नाही, तर बरयाचदा खुन, अपघात अशा दुर्दैवी घटनांचे विदारक चित्रण आणि अनाठायी तपशील दिला जातो याचा परिणाम असा होतो कि लोकांना अशा घटनांचे बळी ठरलेल्यांबद्दल सहानुभूती वाटते, पण त्यात अनुभूतीचाच भाग अधिक असतो, आणि जेव्हा अनुभूतीचा अतिरेक होतो तेव्हा ती विकृती धारण करते, आणि हळू-हळु  अशा घटनांच्या post पाहणे हि निव्वळ उत्सुकता राहते आणि जिथे निव्वळ उत्सुकता राहते तिथे अशा घटना आणि त्यांच छायाचित्रण किंवा चित्रीकरण एक मनोरंजनाच साधन बनुन राहतात.

दुर्दैवाने  या social साक्षरतेच्या अभावी जगात आणि भारतात अशा कित्येक विकृत स्वरूप धारण केलेल्या post वनव्या सारख्या पसरत आहेत. ज्या लोकांच्या भावना बधीर करत आहेत. जस शस्त्रक्रिया करताना डॉक्टर त्या अवयवाची चिरफाड करतो पण ती जाणवत नाही, पण शस्त्रक्रिया आपल काम मात्र करत असते. तशा प्रकारे या posts लोकांच्या भावना बधीर करून त्यात विकृती पसरवण्याच काम करत आहेत. आणि  आश्चर्याची गोष्ट म्हणजे हि विकृती पसरवण्याच काम आपण स्वतः च करत आहोत.

अस म्हणतात कि समाजाचच प्रतिबिंब माध्यमांद्वारे व्यक्त होत. तेव्हा अशा समाजात एखाद्या दुर्दैवी घटनेत बळी गेलेल्या मुलाच्या आईला किंवा आत्याचारीत मुलीच्या वडीलांना किंवा स्वतः पिडीत व्यक्तीला 'आप को कैसा लग रहा है?'  हा प्रश्न सहजपणे विचारला जातो, तिथे सनसनीखेज बातम्यांमध्ये निव्वळ उत्सुकता चाळवणारे प्रसंग दाखवले जातात, तिथे अपघात किंवा अगदी बलात्कारासारखे प्रसंग चित्रित करायला कॅमेरे सरावतात पण मदतीचा हात पुढे येत नाही.

मित्रांनो, समाज पुरुष हा एक फार मोठा प्राणी आहे. तिथे कोणाला दोषी ठरवता येत नाही, मात्र दोषी सर्वच असतात. तेव्हा जागरूक व्हा... आत्मपरीक्षण करा. घडणारा प्रसंग घडून जातो, अत्याचारी त्याच काम करून शिक्षाही भोगतो, पण अशा दुर्दैवी घटनांचा प्रसार करून आपण अप्रत्यक्षपणे त्या घटनांच उद्दतीकरण तर करत नाही ना? याच भानही ठेवायला हव.

शेवटी भावना दाखवण्याची नाही तर व्यक्त करण्याची गोष्ट आहे. सोप्या भाषेत सांगायच तर कॅलेंडर वरच्या मॉडेल्स भावना (?) दाखवतात तेव्हा तोंडातून 'आह' येत... पण जेव्हा तीच भावना एखादी अभिनेत्री फक्त डोळ्याने व्यक्त करते तेव्हा आतून 'वाह' येत. बाकी सांगणे न लगे तुम्ही सुज्ञ  असा. 

अस्तु ….  

Monday, 14 April 2014

एक आणि एकी

काल एका न्यूज चैनल वर एका राजकीय पक्षाच्या सभेसाठी जमा झालेल्या जनतेच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. लोक उत्साहाने सभेस आले होते. २५-३० किलोमीटर दूर  अंतरावरूनही आले होते आणि येताना  जेवणासाठी डबेही घेऊन आले होते...

जो तो त्यांच्या नेत्याचे समर्थन करत होता. त्यांचच सरकार  याव अशी इच्छा जाहीर करत होता. बहुतांश समाज कष्टकरी वर्गातलाच दिसत होता आणि इकडे बातमीदार त्यांच समर्थना मागील इस्पित जाणू इच्छित होता. तो धूर्तपणे म्हणाला 'उच्च वर्गातील लोक तर यावेळी दुसरयाच पक्षाला समर्थन देणार आहेत' त्यावर बहुतांश लोकांच एकच उत्तर आमचाच नेता निवडून येईल....

इथे जाणून  घ्यायचा मुद्दा एकच, आणि तो म्हणजे आपला भारतीय समाज स्वतः भोवतीच्या  कोशातच कसा गुरफटला आहे... निवडणुकीत जात हा मुद्दा किती परिणाम कारक ठरू शकतो...आणि या एका गोष्टीनेच भारतीय समाज कसा विभाजित झाला आहे...

इथे  मतदार फक्त मतदार न राहता 'अल्पसंख्यांक' आणि 'जातीय' कक्षेत मापला जातो. त्यामुळे सार्वजनिक स्तरावर देशाच हित पाहिल न जाता समाज आपल्या समुदायाच हित पाहू लागतो आणि इथेच एकीच बळ कमी पडत. जेव्हा एकीच बळ कमी पडत तेव्हा समाज दुबळा होतो आणि दुबळा समाज असलेला देश स्वतंत्र नसतो.

इतिहासात डोकावून पाहिल तर आपल्या याच दुर्बलतेचा फायदा पूर्वी इंग्रजांनी घेतला आणि आता आपलेच काही देश बांधव  घेत आहेत, आणि हे सत्य आहे की दुबळी व्यक्ती आणि समाज केव्हाच  स्वतंत्र  नसतात. पूर्वी परक्यांनी गुलाम बनवल आज आपलेच बनवतायत. आपल्या  देशात डझनाहूनही जास्त राजकीय पक्ष असण्याच हेच कारण आहे.

आपल्या विखारी भाषणात काही नेते  मग विशिष्ठ  समुदायाला खुश करण्यासाठी बेताल वक्तव्य करतात पण निषेध करण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, कारण आपण निर्बल आहोत आणि आपल्यात एकी नाही तेव्हा जागे व्हा देश हितास प्राधान्य द्या समुदायास नाही. 'एकी दाखवा एक व्हा'...

Saturday, 12 April 2014

लागे-बांधे

 सध्या राजकीय वातावरण चांगलाच तापल आहे, प्रत्येक जन एकमेकांची जुनी प्रकरण उकरून काढत आहे. कोणी धार्मिक, कोणी उद्योग जगातील लागेबान्ध्यांची आणि जमल्यास अनधिकृत बांधकामांची.... पण कोणालाही जनतेबद्दलचा विशेष कळवळा दिसून येत नाही.

जुनी प्रकरणे उकरण्या ऐवजी ती वेळीच निदर्शनास आणून होऊ घातलेले गैर व्यवहार का रोखले जात नाहीत? कारण तस साफच आहे दुसरयाकडे बोट दाखवणारा हेही जाणून असतो की उरलेली चार बोटे त्याच्याकडे आहेत विशेषतः राजकारणात तरी...

एकदा का राजकीय निवडणुकीचे रंग उतरले की विविध पक्षांचे तुझ्या गळा माझ्या गळा सुरु... जनतेचे प्रश्न दुय्यम आणि प्रतिनिधींचा वैयक्तिक स्वार्थ प्रार्थमिकता प्राप्त करतो. संसदेतील खासदारांच्या वाढवण्यात आलेल्या भत्त्या संदर्भातील प्रकरण सर्व परिचित आहेच.

अशा वेळी रवींद्रनाथ टागोर यांचे विचार योग्य वाटतात ते असे की "आपणाला जे पाहिजे ते सरकारने लगेच दिले तर सरकार व प्रजा यांच्यात सलोखा निर्माण होईल असे काहींना वाटते, पण एका बाजूने भीक मागणे व दुसरया बाजूने भीक घालणे या गोष्टी संपणार कधी?"

इथे टागोरांना हेच सांगायच आहे की प्रजेने सरकारचे मिंधे न राहता स्वतः हून  पुढाकार घेऊन देश सेवा करावी तरच देशाचा उद्धार होईल. बाकी एक सरकार जाऊन दुसर येईल, हे चक्र सुरूच राहणार... मग काय आपण दरवेळी आशाळभूतपणे कोणा पक्ष किंवा व्यक्तीकडे पाहत राहणार? की जो आपला उद्धार करील....

राष्ट्रात कोणी एक व्यक्ती कधीच हिरो होऊ शकत नाही कारण राष्ट्र निर्माण हे सामुहिक कार्य आहे, कोणा एका व्यक्तीच नव्हे... तेव्हा विचार करा आणि राष्ट्रासाठी मतदान करा कोणा व्यक्ती किंवा पक्षासाठी नव्हे.

Tuesday, 8 April 2014

साधन आणि साध्य

 'धड पड करून शहाणे लोक घरे का बांधतात? पाहुण्याला जेवण देता यावे व वाटसरूला आधार देता  यावा म्हणून.'
                                                                                                                                    - तिरुवल्लुवर

 वरील सदविचार प्रसिद्ध तामिळ लेखक तिरुवल्लुवर  यांचे आहेत. त्यांच्या 'कुरल' या ग्रंथात अंकित केलेला वरील एक विचार, असे अनेक विचार  त्यांनी या ग्रंथात लिहिले आहेत. सध्या वन आणि टु बी एच के च्या धडपडीत माणूस  मरे तोवर कष्ट करतो पण वरील साध्या गोष्टीची यत्किंचित जाणीव हि त्याला नसते.

 जेव्हा साध्यापेक्षा साधन हावी होत तेव्हा माणूस खरया आनंदा पासून दूर होत जातो. म्हणून साधन प्राप्त करा पण साध्य  विसरू नका, आणि हिच शिकवण ज्येष्ठ लोकांनी सांगितली आहे. तेव्हा तीचा आदर करा आणि जीवनाचा  खरा आनंद घ्या.

Sunday, 6 April 2014

असंतोष

असंतोष... एक मानसिक अवस्था. असंतोष दोन प्रकारत विभाजित होऊ शकतो, सकारात्मक असंतोष आणि नकारात्मक असंतोष. सकारात्मक असंतोष  हा स्वकेन्द्री असतो जिथे व्यक्ती स्वतः आणि आसपासच्या वैयक्तिक वर्तुळा संबंधी अधिक सुधारणेच्या हेतूने असंतुष्ट असतो.

याउलट नकारात्मक असंतोष समाज केन्द्री असतो. जिथे व्यक्ती हि समाजाचा भाग बनते आणि सामाजिक सुधारणे संदर्भात असंतुष्ट असते पण या असंतोषाचा एक तोटा असा कि तिथे वैयक्तिक स्वार्थाच विभाजन झाल्याने सुधारणेची भावना टिकात्मक दृष्टीकोन घेतो.

म्हणून सामाजिक असंतोष नाहिसा करायचा असेल तर समाजात राष्ट्र आणि धर्माबद्दल अस्मिता निर्माण करणे आवश्यक आहे. अस्मिता स्वाभिमान जागृत करते आणि स्वाभिमान जबाबदारीची जाणीव निर्माण करतो आणि समाजात सुधारणेची भावना विकसित होते.  


Saturday, 5 April 2014

सत्संग

माणसाला सार्वजनिक जीवनात सत्संग फार महत्वाचा आहे. सत्संग म्हणजे तुमच्या आतील मूळ अध्यात्मिक आणि मानसिक शांततेला आव्हान करण्याची प्रक्रिया.

नेमस्त जीवनात काम आणि घर या दोन बिंदुवरच केलेले आवागमन खचितच मानसिक शांतता देईल, पण एक सत्संग जी उर्जा देईल ती कदाचित तुमच्या अंतरात्म्याला साद घालण्यास पुरेशी ठरेल.

महासत्संग 
परम पुज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या सान्निध्यात 

तारीख : ५ एप्रिल २०१४ 
वेळ : सायंकाळी  ६. ३० वाजता 
स्थळ : बालेवाडी स्टेडियम, पुणे  
आमंत्रण : सार्वजनिक

Friday, 4 April 2014

पाच वर्ष नमस्कार

एक पक्ष, एक चेहरा- अब की बार एक सरकार

नवा चेहरा, जुना पक्ष- फिर एक बार हमारी सरकार

नवा चेहरा, नवा पक्ष- बदलाव लायेंगे इस बार

झोपलेले मतदार, जाहिरातींची भरमार

कोणाच सरकार अन कोण मतदार?

आश्वासनांनचा भडीमार आणि मी सच्चा उमेदवार

एकदा निवडून द्या मला म्हणजे पाच वर्ष नमस्कार....  

Thursday, 3 April 2014

सत्यशोधक - ९

समारोप 

काळाच्या अभ्यासापेक्षाही काळ समजून घेण आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीच मूळ समजून घेण्यासाठी आधी तिची सर्वसाधारण  संकल्पना समजून घेण आवश्यक  असत.

काळाची मूळ संकल्पना प्रवाहीपणाची आहे. काळाच्या प्रवाहीपणाची संकल्पना जर आपण आपल्या मनात रुजवली व त्यानंतर काळाचा अभ्यास करून त्याचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल.

काळच जर आपल्या अस्तित्वाच प्रमुख कारण आहे तर आपण त्याचा अधिक अभ्यास करून व त्याची रहस्यमय पदरे उलगडून आपल्या अस्तित्वाच रहस्य नक्कीच शोधून काढू, व जे पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व  यथार्तपणे सिद्ध करू.... कारण  आपण म्हणजे स्वयं काळच आहोत, सर्वशक्तिमान, मुक्तचैतन्य, अनादी, अनंत...


समाप्ती 

Tuesday, 1 April 2014

सत्यशोधक - ८

वेदांच अद्वैत तत्वज्ञान आणि काळ 

 अद्वैत तत्वज्ञान म्हणजे अशी विचारसरणी की, सृष्टीत अस्तित्वात असणारी समस्त जीवसृष्टी एकाचा अंश आहे किंवा परस्परात कोणताही भेद नसणे. अर्थात अहंबोध न ठेवता इतरात परमेश्वर पाहणे. काळ आणि या अद्वैत तत्वज्ञानाची सांगड घालून सांगायच तर ;

आपण सर्वजण काळाचीच निर्मिती अथवा त्याचाच एक अंश आहोत. म्हणजेच  आपल्याला परस्परात भेद  मानण्याचे काहीच कारण नाही. आपल्यातसुद्धा  प्रचंड  शक्तीचा स्त्रोत आहे व काळाप्रमाणेच आपण अनादी म्हणजे ज्याचा  कधी ही जन्म झाला नव्हता व अनंत म्हणजे ज्याचा शेवट नाही असे आहोत. व हेच तत्वज्ञान हिंदु धर्मात आत्म्याच्या आधारे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकंदरीत आपण स्वयं  काळ आहोत व समस्त सृष्टीत आपलाच आत्मा व्यापून राहिला आहे.    

सत्यशोधक - ७

 काळ आणि आपण

आता  पर्यंतच्या स्पष्टीकरनानंतर काळाची संकल्पना  स्पष्ट झाली असेल. काळाने भूत, वर्तमान, भविष्य सर्वकाही व्याप्त आहे. असा हा काळ सार्वकालिक आहे, बंधन रहित व सृजनशीलतेची उत्कटता आहे व आपण सुद्धा काळाचे अंश असल्यामुळे आपल्यातसुद्धा या गुणांचे अविष्करण झालेले दिसून येईल.

उदाहरण द्यायच तर आपण आपल्या मनाद्वारे भूत, वर्तमान व भविष्यात संचार करतो. तसेच वस्तुतः सर्व जीव बंधमुक्त आहेत परंतु संसाराच रहाटगाड सुरळीत चालावं यासाठी आपण स्वतःवर बंधन घातली आहेत. परंतु आपण निर्बंध आहोत हि संकल्पना जर आपण सूक्ष्मपणे तेवत ठेवली तर आपण नक्कीच अधिक उत्कर्षापर्यंत पोहोचून आपल्याला सत्यप्रकाश दिसेल.

Monday, 31 March 2014

सत्यशोधक - ६

काळाच्या शक्तिच मापन

काळाच्या प्रवाहाच सोदाहरण स्पष्टीकरण दिल्यानंतर काळाच्या शक्तिच मापन हा प्रश्न गौण राहणार नाही. काळ हा अनादी स्वयं पूर्ण असल्यामुळेच त्याच्या या गुणधर्मातच अखिल ब्रह्मांडाच्या व्युत्पत्तीचे सार आहे. ते असे कि काळ प्रवाही होता आणि आहे म्हणूनच विश्वाची व्युत्पत्ती झाली व भविष्यातील व्युत्पत्तीचे कारणसुद्धा काळच राहील.

जर हा काळ प्रवाही नसता तर अखिल ब्रह्मांडाची व्युत्पत्ती झालीच नसती, कारण काळ जर आपण स्थिर कल्पिला तर त्याच्यात चळवळ कशी होणार? चळवळी मुळेच कार्य होते व कार्यातून कारण आणि शेवटी आश्चर्यकारक इतिहास निर्माण होतो. सांगायचा मुद्दा हा की काळाच्या प्रवाहीपणाच्या गुणधर्मामुळेच चळवळ निर्माण झाली आणि त्या चळवळीचा परिणाम म्हणजे ब्रह्मांडाची व्युत्पत्ती.

 थोडक्यात सांगायच तर काळ हा शक्तीच्या परेय आहे. तो काल होता, आजही आहे, उद्याही राहील आणि शुन्यातही त्याच अस्तित्व कायम राहील. टिक... टिक.... टिक....

Sunday, 30 March 2014

सत्यशोधक - ५

काळाच्या अमर्यादित शक्तीचा दाता कोण ?

मागील प्रकरणाच्या स्पष्टीकरणानंतर हा प्रश्न तसा व्यर्थ आहे. काळाच्या शक्तीला कोणीही दाता नाही उलट काळातूनच शक्ती प्रस्तुत होते व त्यामुळेच काळाच्या शक्तीचा कोणी दाता नसून काळ हाच शक्तीचा दाता आहे. चार प्रकरणांच्या सम्पुष्टीनंतर  वाचकांच्या मनात एक प्रश्न आला असेल कि या लेखमालेत काळालाच कोणत्याही व्युत्पत्तीचा पाया का मनाला आहे?

तर उपरोक्त शंकेचे समाधान असे कि, तुम्ही अशी कल्पना करा कि अखिल ब्रह्मांडात काहीही नाही म्हणजे असतील नसतील तेव्हढे ग्रह, तारे, सूर्य, चंन्द्र व इतर अनेक लहान मोठे घटक एव्हढेच नव्हे तर ब्रम्हांडाच अस्तित्वच काही काळाकरीता बाजूला ठेवा तुम्हाला अस्वस्थ करणारी पोकळी अथवा पोकळी हि संज्ञाहि जिथे फिकी पडेल असे जे काही जाणवत आहे ह्या अवस्थेतच आपण काळाच अस्तित्व समजू शकतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे काळ हा प्रवाही आहे.

आता हि प्रवाहीपणाची गोष्ट नीट स्मरून त्या अवस्थेतच विचार करा कि आपण ज्या अवस्थेत आहोत तेथेही काळ प्रवाही आहे तो थांबलेला नाही कारण तो प्रवाही आहे म्हणूनच पुढे अखिल ब्रम्हांड निर्माण होणार आहे व त्या ब्राम्हंडात अगणित तारे, तारका, ग्रह, सुर्य, चंद्र व त्या अनुषंगाने परिस्तिथी व पोकळी यांच्या संयोगाने निर्माण होणारया हवा, ध्वनी, प्रकाश इत्यादी कार्यकारणिक गोष्टी निर्माण होणार आहेत.

वरील अवस्थेच्या अनुभवानंतर एक गोष्ट लक्षात आली असेल कि जेव्हा आपण काही नाहीची कल्पना करतो तेव्हासुद्धा काळ प्रवाही असतो. त्या शिवाय का आपण अस म्हणू शकतो कि मी हा अनुभव घेतला, कारण अनुभव घेते वेळीसुद्धा जो काही तुमचा काळ निघून जातो तोच काळाची साक्ष पटवून देण्यास समर्थ आहे. म्हणूनच काळ हा सदैव व निरंतर प्रवाही आहे व त्याला आदी, मध्य व अंत नाही आणि त्यामुळेच काळ हा समस्त  सृष्टीचा आद्यकारण आहे .

Saturday, 29 March 2014

सत्यशोधक - ४

जो स्वतः  स्वयंपूर्ण आहे ज्याला कोणत्याही प्रकारच बंधन नाही व ज्याच्या प्रत्येक हालचालीत सामर्थ्य आहे व ज्याच्यामुळे शक्तीला शक्ती हे संबोधन आहे तो हा काळ. आणि काळाचे सामर्थ्य हेच की काळ हाच शक्तीचा कारक आहे.

याच सोदाहरण स्पष्टीकरण अस की, आपण निसर्गाच्या सानिध्यात असता जेव्हा  मंद सुगंधीत हवेचा झोका जाणवतो तेव्हा त्या सुगंधाच रहस्य आपण तत्काळ ओळखतो व ते कारण म्हणजे फूल. कारण  फुलामुळे सुगंध आहे सुगंधामुळे सुगंध नाही.

बोध असा की फुलातच सुगंध प्रसवायच सामर्थ्य आहे, तद्वतच काळातच शक्ती प्रसवण्याचे सामर्थ्य आहे कारण शक्तीमुळे काळ नव्हे तर काळामुळे शक्ती आहे.

Friday, 28 March 2014

सत्यशोधक - ३

काळाला नियमाचे बंधन का नाही?

काळ हा जर नियामातीत असेल तर त्याला प्रवाहीपणाचा नियम का लागू होतो? असा प्रश्न बहुतेकांना जरूर पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये नाकाद्वारे श्वास घेऊन तो तोंडा वाटे सोडतो. हि क्रिया नियम नसून ती जगण्यासाठी आवश्यक अशी वृत्ती अथवा गरज आहे व गरज हि कधी नियमांनी बाध्य होत नाही.

वरील उदाहरणाद्वारे आपल्याला समजलेच असेल की काळाचा प्रवाहीपण हे नियम बद्ध नसून ती एक स्वाभाविक वृत्ती आहे.

Thursday, 27 March 2014

सत्यशोधक - २

नियम 

काळाचा नियम सांगण्याआधी नियमाचा इष्ट अर्थ सांगणे योग्य ठरेल ;
" मोठ्या अथवा लहान स्तरावर भौतिक अथवा आदिभौतिक रहाटगाडे सुरळीत चालण्यासाठी, त्या स्तरावरील जीवांसाठी जी बंधने घातली जातात अथवा असतात त्याला नियम असे म्हणतात. "

वरील नियमाची व्याख्या पाहता काळाला  नियम लागू होत नाही हे स्पष्ट होते. कारण या ठिकाणी आपण काळ हि वस्तु (भौतिक) गृहीत न धरता एक विषय (*आस्तिक्य) म्हणून पहात आहोत. आणि या आधी स्पष्ट केल्याप्रमाणे काळ हा भौतिक व आदिभौतिक विश्वाचा कारक आहे व त्यामुळे नियम व बंधनातीत आहे.
खरे पाहता नियम हा *मायेचा अविष्कार आहे.





*आस्तिक्य : भौतिक कक्षेत न येणारी पण अस्तित्वात असणारी किंवा जाणवणारी 
* माया :        गृहीतकांवर आधारित गोष्ट (अध्यात्मिक अर्थ नाही) किंवा जी गोष्ट मुळात नसते पण मानतात. (माया *सापेक्ष असते)
 *सापेक्ष :      व्यक्ती परत्वे बदलणारे एकाच विषयाचे आयाम

 

Wednesday, 26 March 2014

सत्यशोधक - १

प्रस्तावना 

सत्य हे सदैव अविचल आहे. सत्य हे काळाचेच एक अविचल आणि प्रवाही स्वरूप आहे. होय, काळ... काळ हाच ईश्वर आहे, समस्त ब्रम्हांडाचा नियंता आहे. संपूर्ण ब्रम्हांडात जेव्हा काही अस्तित्वात नव्हते एव्हढेच नव्हे तर स्वयं ब्रम्हांड सुद्धा अस्तित्वात नव्हते तेव्हासुद्धा हा काळ अस्तित्वातच होता. आणि तो नुसता अस्तित्वात नव्हता तर तो प्रवाही होता.

काळाच्या प्रवाहामुळे ब्रम्हांड निर्माण झाले, ग्रह निर्माण झाले, अगणित तारे, सुर्य, चंद्र, त्या ग्रहांवर अस्तित्वात असलेले अगणित लहान-मोठे-सुक्ष्म जीव निर्माण झाले.चक्रावून सोडणार अमर्यादित कल्पनातीत विश्वसुद्धा काळाचच एक अंग आहे.

काळ हि गोष्ट व्याखेत कैद करण्याइतपत जरी सोपी नसली तरी थोडक्यात सापेक्ष दृष्टीकोनातून काळाची व्याख्या अशी होऊ शकते ;
" जो अनादी आहे व साहजिकच अनादी असल्यामुळेच जो अनंत आहे व जो प्रवाही आहे तसेच नियम व बंधनापलीकडील असून जगत्कारण आहे तो काळ होय "

Tuesday, 25 March 2014

कालाय तस्मै नमः

 दिनांक २३ जून २००७, वार शनिवार. या दिवशी मी काळ या विषयावर तात्त्विक आणि चिंतनात्मक विवेचन लिहायला सुरुवात केली, पण ते विवेचन पूर्णतः वैयक्तिक व माझ्या बुद्धीच्या मर्यादेत तसेच वाचन, पूर्व निरीक्षण आणि अनुभव या सर्वांच ते एक संचित होत.


उद्यापासून या ब्लॉगवर ते 'सत्यशोधक' या मथळ्याखाली  क्रमवार प्रसिद्धीस येईल. या लेखमालेला चिंतनात्मक स्फुट असेही म्हणू शकता. या आधीच्या विचार आणि कृती यावर आधारीत लेख मालेनंतर हा माझा दुसरा प्रयत्न. आशा आहे या आधीच्या लेखमाले प्रमाणे याच स्वागत होईल.

बाकी काळच प्रत्येक प्रश्नाच उत्तर देतो आणि देईल फक्त आपल्या हृदय आणि बुद्धीची कवाडे सतत उघडी ठेवा. तोपर्यंत, कालाय तस्मै नमः.....

Monday, 24 March 2014

जमाव

जमाव क्रोधच नाही तर आत्यधिक आनंदात हि हिंसक बनू शकतो. दोन तीन व्यक्तींचा पुढाकार जो चुकीच्या गोष्टींसाठी का असेना इतर अनेक जणांना चेतवतो.

जमावाची विचार प्रक्रिया बौद्धिक नसून भावनिक असते. त्यामुळेच जमावाला अक्कल नसते असे म्हणत असावेत. दंगल, समूह हत्या आणि सामुहिक बलात्कार सारखे गंभीर तर रेगिंग सारखे प्रार्थमिक स्तरावरील किरकोळ गुन्हे इत्यादी या सामरिक मानसिकतेचे प्रतिक आहेत.

अशा परिस्तिथित समाजातील कोणतीही व्यक्ती सापडू शकते. अशावेळी प्रत्येक व्यक्तीने आप आपली सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवली तर होणारे अनर्थ टळू शकतात. मग तुम्ही अत्याचारी गटातील एक असा अथवा पिडीत.

होत असलेली घटना चुकीची आहे हे लक्षात आल्यावर त्यातून स्वतः तर बाजूला व्हाच पण आपल्या सहकारयांना हि परावृत्त करा. 

Sunday, 23 March 2014

अहिंसेच तत्वज्ञान

महात्मा गांधींना सर्वजण एक अहिंसा प्रधान नेता मानतात. अहिंसा म्हणजे कोणावरही  शारीरिक किंवा   शाब्दिक प्रतिहल्ला न करणे किंवा कोणी एका गालावर मारल्यावर दुसरा गाल  पुढे करणे, हे आणि अस बरच काही....

पण महात्मा गांधींना अभिप्रेत अहिंसा हि अशीच होती का? अहिंसा हि भीरु वृत्ती दर्शवत नाही का? किंवा मग शांतता स्थापित करण्यासाठी निर्माण केलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेला सुद्धा स्वतंत्र सैन्य दलाची गरज का भासते? इत्यादी प्रश्न कदाचित आपल्या मनात येत असतील.

स्वातंत्र्य पूर्व काळात भारतात दोन गट होते, जहाल आणि मवाळ. जहाल हे गरज पडल्यास हिंसेचे हि समर्थन करायचे, तर मवाळ हे  शांततापूर्ण मार्गाने प्रश्न  सोडवण्यावर विशेष भर द्यायचे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे चंद्रशेखर आझाद यांच्या जहाल गटातील होते. आणि हिंसेचे समर्थन करताना भगतसिंग यांनी त्याला स्व-बचाव हे विशेषण दिल.

जर मी म्हणालो, महात्मा गांधींना अभिप्रेत अहिंसा तत्वज्ञानाला भगत सिंग यांच तत्वज्ञान पुरक किंवा समर्थनीय आहे तर.... कदाचित हे विधान विपर्यस्त वाटेल, पण दुर्बळ व्यक्तीच्या अहिंसेपेक्षा सबळ व्यक्तीची अहिंसा केंव्हाही श्रेष्ठ किंवा याच अर्थाने दुर्बळ व्यक्तीची हिंसा हि सबळ व्यक्तीच्या हिंसेपेक्षा समर्थनीय आहे हे खर अहिंसेच तत्वज्ञान.  

 खोलात जाऊन सांगायचं तर ज्याच्याकडे सत्ता आहे त्याने आपल्या सत्तेचा उपयोग न्यायासाठी करावा ना कि जोर जबर्दस्तीसाठी आणि जो निर्बल किंवा जन सामान्य आहे त्याने अन्यायाविरुद्ध दंड थोपटणे हे अहिंसे इतकच समर्थनीय आहे.

म्हणून आज आपण जेव्हढे महात्मा गांधी, विनोबा भावे यांना मानतो तेव्हढेच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनाही. आज २३ मार्च शहिद दिवस. आजचा ब्लॉग भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या सर्व जहाल आणि मवाळ क्रांतीकारकांना समर्पित. जय हिंद......

Saturday, 22 March 2014

गांधारी

हमारा हाथ आम आदमी के साथ, परिवर्तन, तरक्की इत्यादी...  इत्यादी... आणि बरच काही. ऐन लोकसभा निवडनुकीपुर्वी दिसणाऱया स्व-बखान छाप जाहिराती पाहून तहान लागल्यावर विहीर खोदने म्हणजे काय याचा प्रत्यय येतो.

आश्वासन देणे आणि जनतेच्या  भावनेशी खेळणे जणू राजनीतीचा भाग बनला आहे. आचार संहितेला तीलांजली देऊन एकमेकांवर राजकीय कुरखोडी आणि चिखलफेक करणे हे सुद्धा काही नवीन राहिल नाहीये. पण या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे भारतीय राजकारण, समाजकारण न राहता निव्वळ सत्ताकारण बनल आहे.

ज्या देशात शेकड्याने नुसते पक्षच आहेत तिथे स्वार्थीपणाचा कडेलोट होणे साहजिकच आहे, आपली प्रतिमा किती स्वच्छ आहे हे दाखवण्याकरता कोणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला हाताशी धरतात तर कोणी गरीबांचे स्व घोषित वाली होतात. सगळा फार्स... ब्रेंडीगसाठी आटापिटा.... जनतेला समजत नाही अशातला भाग नाही, पण गांधारी सारख अंधत्व आपण ओढवून घेतल आहे.

धृतराष्ट्राच्या जागी सरकार आहे जे नैतिक दृष्ट्या अंध आहे, जे बड्या कॉर्पोरेट हस्ती  उघडपणे देश नागवतायत हे पाहूनही पाहू शकत नाही. आणि सगळ्यात मोठी विडंबना हि कि देशाची लाज राखयाला ठेवलेली कृष्ण रुपी शासन यंत्रणा कलंकित नेत्यांनी गुलाम बनवली आहे.

या सर्व परिस्तिथित अमुलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर नागरी आणि राज्य विषयक ढाच्यामध्ये योग्य बदल करायला हवा त्याच पुनर्रमुल्यांकन व्हायला हव, हि आपल्या देशाची गरज आहे. मुळ जनलोकपाल विधेयकात याला पुरक बरेच मुद्दे आहेत आणि ते पारित झाल्यावर देशातील बरयाच समस्यांचे मुळापासून उच्चाटन होऊ शकते.... डोळ्यावरची पट्टी काढायची हिच योग्य वेळ आहे.  



 

Friday, 21 March 2014

कधी आपण

कधी आपण, ठरवतो एक होत दुसर
विचारतो एक, उत्तर मिळत तीसर
प्रयत्न करतो तीन तीनदा, यश मिळत चौथ्यांदा
सांगितल जरी चारवेळा, समोरचा ऐकतो पाचव्यांदा
कधी आपण, सोडणार आयुष्य मोजायच
कधी आपण, शिकणार आयुष्य जगायच
आकड्यांचा खेळ आयुष्यभर पाठ सोडत नाही,
मेल्यावरही मोक्ष आपल्याला 'दहाव्या' शिवाय लाभत नाही....

Thursday, 20 March 2014

मी माझे मला


दिवस रविवार. आळसावलेली सकाळ एका मित्राला फोन.....

"कसा आहेस मित्रा?"

"मी मजेत"

"आपण बरेच दिवस भेटलो नाही भेटायच...."

"अरे माझ्या मित्रांबरोबर बाहेर चाललोय"

"ठिक आहे पुन्हा भेटू"

"अरे एक मिनिट.... मला तुझी बाईक मिळेल? आपल भेटण पण होईल.... कस?"

???????????

"बोल ना!"

"मी  बाईक दिली असती पण माझे बाबा ओरडतील मला माफ कर"

(पलीकडून फोन कट )

Tuesday, 18 March 2014

सुख पाहता....

 सुख पाहता जवापाडे। दुःख पर्वता एवढे 
अनुरणीया थोकडा। तुका आकाशाएवढा 
बुजगावणे चोरा । रक्षणासे भासतसे 
मनाच्या तळमळे । चंदन ही अंग पोळे 
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे  

-संत तुकाराम

Monday, 17 March 2014

जो होली सो होली

 भारत हा सण आणि उत्सव यांचा देश म्हणतात. पण हे उत्सव फक्त उत्सवच नसतात तर त्या मागेही फार मोठे गर्भीथार्थ आणि पौराणिक कथा यांच अजब मिश्रण असत.

जस कि 'होळी'. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद जेव्हा होलीकेच्या  मांडीवर बसुन अग्नीत प्रवेश  करतो तेव्हा होलीका वरदान असूनही जळून खाक होते पण प्रल्हाद भक्तीच्या बळावर तरुन जातो. याचाच अर्थ असाही घेतात कि द्वेषमूलक वृत्ती प्रेमाने भस्मी भूत करता येते.

म्हणून जुने वाद आणि अहंकार सोडून 'जो होली सो होली, अब खेले रंगोली' म्हणत जेव्हा आपण आपल्या शत्रूला हि जवळ करतो तेव्हा खरया अर्थाने आपण होळी आणि रंगोस्तव साजरा करतो.  तुमच्याहि आयुष्यात वैरभाव विरहित, आनंदी वातावरण कायम रहाव हि शुभेच्छा!  

 

Sunday, 16 March 2014

बळीराजाचा बळी

मराठवाडा,विदर्भ या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरयांच जे आतोनात नुकसान झाल आहे ते पाहून कोणाचहि हृदय पिळवटून निघेल.

मुलाबाळा प्रमाणे जपलेली पिक जेव्हा एका दिवसात आडवी  होतात तेव्हा त्या शेतकऱयाला काय वाटत असेल? ज्या पिकांच्या भरवश्यावर त्याने बँकेतून लाखांनी कर्ज घेतल असत ते फेडण्याची विवंचना तर  असतेच, पण त्याहूनहि ती निसर्गा समोरची हतबलता काळीज कुरतडणारी असते.

मग अशा  स्तिथीत तो आत्महत्येचा मार्ग  पत्करतो.काही दिवसांनी सरकार शेतकऱयाच कर्ज माफ  करते, पण तोपर्यंत एका प्राणाची आहुती पडली असते. मग त्याच शेतकऱ्याचा मुलगा आपल्या कुटुंबासाठी नवी सुरुवात  करतो, आणि त्यासाठी जेव्हा तो पुन्हा बँकेची वाट पकडतो तेव्हा त्या चक्राची नांदी पुन्हा चाहूल देऊ लागते.

सरकार....! आता तरी जागे व्हा. अनुदान द्या..... हे दान नाही, हक्क आहे शेतकऱयांचा. त्यांना सहानुभूती नकोय.... संरक्षण हवय....बळीराजाचा बळी जातोय तो थांबवा.   

Saturday, 15 March 2014

चाणक्य नीती

आज आपण आपल्या समाजात एक गोष्ट सर्रास पाहतो. ती म्हणजे सत्ताधारी आणि अधिकारी व्यक्तींची अरेरावी. त्यांच्या समजुती नुसार त्यांना अडवणारे कोणी नसत. हि स्तिथी काही आजचीच नाही तर फार पुरातन आहे .

चाणक्य नीतीत आर्य चाणक्यांनी याच फार सुंदर उदाहरण दिल आहे;

'समाजात सशक्त  व्यक्तीचे अनुचित कार्य  हि उचित  समजल जाते.  आणि निम्न स्तरावरील दुर्बल व्यक्तीचे उचित कार्य सुद्धा दोष युक्त दिसून येतात. जसे राहु  दैत्याने अमृत पान करणे हेच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले.'

यातील शेवटची ओळ बरच काही सांगून जाते....


Thursday, 13 March 2014

शस्त्र आणि वाद

जगातील ११५ देशांपैकी १५ प्रमुख अण्वस्त्रधारी देश आहेत.भारतातर्फे १९८८ दरम्यान अण्वस्त्रबंदीचे प्रथमोच्चरण पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले.परस्पर संवादातील कमतरता व एकमेकांबद्दल वाटणारी भीती हि अण्वस्त्र निर्मितीची प्रमुख कारणे आहेत. अमेरिका व रशिया हि अण्वस्त्र निर्मितीत अग्रणी आहेत.

उपरोक्त दोन्ही देश अनुक्रमे भांडवलशाही व साम्यवादी असे कट्टर आहेत. व यातूनच दोन्ही देशात कितीतरी  दशके शीतयुद्ध चालू होते या दोन्ही देशांमध्ये जगातील प्रमुख देश आपल्या बाजूने ओढण्यासाठी धडपड चालू आहे यातूनच कितीतरी देशात वैचारिक दुफळी निर्माण झाली आहे.

एक गट साम्यवादी तर दुसरा कम्युनिस्ट तर तिसरा मार्क्सवादी. या प्रत्येक वादानेच संपुष्टात येणारया पक्षांच्या पायाशी वैचारिक क्रांती आहे, विचारवंत आहेत. परंतु लोक हे विसरतात कि विचारवंताचे विचार हे त्यांच्या बौद्धिक क्षमतेशी सुसंगत असतात व त्या विचारावरही त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीचा प्रभाव पडत असतो.

यातूनच ज्या लोकांना ज्या विचारवंताचे विचार  पटतात ते लोक एखादा गट स्थापन करतात व आपल्या विचारवंताचाच उदो उदो करतात. त्यांचा इतर जनतेच्या भावविश्वाशी कोणताही संबंध नसतो. म्हणजे आजकाल समाजाचे आयाम बदलले आहेत पण संदर्भ मात्र तेच राहिले आहेत.

पूर्वी धर्माच्या नावाने तंटे होत आता वैचारिक तंटे होत आहेत. यातील प्रत्येक गोष्टीचा निकाल फक्त एका तटस्थ पंचाद्वारे होतो आणि तो म्हणजे शस्त्र ज्यांना कोणतीही जात धर्म नसते किंवा नैतिकतेची बंधने नसतात.आल्या तारखेला होणारे हिंदू-मुस्लिम दंगे काय किंवा काल परवा झारखंडमध्ये झालेले माओवादी अतेरीक्यांचे हल्ले काय यांची पाळेमुळे इतक्या खोलवर आहेत.      

Wednesday, 12 March 2014

हर शाख पे उल्लु...

सध्या राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपा संबंधात जे महाभारत सुरु आहे त्यातून आपल्या सारख्या मतदारांना बोध घेण्यासारख बरच काही आहे.

'तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे' हा वाकप्रचार अशावेळी आयाराम गयाराम उमेदवारांना चांगलाच लागू होतो. हे जे बहु प्रतिष्ठित उमेदवार ज्यांनी मोठ- मोठाली पदे भूषवली असतात ते त्यांच्या प्रभागातील जनतेच्या बळावर आपल्या पक्षाला हि आपला दास बनवू इच्छीतात.

पूर्वी कधी पक्षाचा झेंडा मिरवणारे हेच उमेदवार जेंव्हा तिकीट वाटपामुळे नाराज होतात तेव्हा त्यांची पक्ष निष्ठा कुठच्या कुठे विरून जाते आणि ते साळसूदपणाचा आव आणत बंडाचा झेंडा उभारतात आणि दुसरया पक्षात सामीलही होतात.

पण त्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांच्या मनः स्थितीचा होणारा विचार ते करतात का ? पक्षाच्या तत्वाला बांधील राहुन त्या उमेदवारासाठी राबणाऱया लोकांपुढे कोणता पर्याय राहत असेल याचा विचार ते करतात का? नाही ना... जेव्हा  पक्षापेक्षा उमेदवार किंवा नेता मोठा होतो तेव्हा नेहमी अशीच स्थिती निर्माण होते.

तेव्हा मित्रांनो तुम्ही कोणत्या का पक्षाचे असा, पक्षाच्या तत्वाशी बांधील राहा उमेदवाराशी नाही. कारण तत्व नेहमी तशीच राहतात पण माणसे बदलतात. तेव्हा सावधान... राहता राहिला प्रश्न दल बदलू उमेदवारांचा, ते तर आपण दररोज त्यांच्या कोलांट्या उड्या टीव्ही चैनल वर पहातच आहोत ते पाहुन हटकून एक शेर आठवतो ;

बर्बाद गुलिस्तां करने को तो एक हि उल्लु काफी था
यहां हर शाख पे उल्लु बैठा है अंजाम- ए-गुलिस्तां क्या होगा?  

Tuesday, 11 March 2014

प्रतिबंध

याआधीच्या परिस्तिथी आणि विचार यांच्या अनुषंगाने लिखित ब्लॉग चा मूळ हेतु सामाजिक अपराधामागील शास्त्र सांगण्याचा होता.

परिस्तिथीची प्रतिकूलता किंवा अनुकूलता आणि त्या अनुषंगाने येणारे विचार आणि विचारा प्रमाणे कृतीसाठी अग्रेसर होणारी मानवीय वृत्ती यांचा व्यवस्थित ताळेबंद मांडून अभ्यास केला असता अस लक्षात येईल कि मानवीय मनोवृत्ती सामाजिक दृष्ट्या अनियंत्रित असली तरी तिला वळण लावून तिच्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकत.


 सामाजिक  अपराधांच्या निरसनासाठी प्रतिबंधात्मक उपायच रामबाण ठरू शकतात. यासाठी आवश्यक आहे शालेय स्तरावर विदयार्थ्यांना (भावी नागरिक) मानसिक प्रशिक्षण देण, ज्यामध्ये अंतर्भाव होऊ शकतो ;

  • आंतरिक शांतता 
  • भावना हाताळणे 
  • सहानुभूती /आदर इत्यादी मुल्ये 
  • परिस्तिथिचा स्वीकार 
सध्या शाळांमध्ये मूल्यशिक्षण हा विषय असेल तर तो थियरोटिकल न राहता जास्तीत जास्त तो प्रक्टीकल व्हावा आणि सर्वात महत्वाच म्हणजे  मूल्यशिक्षणाची जबाबदारी शाळांपेक्षाही कुटुंबाची आणि पालकांची आहे याच भान ठेवण. 
 

Monday, 10 March 2014

कृती

कृती हि व्यक्त आणि अव्यक्त घटनांची साखळी असते. विचारांची लवचिकता आणि ताठरता परिस्तिथिचि अनुकूलता आणि प्रतिकूलता ठरवू शकते. अशांततेत विचार तरंगांची ताठरता व्यक्तीच्या विचार शक्तीत शिथिलता निर्माण करते.

याउलट शांततेत विचारांच्या कक्षा फैलावून सृजनशीलता निर्माण होते. एकंदरीत सामाजिक अपराधाचा गाभा आहे;
  • आंतरिक शांततेचा अभाव 
  • वैचारिक ताठरता 
  • परिस्तिथिचि अस्वीकार्यता 
(हा विषय पूर्ण समजण्यासाठी पुन्हा एकदा प्रतिकूलता, अनुकूलता आणि विचार हे या आधीचे भाग वाचा उद्या या शृंखलेतील शेवटचा पाचवा ब्लॉग प्रस्तुत होईल)
 

Sunday, 9 March 2014

विचार

 माणसाचा विचारांवर ताबा असतो कि विचारांचा माणसावर? किंवा विचार माणसांना घडवतात कि माणूस विचारांना? प्रश्न थोडे गुंता गुंतीचे वाटतात जसे कि 'पहले मुर्गी या अंडा?'

माणूस मुलतः विचारांचा उर्जा स्त्रोत आहे तो स्त्रोत नेहमीच प्रवाही असतो. म्हणूनच कदाचित हे निरीक्षण नोंदवल गेल असाव कि एका दिवसातील जवळपास निम्मे विचार हे अनावश्यक असतात.

परंतु खर पाहता  विचारातील आवश्यकता आणि अनावश्यकता व्याक्तीसापेक्षच आहे. अनावश्यक विचारांवर जास्त विचार करणारया आणि आपले मनोस्वास्थ्य बिघडवनारया व्यक्तींना मनोरुग्ण म्हणतात तर आवश्यक  विचारांवरच  विचार  करणारयांना सामान्य म्हणतात.

पण या  न्यायाने लेखक आणि  समीक्षकांना मनोरुग्ण म्हणायला हव. कधी-कधी वेग वेगळया विचारतरंगांवर ब्लॉग लिहिताना मलासुद्धा मी मनोरोगी असल्याचा भास होतो... असो, पण समाजाला आज सामान्यांपेक्षा अशाच मनोरुग्णांची आवश्यकता आहे.

शेवटी वेड्याच पांघरून घेऊनच राज दरबारातील विदुषक राजाला योग्य मार्गावर आणायचा. आज तेच विदुषक विदुषी झाले आहेत. आणि समाजाला योग्य मार्गावर आणत आहेत.



    

Saturday, 8 March 2014

अनुकूलता

अनुकूलता ही सुद्धा व्यक्तीसापेक्ष आहे. एकांगी अनुकूलता प्रतिकूल विचारतरांगासाठी आकर्षण केंद्र ठरू शकते. (परंतु प्रत्यक्षात एकांगी अनुकूलता सम असते )

प्रतिकूल विचारतरंग आकर्षित होण्याच कारण आहे मत्सर. द्विअंगी अनुकूलता कुरखोडीचा अभाव दर्शवते म्हणजे शांतता.

शांततेतून उदभवलेले विचारतरंग इतर सृजनशील कृतींकडे अग्रेसर होतात. सृजनशीलता शांततेचा गाभा आहे आणि अनुकूलतेचा गाभा बदलणारे विचारतरंग किंवा लवचिकता आहे. 

Friday, 7 March 2014

प्रतिकूलता

परिस्तिथी सम असते. परंतु व्यक्ती सापेक्षतेवर तिची प्रतिकूलता आणि अनुकुलता अवलंबून असते. प्रतिकूलता दोन्ही बाजूने असेल तर युद्ध घडत आणि एका बाजूची प्रतिकूलता अपराध निर्माण करते.

एकांगी प्रतिकूलता सामाजिक स्तरावर नुकसानकारक ठरते. तर द्विअंगी प्रतिकूलता राष्ट्रीय स्तरावर घातक ठरते. एकांगी प्रतिकूलतेचि कारणीमीमांसा समजण्यास अवघड आणि सूक्ष्म असते. तर द्विअंगी प्रतिकूलता विध्वंसक असली तरी तिची करणे स्पष्ट असतात .

 एकांगी प्रतिकूलतेचा गाभा वैयक्तिक स्वार्थ असतो. तर तर द्विअंगी प्रतिकूलतेचा गाभा राष्ट्रीय स्वार्थ असतो. स्वार्थ हा  एकांगी आणि  द्विअंगी प्रतिकूलतेचा गाभा आहे. तर प्रतिकूलतेचा गाभा ताठरपणा आहे. 

Thursday, 6 March 2014

हम लोग-तुम लोग

काल जेव्हा अरविंद केजरीवाल यांना गुजरात पोलिसांनी अटक केली तेव्हा दिल्ली आणि लखनौ मध्ये 'भाजप' आणि 'आप' मध्ये जे काही हिंसक पडसाद उमटले ते  फारच खेदजनक आणि एकूण भारतीय राजनीती बाबत अंतर्मुख करणारे होते.

भारतासारख्या सहिष्णू म्हणवणारया देशात जेव्हा वेग-वेगळ्या पक्षांचा झेंडा मिरवणारे आपलेच देश बांधव एकमेकांची टाळकी फोडू लागले, तेंव्हा तो ' हम लोग-तुम लोगचा'  मुखवटया आडचा पुरातन चेहरा पुन्हा समोर आला.

त्यावेळी तुझा धर्म माझा धर्म यावर कत्तल उडायची. आता त्याची जागा पक्षांनी घेतलीये, पण दोन्ही वेळचा एक समान धागा कोणाच्या लक्षात येतोय कि नाही कुणास ठाऊक. मरायचे ते सैनिक आणि मरतायत ते कार्यकर्तेच...

केजरीवाल यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाला म्हंणून त्यांना अटक झाली, तर त्यासाठी आप कार्यकर्त्यांनी शांततेने का होईना  भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्याची गरज नव्हती. त्यामुळे एका शुल्लक गोष्टीला राजकीय रंग चढला.

तसेच भाजप कार्यकर्त्यांनीही  एव्हढी हिंसक प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती. शेवटी मारणारे हि आपलेच आणि मरणारेही आपलेच. निवडणुका येतील आणि जातील पण अशा घटनांनी 'हम लोग-तुम लोग' चा एकदा गेलेला विस्तव कधी विझेल का?

म्हणून  कार्यकर्त्यांनो अंतर्मुख व्हा. कोणी आदेश देत म्हणून सद्सदविवेक बुद्धी गहाण टाकून सुसाट कोणाच्याही अंगावर धावू नका. आपण लोकशाहीसाठी निवडणुका घेतोय राजेशाहीसाठी नाही हे विसरू नका. शेवटी काय मरणारे हि आपण आणि.....

Wednesday, 5 March 2014

अस्तित्व

दहावीत असताना मी शेवटच्या बेंच वर बसायचो. तिथे तास सुरु असताना फार बर वाटायच कारण वहीच्या मागच्या पानावर चित्र काढायला किंवा स्वप्नात दंग व्हायला सगळ्यात उत्तम जागा असायची ती.

असच इंग्रजी च्या लेक्चर ला खरडलेली हि कविता... त्यानंतर हि बऱ्याच लिहिल्या, तरी हिची गोष्टच वेगळी कारण ती सहज घडली बनवली नाही. 

अस्तित्व

देव आहे जणू हवा 

देव आहे जणू मन 

नाही कोणा त्याची जाण 

परि गाती गुणगान 

नाही माहित त्याचा ठावा 

परि वाटे त्याचा हेवा 

अस्तित्वात असुनिया 

नाही त्यास मूर्त स्वरूप 

-विशाल बर्गे (२००२-२००३)

Tuesday, 4 March 2014

गाव

कधी आपल्याला बोअर झाल कि पुन्हा ताजतवान होण्यासाठी गावा शिवाय दुसरी जागा सहसा डोक्यात येत नाही. सातारयाला गेल्यावर सुद्धा असच नेहमी ताजतवान वाटत. शहरातले रुक्ष चेहरे तिथे अपोआप बोलू लागतात... श्वास घोटुन टाकणारी हवा तिथे पुन्हा जीवन देते....

गर्दी तशी इथेहि आहे आणि तिथेहि, फरक फक्त इतकाच कि तिथली गर्दी उत्सव साजरा करते. समोरचा अनोळखी चेहरा सुद्धा तुमच्याकडे पाहून स्मित करतो जणू अप्रत्यक्षपणे तुम्हाला सांगत असतो 'या तुमच स्वागत आहे'

काम करून काळवंडलेले चेहरे सुद्धा तिथे उजळ वाटतात आणि त्यांच्या समोर मेक अप आडचे चेहरे काळवंडलेले.तिथे गरीबाच्या पुढ्यात चिल्लर टाकून त्याची भूक चाळवली जात नाही तर भाकरीच्या तुकड्याने शांत केली जाते.

गावाकडे अस बरच काही शिकण्यासारख आहे.... नशीब माझ मलासुद्धा एक गाव आहे......

   

Friday, 28 February 2014

संविधानिक कर्तव्ये

काही वर्षांपूर्वी एका मित्राकडे मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जायचो, तेंव्हा अभ्यासा व्यतिरिक्त आमच्यात अवांतर विषयावर हि जोरदार चर्चा व्हायच्या. तो पक्का नास्तिक आहे हे मला माहित होत तरी पण मी परमेश्वर आहे कि नाही या गोष्टीवर उगीच त्याची फिरकी घ्यायचो.

त्याला प्रचंड राग यायचा म्हणायचा 'तुम्ही वैज्ञानिक दृष्टीकोन न बाळगता ज्या गोष्टीच्या अस्तित्वावरच चिन्ह आहे त्यावर विश्वास कसा ठेवता ? भारतीय संविधानाचा तुम्ही अशा प्रकारे अव्हेर करता' अस तो म्हणायचा.
त्याच्या मते वैज्ञानिक दृष्टीकोन देश  आणि नागरिकांच्या विकासाला पूरक असतो.

मला हि गोष्ट पटली नाही. कारण सश्रद्ध मन माणसाचा आत्मविश्वास वाढवते आणि बरच काही.... यात वादाला भरपूर वाव आहे. पण मला त्याच्याकडून संविधानाच्या अभ्यासाची गरज पटली, कारण एव्हाना मी संविधान वाचल नव्हत तस ते फार मोठ आहे पण नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची जाणीव तरी किमान व्हावी म्हणून ते वाचल कारण कर्तव्यांची जाणीव असल्याशिवाय तुम्ही हक्कांवर अधिकार दाखवू शकत नाही.

ती  संविधानिक कर्तव्ये पुढे देत आहे ती प्रत्येकाने जरूर वाचावितच पण तसे राहण्याचा प्रयत्न हि करावा कारण हि आपल्या देशाची गरज आहे.

51क. मूल कर्तव्य--भारत के प्रत्येक नागरिक का यह कर्तव्य होगा कि वह--
(क) संविधान का पालन करे और उसके आदर्शों, संस्थाओं, राष्ट्र ध्वज और राष्ट्रगान का आदर करे;
(ख) स्वतंत्रता के लिए हमारे राष्ट्रीय आंदोलन को प्रेरित करने वाले उच्च आदर्र्शों को हृदय में संजोए रखे और उनका पालन करे;
(ग) भारत की प्रभुता, एकता और अखंडता की रक्षा करे और उसे अक्षुण्ण रखे;
(घ) देश की रक्षा करे और आह्वान किए जाने पर राष्ट्र की सेवा करे;
(ङ) भारत के सभी लोगों में समरसता और समान भ्रातृत्व की भावना का निर्माण करे जो धर्म, भाषा और प्रदेश या वर्ग पर आधारित सभी भेदभाव से परे हो, ऐसी प्रथाओं का त्याग करे जो स्त्रियों के सम्मान के विरुद्ध है;
(च) हमारी सामासिक संस्कृति की गौरवशाली परंपरा का महत्व समझे और उसका परिरक्षण करे;
(छ) प्राकृतिक पर्यावरण की, जिसके अंतर्गत वन, झील, नदी और वन्य जीव हैं, रक्षा करे और उसका संवर्धन करे तथा प्राणि मात्र के प्रति दयाभाव रखे;
(ज) वैज्ञानिक दृष्टिकोण, मानववाद और ज्ञानार्जन तथा सुधार की भावना का विकास करे;
(झ) सार्वजनिक संपत्ति को सुरक्षित रखे और हिंसा से दूर रहे;
(ञ) व्यक्तिगत और सामूहिक गतिविधियों के सभी क्षेत्रों में उत्कर्ष की ओर बढ़ने का सतत प्रयास करे जिससे राष्ट्र निरंतर बढ़ते हुए प्रयत्न और उपलब्धि की नई ऊँचाइयों को छू ले;
(]) यदि माता-पिता या संरक्षक है, छह वर्ष से चौदह वर्ष तक की आयु वाले अपने, यथास्थिति, बालक या प्रतिपाल्य के लिए शिक्षा के अवसर प्रदान करे।]

खरतर प्रत्येक कर्तव्याच पालन आवश्यक आहे पण ठळक कलेली कर्तव्ये न पाळण्यामुळे आपल्या देशाच किती नुकसान झाल हे लक्षात याव आणि ठळक मुद्यांवर विशेष लक्ष दयाव हि सदिच्छा.   





Thursday, 27 February 2014

शिवोsहम् शिवोsहम्

शिव म्हणजे आपला अंतरात्मा. हिन्दू मान्यतेनुसार आत्मा अलिप्त असतो. चांगल्या वाईटचा त्याच्यावर परिणाम होत नाही. तो नेहमी शुद्धच असतो. शिवाचे पूजन म्हणजे फक्त पिंडीवर बेल फुले वहाने एव्हढाच मर्यादित ठेऊ नका.

जो आत्मविश्वासाने परिपूर्ण तो शिव. जो विचलित होत नाही तो शिव आणि असा शिवरूपी अंतरात्मा प्रत्येकात आहे. त्याची जाणीव होण्यासाठी आजचा दिवस महाशिवरात्री. अहंकार सोडून जगणे आणि जागृत राहणे म्हणजे शिवात विलीन होणे अंतरात्म्यात विलीन होणे.

आपल्या वैदिक प्रार्थनेत शिवतत्व फार छान सांगितल आहे ते दुसरे तिसरे काही नसुन आपल्या अंतरात्म्याचे गान आहे...

न मे द्वेष रागौ न मे लोभ मौहो 
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः। 
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः 
चिदानन्दरूपः शिवोsहम् शिवोsहम् ।।3।।

आजच्या या महाशिवरात्री या वैदिक प्रार्थनेची जाणीव व्हावी हीच सदिच्छा.

(आज मराठी राजभाषा दिन, मराठी जनतेचे मराठी वरील प्रेम अबाधित राहो.... )

Wednesday, 26 February 2014

महानायक

चित्रपटसृष्टीतील एकंदर व्यवहार पाहून मी अतिशय निराश झालो. असेही वाटु लागले कि माझा इथे टिकाव लागने फार फार कठिन आहे. एकदा तर मी हे  सगळे सोडून दिल्लीला परत ही गेलो होतो. तेव्हा वडिलांनी मला धीर दिला.  इतक्या लवकर हार मानन्याचे कारण काय असे विचारल्यावर मी त्यांना सांगितले कि चित्रसृष्टीत सुसंसस्कृत प्रतिभासंपन्न माणसाची कदर नाही. तेव्हा त्यांनी मला बलराज सहानींचे उदहारण दिले. ते म्हणाले कि जर बलराज सहानी सारखा विद्वान माणूस स्वतः ला एडजस्ट करून घेऊ शकतो. तर तू का नाही? मला ते पटले आणि मी पुन्हा मुंबईला आलो.
दुप्पट उत्साहाने पुन्हा सुरुवात केली. येताना मी स्वतः चे ड्राइविंग लाइसेंस ही बरोबर घेऊन आलो होतो. गरज पडली तर टॅक्सी चालवेन पण चित्रपटात शिरकाव करुन घेइनच याच ठाम उत्साहाने मी काम सुरु केले. हे फार विचित्र दिवस होते.
(अ....अमिताभचा, दिलीप ठाकूर, सायली प्रकाशन पुणे )

वरील अनुभव कुठल्या व्यक्तीचे आहेत हे सांगण्याची गरज नाही महानायक 'अमिताभ बच्चन'. आपण नेहमी कुठल्याही व्यक्तीचे नेहमी यश पाहतो. पण त्या मागचे त्या व्यक्तीचे 'ध्येय' आणि 'चिकाटी' नजर अंदाज करत असतो. मला पूर्ण आशा आहे कि वरील अनुभव वाचून माझ`असेच प्रतिभा संपन्न मित्र उत्साहित होतील.

हा अनुभव कुठल्या एका क्षेत्राला लागु होत नाही. तुम्ही लेखक असा, अभिनेता असा अथवा कोणी व्यावसायिक. तुम्ही प्रयत्न करता हेच सर्वात मोठ यश....चालत रहा... बाकी योग्य काळ तुम्हाला उत्तर देईलच.... 

Tuesday, 25 February 2014

'Fortune Favors Brave'

परवा अच्युत गोड़बोले यांनी फेसबुक आणि व्हॉट्स ऍप यांच्यातील व्यवहाराची फारच रोचक कथा सांगितली.बरयाच जणांनी 'सकाळ' च्या 'सप्तरंग' पुरवनीत ती वाचली ही असेल. त्यातील १९ अब्ज डॉलर चा मोठा आर्थिक व्यवहार सोडून जर दुसरा भावनिक मुद्दा लक्षात घेतला तर तो फारच ह्रदयस्पर्शी आहे.

भारतातही असे अनेक हुशार आणि नवीन कल्पनानी भारलेले युवक आहेत. तीन चार महिन्यांपूर्वीच बिहारमधील दोन युवकांनी फेसबुक प्रमाणेच एक सोशल नेटवर्किंग साईट विकसित केल्याची बातमी आली होती पण त्यांच्या त्या कल्पनेच्या प्रसारासाठी भांडवलाची विवंचना ही स्पष्ट करण्यात आली होती.

आता माहित नाही ते युवक काय करत असतील. पण त्यांनी फेसबुक, गुगल, माइक्रोसॉफ्ट सारख्या महाकाय कंपन्यानमधे काम करण्यापेक्षा स्वतः च त्यांच्या पंक्तीत जाव ही इच्छा.... गोष्ट वाटते तितकी सोपी नाही पण मला भारतीय भांडवल बाजारातील एक कमजोर मुद्दा अधोरेखित करायचा आहे.

भारतामधे परदेशातील व्हेंचर कैपिटलिस्ट प्रमाणे जोखमीच प्रमाण आणि संख्या फारच कमी दिसते, नाहीतर अमेरिकेतील गुगल, फेसबुक सारख्या एकातरी कंपनीचा उदय भारतात झाला असता. जेंव्हा आजच्या पिढीतील युवक एखादी कल्पना विकसित करतो तेंव्हा त्या विवक्षित कल्पनेच्या विकास आणि प्रसारासाठी त्याला फार मोठया भांडवलाची गरज पडते.

नवीन कल्पनेच्या विकासातील धोका लक्षात घेता बँका अशा गोष्टींसाठी पुढाकार घेत नाहीत हा माझा अनुभव आहे आणि अशा वेळी उपयोगी येतो रिस्क टेकर जो तुमच्यावर विश्वास ठेऊन डाव खेळायला तयार असतो, ज्याला व्हेंचर कैपिटलिस्ट म्हणतात.आजच्या  IT क्षेत्रातील फेसबुक, गुगल सारख्या मोठया  कंपन्या त्याचच फळ आहे.   

'Fortune Favors Brave' अस म्हणतात ते खोट नाही. आज अमेरिकेकडे 'महासत्ता' हे बिरुद आहे ते याच रिस्क टेकिंग फॅक्टर मुळे, नाहीतर IT क्षेत्रातील बौद्धिक संपदेने युक्त भारतात असे मोठ मोठे व्यवहार फार पूर्वीच घडले असते.    

Monday, 24 February 2014

चिंता करितो विश्वाची

आज 'रामदास नवमी' समर्थ रामदास स्वामींचे कार्य महाराष्ट्रातील जनतेसाठी अक्षुण्ण आहे. त्यांचे दासबोध आणि मनाचे श्लोक यांची कित्येक पिढ्यांनी पारायणे  केली असतील आणि आजही मनाचे श्लोक मधील एखादा श्लोक मुख्दगत नसेल असा मराठी माणुस विरळाच.

समर्थांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी बलोपासनेबरोबरच मनाला वळण लावनारया श्लोकांची रचना केली, कारण शक्तीचा सदुपयोग फक्त चांगल्या मनाची व्यक्तीच करू शकते. सबंध आयुष्यभर 'चिंता करितो विश्वाची' या भावाने निस्वार्थ कार्य करणारया समर्थांना शतकोटी प्रणाम

।।जय जय रघुवीर समर्थ।।  

Sunday, 23 February 2014

मिसळ

मागच्या वेळी रविवारी मित्राबरोबर मिसळ खायला गेलो. चिंचवड सारख्या ठिकाणी मिसळ मिळण अवघड बिल्कुलच नाही.प्रत्येकाचा मिसळ खाण्यासाठीचा खास अड्डा बिलकुल ठरलेलाच असतो आणि जो तो आपण जिथे मिसळ खातो तीच सर्वात बेस्ट कशी याच महिमा मंडन करत असतो. पण आम्ही ज्या ठिकाणी गेलो ते तुलनेने तस नवीनच होत एकाच्या रेकमेंडेशनवर आम्हीही तिथे पहिल्यांदाच चाललो होतो.

जागा तशी थोड़ी कंजेस्टेड होती पण आम्ही ती गोष्ट नजरअंदाज करत तिथेच एक कोपरयातला टेबल पकडला आणि दोन कडक (मीडियम ऑप्शन होता म्हणून ) मिसळची आर्डर दिली.
"व्वा.... मिसळ म्हंजी येकच नंबर मजा आली!" एक फर्मास भुरका ओढत आमच्या समोरची ज्येष्ठ व्यक्ति बोलली पायजामा आणि गांधी टोपी घातलेली
आम्हीही उगी हसून माना डोलावल्या, होतो माणुस कधी-कधी भावनिक. एव्हाना आमची आर्डर आली. आम्हाला वाटल बाबा आता शांत बसतील पण कसच काय,
"प्या- प्या त्या बिगर मजा नाय" मी हास- हुस करत होतो, नाक लाल झाल होत. मला थोडा रागच आला. यांना काय करायचय? (तीच शहरी मानसिकता ) पण मी पुन्हा हसून नुसतीच मान डोलवली...
"येsss, बारक्या कट आन कि हयासनी" पुन्हा बोलले आणि एका बाजूने त्यांच मिसळ खाण्याच काम ही मन लावून चालल होत. नाही म्हटल तरी शंका यावी हे इथले मालक तर नाही? म्हणून बाबांना विचारल....
"बाबा तुम्ही इथलेच वाटत?"
"न्हाय यिथ कामाला आलूय ठेकेदारीव, यिथ बाजूलाच मिस्तर्याच काम चाललय"
"बर- बर" मला उत्तर भेटल, पण बाबा पुढे बोललेच....
"म्हनल यिथ याव मिसळ खायला नावावरन तर वाटल न्हाय (अरिहंत) यिथ झणझणित मिसळ भेटल म्हणून, पण चांगली हाये बर का?"
आता मला बाबांच कौतुक वाटु लागल किती साधा माणुस ते सुद्धा आमच्या सारखेच पैसे देऊन मिसळ खात होते पण त्यांना ती आवडल्यावर मनसोक्त कौतुक तर करत होतेच पण समोरच्यालाही आपलेपणाने आग्रह करत होते बिना काही स्वार्थाच.
मला लाज वाटली, आजकल फेसबुक च्या जमान्यात आपण कितीतरी गोष्टींना लाइक आणि शेयर करत असतो पण कधी आपण बायको किंवा आईच्या हातच जेवन चांगल झाल म्हणून तीच चार चौघात कौतुक करतो? आपल्या एखाद्या मित्राने किरकोळ का होईना मदत केल्यावर त्याचे आभार मानतो ? आपल्या भावंडाने काही चांगल काम केल्यावर कड़ कडुन मीठी मारतो? या आणि कितीतरी गोष्टी
"आरामशीर होउ दया" अस म्हणत बाबा उठले आणि काउंटर वर जाऊन पैसे देत आवर्जून त्या मालकाचही कौतुक केल, बाबानी मला चांगलीच जाग आणली....
मिसळ खाण पहिल्यांदाच इतक सत्कारनी लागल, ते पण बिना एसिडिटीच..... कस?        

Saturday, 22 February 2014

मुक्ति वजा बंधन

पूर्वी कधीतरी मी अध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून मुक्तीची सोपी व्याख्या ऐकली होती, 'शाळेतला एखादा मुलगा वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन बाहेर पडतो आणि सुटकेचा दिर्घ निश्वास टाकतो ती मुक्ति'
किती सोपी व्याख्या...

पण आज वर्ष उलटून गेली आहेत मनाची जाणीव ही थोड़ी प्रगल्भ झाली आहे आणि ती मुक्तीची व्याख्याही आताशा समाधान करत नाही. तो वार्षिक परीक्षा पास झालेला मुलगा जेंव्हा पुढच्या वर्गात जायची स्वप्न पाहतो तेव्हाच त्याची मुक्ति बंधनात परिवर्तित होत असते.

शाळेनंतर नोकरीची, नोकरीनंतर कुटुंबाची नंतर मुलांची प्रत्येक गोष्टीची आस... जणू साखळीच तयार होते. आणि हीच साखळी केंव्हा पायात पड़ते हे कळत सुद्धा नाही आणि आश्चर्य म्हणजे मुक्तिपेक्षा याच बंधनात आपल्याला आनंद वाटत असतो.

Friday, 21 February 2014

बोलतो मराठी

२७ फेब्रुवरी जागतिक मराठी भाषा दिवस, आज पासून म्हणजे २१ फेब्रुवरी पासून मराठी भाषा सप्ताहाला सुरुवात होतेय.

फ़क्त भारतीय इतिहासातच नाही तर जागतिक स्तरावरही मराठी भाषेचे महत्व अमूल्य आहे ७० -८० दशलक्ष मराठी  भाषिक लोक याचा सज्जड पुरावा आहे.

पण सध्याच्या काळात एक गोष्ट नेहमी खलते मराठी साहित्य आणि कलेने एव्हढी समृद्ध ही आपली भाषा आपण मराठी बांधवच वापरायला का कचरतोय ?

हा माझा भाषेविषयीचा दुराभिमान नाही पण जर आपण महाराष्ट्रात राहूनही व्यवहारिकतेत प्राधान्याने मराठी भाषा वापरत नसु तर ही आपलीच चुक आहे.

त्यानंतर मराठी भाषेचा अस्त होत आहे अशी व्यर्थ ओरड करण्यात काय हशील ? असा म्हणतात कि छोट्या-छोट्या गोष्टीतूनच मोठी ध्येय साध्य होतात याच तत्वाचा वापर करुण आपण मराठी भाषा समृद्ध करूयात

आपण प्रतिज्ञा करुया 
  • मी व्यवहारात मराठी भाषेचाच प्राधान्याने उपयोग करेन.
  • मराठी साहित्याच वाचन करेन.
  • अमराठी मित्रांना मुलभुत व्यवहारिक मराठीचा वापर शिकवेन.

या तीन मुलभुत गोष्टींनी आपण मराठी भाषेच्या संदर्भात बरच काही साध्य करू शकतो आणि अभिमानाने म्हणू शकतो.... बोलतो मराठी !

Thursday, 20 February 2014

यम धर्माचा अस्त

सध्या राजीव गांधी मारेकरयांच प्रकरण फारच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वीच फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला उशीर झाल्याच कारण देत त्या तिन्ही मारेकरयांच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात आल आहे.

अफजल गुरूच्या शिक्षेच्या सन्धर्भातही असच काहिस वळण लागणार होत पण सुदैवाने तस घडल नाही, पण वरील घटना ही काही कमी दुर्दैवी नाही. ज्या देशात स्वयं पंतप्रधानांच्या मारेकरयांची शिक्षा सौम्य केली जाते आणि संसद भवनसारख्या राष्ट्रीय अस्मितेवर घाला घालनारया अतिरेक्याच्या दया अर्जावर व्यर्थ काथ्या कुट केला जातो तिथल्या जनतेवर याचा काय परिणाम होत असेल ?

सत्ताकारन लक्षात घेऊन फ़क्त एखाद्या विशिष्ठ गटाला किंवा राज्यातील लोकांना खुश करण्यासाठी देशाच्या सार्वभौम घटना आणि न्याय व्यवस्थेशी ही जी काही तडजोड होत आहे ती फारच खेदजनक आहे आणि उद्या या घटनाच आपल्या अंगलट येऊ शकतील.

आजचा स्वतंत्र तेलंगाना मुद्दा असो, मराठा आरक्षण असो, कश्मीरचे विशिष्ट कलम असो किंवा ईशान्य भारतीयांशी दुजाभाव ही तर फक्त येणारया  अराजकाची बीजे आहेत. का म्हणून कोणी न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करावा ज्यांच्या हातात आपण मोठया विश्वासाने तराजू दिला आहे त्यांना त्यांच काम करू दया.

उलट न्याय पालिकेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारलाही असता कामा नये परंतु दुर्दैवाने भारतात तो दिसून येतो. आणि ज्या देशात न्याय पालिका स्वतंत्र आणि हस्तक्षेप विरहित नाही तिथे अराजक पसरायला वेळ लागत नाही आणि आज आपण ते पाहतोय. 

सावधान यम धर्म अस्त पावत आहे.…

Wednesday, 19 February 2014

निश्चयाचा महामेरु

आज छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती, मराठी लोक आणि महाराष्ट्र यांच्यात अस्मिता निर्माण करणार जाज्वल्य व्यक्तिमत्व.

शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव देशभरात आणि खास करुण महाराष्ट्रात इतका मोठा आहे कि मरणोपरांत प्रभाव कायम असलेल्या व्यक्तिमत्वात श्री कृष्णानंतर शिवरायांचा क्रमांक येईल....

महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडणे असंभव आहे, पण समर्थ रामदास स्वामींच्याच शब्दात सांगायच तर

निश्चयाचा महामेरु। बहुत जनांसी आधारु 
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी 
परोपकाराचिया राशी। उदंड घडती जयासी 
तयाचे गुणमहत्वासी। तुळना  कैंची ?    

महाराज! मराठी जनांच्यात तुम्ही अस्मिता, अभिमान आणि सामर्थ्याच स्फुल्लिंग पेटवलत.... तुम्हाला  त्रिवार मुजरा......


Tuesday, 18 February 2014

मुक्तशैली

काल मला माझा एक जुनी बॅग भेटली. त्या बॅगमधे मी बरयाच वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली बरीच टिपने होती, चांगल्या पुस्तकातील चांगले विचार इत्यादि...

पण या वेळी फरक इतकाच होता कि ती वाचताना मला जाणीव झाली कि त्यावेळी मी जितका ओपन माइंडेड होतो (इतरांचे विचार स्वीकारण्याकरता) तेव्हढा आताशा नाही.

शाळेत असल्यापासून ते काल परवा पर्यंत बरीच पुस्तके वाचली आणि सध्या जे काही थोडफार लिहु शकतो ते त्यामुळेच पण...

आज कल नवीन पुस्तके ही वाचू वाटत नाही, आता लिहू वाटत. या मागच एक कारण असही आहे कि इतरांच्या विचारांचा प्रभाव पडून मी साचेबद्ध होउ नये.

हा विचार कितपत बरोबर आहे याची कल्पना नाही, पण या विचारामुळेच लिहायला धैर्य भेटत अशासाठी कि तुम्ही तुमच्या शैलीत लिहिता मुक्तपणे आणि थोड़े का होईना लोक तुमच्या विचारांच स्वागत करतात.

म्हणून आजचा ब्लॉग माज्या विचारांच स्वागत करणारया सर्वांसाठी.... Thank You All......



 

Sunday, 16 February 2014

गृहीत बांधव

आज एका विचित्र बातमीकडे लक्ष गेल. 'ताज महल' पाहण्यासाठी गेलेल्या अपंगांना तेथील सुरक्षा रक्षाकानी मज्जाव केला, कारण तस चुकिच नव्हत. ताज पाहण्यासाठी तेथे अपंगांसाठीचा रैंप (उतरणीचा मार्ग ) नसून पायरया च आहेत आणि ताज जागतिक वारसा असल्याने तेथील नियम या गोष्टीला मज्जाव करत होता.


पण मुख्य प्रश्न अपंगांना मज्जाव नसून त्यांच्या सोयीसाठी रैंपची व्यवस्था का करण्यात आली नाही हा आहे. कि आपण अपंगांना एव्हढ गृहीत धरल आहे कि आपण त्यांचा विचारच करू नये.

 जागतिक वारसा स्थळे अपवाद झाला, पण बरयाच कॉर्पोरेट ऑफिस तसेच सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि हॉस्पिटल्स ही रैंप विरहित आहेत आणि अशा ठिकाणी जेंव्हा त्यांना असहाय पाहतो तेंव्हा फार वाईट वाटत.

वाईट त्यांच्या अपंगत्वाच नाही तर त्यांच्यासाठीच्या एका साधारण सोयीच्या अभावाच वाटत. आज भारताची लोकसंख्या एव्हढी प्रचंड आहे कि आपण ज्या आपल्या अपंग बांधवांची संख्या काही टक्क्यांमधेच मानली तरी त्यांची संख्या कोटींच्या घरात जाईल.

तेंव्हा त्यांच्या या साधारण परंतु महत्वपूर्ण गरजेची पूर्तता व्हायलाच हवी कारण आपल्या लोकशाही प्रधान  देशात प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो एका साधारण गृहितकावर अवलंबून राहता कामा नये.

Saturday, 15 February 2014

ना-राजीनामा

अरविंद केजरीवाल यांना शेवटी काल राजीनामा देण भाग पडलच. खरतर लोकपाल बील मंजूर झाल असत तर ही वेळ आलीच नसती. हा केजरीवालांचा राजीनामा नसून जनतेचा ना-राजीनामा आहे .

या घटनेमुळेच का होईना इतर पक्षांचे सत्ताकारण पुनः एकदा जनते समोर आले आहे. सरकारी लोकपाल पेक्षा अण्णांना अपेक्षित आणि आप ने मांडलेले लोकपाल विधेयक कितीतरी उजव होत. अस मजबूत लोकपाल विधेयक मंजूर करुण भ्रष्टाचाराला आळा घालणे सोप झाल असत.

पण विरोधकांना आपण या भ्रष्टाचाराच्या दलदलीत किती खोल अडकलो आहोत याची जाणीव असल्यामुळे ते हे विधेयक मंजूर करणार नाहीत हे स्वच्छ होत आणि राहिल.

यावर उपाय एकच, लोकशक्तिच प्रदर्शन. लोकांना कोण किती भ्रष्ट आहे याची पुर्ण जाणीव आहे. मतदार जागरूक आहेत. दशकभरा पूर्वीची ती 'चलने दो' मानसिकता राहिली नाही कारण भ्रष्ट राजनितीचा अप्रत्यक्षित तोटा शेवटी जनतेलाच महागाई बेरोजगारी यांच्या रुपाने होत आहे.

तेंव्हा अशा भ्रष्ट लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. दिल्ली मध्ये पुन्हा निवडणूक घेण्याची शिफारस करण्यात आली आहे आणि या वेळी 'आप' ला प्रचंड बहुमत भेटल तर भारतीय लोकशाहित नवा पायंडा पडेल आणि ही घटना येणारया लोकसभा निवडणुकीचा रोखही निश्चित बदलेल.

Thursday, 13 February 2014

रक्तदान

'रक्त' माणसा माणसात नात सांगणारा एक महत्वपूर्ण घटक, पण इथे फक्त रक्ताची नाती या कुप मंडूक वृत्तीने याचा उल्लेख करत नाहीये.

बर झाल... निसर्ग नाती गोती या मनुष्य निर्मित गोष्टींनी बाधित नाही. नाहीतर एकाच नात्यातील लोकांना रक्तासाठी एकमेकांवरच अवलंबून रहाव लागल असत.

जर निसर्गानेच आपल्याला रक्तबंधनात न अडकवता रक्तदानासाठी  एव्हढी चांगली संधी दिली आहे तर आपण त्याचा उपयोग का करू नये?

चला नात्यांच्या पलीकडेही फार मोठ जग आहे मनुष्यत्वाच ते निभवुया..... रक्तदान करूया......

Photo

   

Wednesday, 12 February 2014

राजमार्ग

कुठल्याही कार्यासाठी जनतेला प्रोत्साहित करुन त्यांना कार्यप्रवृत्त करणे ही फारच अवघड गोष्ट आहे, पण ज्यांच्याकडे वक्तृत्वकौशल्य आहे त्यांच्यासाठी हा फक्त खेळ असतो.

राज ठाकरे ही प्रभूति या खेळातील महारथी आहे आणि आजच्या टोल विरोधी आंदोलनाचे ते अर्ध्वयु आहेत. जनतेला चेतवन्याची जी क्षमता राज ठाकरेंकडे आहे ती सध्या कुठल्याही राजकीय नेत्याकडे नाही.

त्यांच्या कार्यात आणि सभेत जो धड़ाका असतो तो इतरत्र कोठेही पहायला मिळणार नाही, आजच्या टोल विरोधी आंदोलनाचे जे परिणाम होतील ते शक्यतो सकारात्मकच व्हावेत हीच इच्छा.

खरतर जनतेचा पूर्वी टोल साठी विरोध नव्हता, परंतु त्यातील पारदर्शकतेचा अभाव आजच्या असंतोषाला कारणीभूत आहे. राज ठाकरे यांनी तो मुद्दा उपस्तिथ केला ही चांगलीच गोष्ट आहे.

पण या आंदोलनात अस्थाई तत्ववर काम करणारया टोलवरील  कर्मचार्यांना मारहाणीचा त्रास होउ नये याची काळजी घेण पक्षाची जबाबदारी आहे आणि तोच पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी राजमार्ग असेल.

Tuesday, 11 February 2014

बदलीची नियुक्ति

लहान मूल जेंव्हा रडत तेंव्हा त्याला खुळ-खुळा वाजवून शांत केल जात आणि ते तात्पुरत का होईना रडायच थांबत, असच काहीस श्रीकर परदेशी यांच्या बदली विरोधी आंदोलनाच होत आहे.

आजच्या वर्त्तमानपत्रातील बातमीप्रमाणे परदेशी यांची नियुक्ति मुद्रांक शुल्क विभागात करण्यात आली आहे. म्हणजे ते आयुक्त या पदावर राहणार नाहीत.

फरक फक्त इतकाच कि बदलीची नियुक्ति करुन जनक्षोभ शांत करण्याचा प्रयन्त करण्यात आला आहे. आता पाहु हा खुळ-खुळा कितपत कारगर ठरतोय ते.

Monday, 10 February 2014

जन पळभर म्हणतील हाय हाय....

सध्याचा राजकीय गदारोळ पाहता स्वामी विवेकानंदांचे एक प्रसिद्ध वाक्य आठवत " कुठल्याही कार्याची सुरुवात पहिल्यांदा टीकेने होते, आणि नंतर तिचा स्वीकार केला जातो''

ही एक जनरीतच आहे. लोकपाल विधेयक मंजूर व्हाव या हेतूने अण्णांनी आंदोलन केल तेंव्हा विद्यमान सरकारने त्यांना अटकच केली नाहीतर त्यांच्यावर भल भलते आरोपही केले.

पण शेवटी काय झाल? सरकारला त्यांच्या कलेने केलेले  का होईना लोकपाल विधेयक मंजूर कराव लागल. ते विधेयक आणखी कड़क आणि कायदेशीर व्हाव यासाठी सध्या केजरीवाल कार्यरत आहेत. 

आणि जनरीति प्रमाणे त्यांच्यावर टिकाही होत आहे, पण ही तर फ़क्त पहिली पायरी आहे. 'आप' आग्रही असलेल्या मजबूत लोकपाल बिलाचाही नक्कीच स्वीकार होईल यात शंका नाही.

म्हणूनच कदाचित काल जेंव्हा केजरीवाल यांनी अण्णांची भेट घेतली तेंव्हा अण्णांनी त्यांना सबुरीने घ्यायचा सल्ला दिला आहे. त्यांना विश्वास आहे हे ही दिवस जातील, कारण लाटांच अस्तित्व कधीच कायम नसत.

Sunday, 9 February 2014

जागृति

'आयुक्तांच्या' बदली विरोधात पिंपरी चिंचवडकरानी जो उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे तो पाहता सध्या नागरिक किती सजग आणि जागरूक झाले आहेत हे लक्षात येत.

पूर्वी प्रमाणे आंदोलनाच स्वरुप असामाईक न राहता ते सामाईक तर झाल आहेच, परंतु त्याचा विस्तार आणि अवाकाही वाढला आहे.

जनते मध्ये ही जागृति निर्माण व्हायला बरेच घटक कारणीभूत आहेत त्यातील सर्वात महत्वाच कारण म्हणजे भ्रष्टाचाराने ओलांडलेली पातळी.

अन्ना हजारेंनी केलेले आंदोलन ही ठिणगी होती आणि त्या ठिणगीनेच आता वनव्याच प्रचंड रूप घेतल आहे, जे देशातील भ्रष्ट नीति खाक करतील आणि निवडक जनप्रतिनिधींची अरेरावीही.

लवकरच देशात परिवर्तनाची लाट येईल यात शंका नाही आणि निवडणूक ही सत्ता सम्पादनची पायरी न राहता लोकाभिमुख शासनाची नांदी ठरेल.

सामन्यातील कोणालाही लोकप्रतिनिधि म्हणून उभे राहताना कोणाच्या हाताची नाही तर निव्वळ जनतेच्या पाठिंब्याची, आपल्या पाठिंब्याची गरज असेल.

जेंव्हा देशाची राजनीती व्यक्तिकेंद्री न राहता जनकेंद्री होईल तो खरा सुदिन आणि ती वेळ आता येऊन ठेपली आहे.

Saturday, 8 February 2014

दाद

शेवटी श्रीकर परदेशी यांची बदली झालीच. ज्यांच्या कडे दाद मागायची त्यांनीच केली, आणि त्यात आपण जर जनता जनार्दन म्हणून या गोष्टीचा निषेध केला नाही तर आपणही अन्यायला न्याय देणारे ठरू.

शाळेत असताना आम्हाला नागनाथ कोत्तापल्ले यांचा 'दाद' नावाचा एक धडा होता त्यात एका गरीब मुलाची बकरी गावातील पाटलाचा मुलगा काही आडदांडा बरोबर बळजबरीने फस्त करतो...

तो मुलगा गावात  पाटलाकडे न्याय मिळेल या आशेने जातो... पण त्याची निराशा होते... गावातील लोकही पाठ फिरवतात.... शेवटी निराशेने तो मरतो.... आणि विडंबना ही की लोक त्याच्या समाधीला शेंदुर फासुन त्याला बकरोबाची समाधी म्हणून नाव देतात.... आणि वर त्याला खुश करण्यासाठी बकरयाचा बळीही....

त्यावेळी मी ही कविता केली. पण खरच वाटल नव्हत लोक असे असतात म्हणून पण आज समजते ती समजाचे भीषण वास्तव मांडणारी एक रूपक कथा होती. ही कविता मी त्या सर्व राजकीय नेत्यांना समर्पित करतो कदाचित ते आम्हांला न्याय देतील नाहीतर समाधी आहेच (यावेळी आमची नाही... तुमची. )

दाद

दाद मागसी कुणाला 
न्याय देती कुणास 
भोळी भाबडी हि जनता 
 न्याय देती अन्यायास 
दगडासी माने देव 
शेंदुर फासुनिया 
नवस करी दगडास 
 पावे म्हनुनिया 
बळी तो कान पिळी
करी स्वतःची मनमानी 
न्यायास थारा नाही 
अन्यायाला तारी

Friday, 7 February 2014

काहीच न सुचन्यावर

 एखादी गोष्ट दररोज करायची म्हंटल तर ते एक दिव्यच असत. मग तो नेहमीचा व्यायाम असो नाहीतर दैनिक काम, पण नाइलाज म्हणून केलेल्या कामात तेव्हडा उत्साह जाणवत नाही.

ब्लॉग लिहिन हे सुद्धा माझासाठी एक रूटीन आहे. हे कामसुद्धा वाटत तितक सोप नाही, नेहमीच नव नवीन विचार डोक्यात येतात पण ते व्यवस्तिथ शब्दबद्ध करण फारच जिकिरिच काम.

आता आजचच पहा काय लिहाव हेच सुचत नव्हत. खुप रेफेरेंस शोधले, वर्त्तमान पत्र चाळले, जुनी टिपने पाहिली पण काही पटेनाच.....

शेवटी वैतागून विचार केला आज काहीच न सुचन्यावर लिहाव..... आणि आश्चर्य यावरही ब्लॉग लिहून झाला. 'काहीच न करणे हे सुद्धा एक काम आहे' याचा अर्थ आता मला पटला.      

Thursday, 6 February 2014

देशाची शाळा

सध्या टी व्ही वरील राजकीय पक्षाच्या 'आम्ही काय केले' (?) (हे वाक्य द्वयार्थीही वापरू शकता) या थाटातील जाहिराती पाहिल्या तर आपसुकच हसु फुटेल. अशा जाहिराती पाहिल्यावर मला शाळेतले दिवस आठवतात.

आम्हाला त्यावेळी शाळेतून छोटे बिस्किटचे पुडे मिळायचे, प्रत्येकी एक असे. मग आमच्यातलाच एखादा वर्गप्रमुख आम्हा शामळु पोरांजवळ यायचा आणि म्हणायचा "तुम्ही मला बिस्किटचे पुडे दया, मी तुम्हाला बाकी पोरांपासून वाचवतो" (त्यावेळी आम्ही फारच सरळमार्गी होतो, इतके कि कोणीही येऊन टपली मारावी ) मग आम्हीही नाइलाजाने का होईना पुडे त्याच्या पुड्यात टाकायचो.

आज त्या वर्गप्रमुखाच्या जागी  देशाचे नेते आहेत जे सामान्य जनतेच्या पुड्यातूनच स्वतःचे पोट भरतायत आणि वर आम्ही तुमचे एकमात्र वाली असल्याचा आव ही आणतायत....... शाळेत देश कसा घडवायचा हे शिकवतात, तर इथे देशाची शाळा कशी करायची याच प्रात्यक्षिक सुरु आहे.    

Wednesday, 5 February 2014

बेळगाव (निबंध)

काल लग्नानिमित्त पहिल्यांदाच  बेळगावला जाण झाल.तिथे उतरल्यावर  बेळगावबद्दलच्या सर्व कल्पनांचा पूर्ण निचरा झाला.

तस  बेळगाव नावा प्रमाणेच गाव आहे, तिथे एकही ईमारत म्हणावी अशी वास्तु निदर्शनास आली नाही. सगळीकडे बैठी घर....

आपल्या येथील पिंपरी कैम्प आणि निगडी प्राधिकरण एरिया याच्याशी फारच मिळता जुळता परिसर. तिकडे मराठी आणि कन्नड़ दोन्ही भाषांचा वापर होतो आणि स्थानिक लोक कर्नाटकी हेलात पण मराठी चांगल बोलतात....

परिसराची माहिती व्हावी म्हणुन मित्रांबरोबर पाईच फिरलो. मंदिरे छान आहेत आणि बहुसंख्य मूर्ति काळ्या पाषाणातिलच होत्या तिथे छत्रपतींचे दोन तीन पुतळेही पाहिले आणि तिथल्या थिएटर बाहेर टाइमपासची पोस्टर्सही, बाकी  बेळगाव आहे कर्नाटकात पण आपण  महाराष्ट्रा बाहेर आहोत अस काही तिथे जाणवत नाही..... समजल ना..... ?              

Monday, 3 February 2014

पुन्हा एक

पुन्हा एक सोमवार- पुन्हा एक दिवस- पुन्हा एक चक्र आणि या चक्रातला पुन्हा एक मी... 

भूगोलातील गोल- गोलातील भूगोल आणि त्यातील आम्ही.....

चौकट मोडायला गेल तर ही चौकट नाही,

आणि या गोलाला काही अंत नाही...... 


Sunday, 2 February 2014

बांदावरची शेती

गेले ५ दिवस मला ब्लॉग लिहिता आला नाही... कारण? तेच, पी सी बंद मग तीच नेहमीची धावपळ पी सी सुरु करण्याची.

बाकी मेल आणि सोशल नेटवर्किंग आपण मोबाइलवर पण चेक करू शकतो पण ब्लॉग लिहिणे अवघडच. बांदावरची शेती हा वाक्प्रचार अशा स्तिथित चांगलाच लागु होतो.

गेले ५ दिवस बांदावरची शेतीच करतोय, पण खर सांगू... बिल्कुलच मज्जा नाही शेतीतच खरी मजा. माजे असे बरेच मित्र आहेत जे क्रिएटिव आहेत पण त्यांची क्रिएटिविटी बांदावरच अडकलीये.

त्यांनी खाली उतराव हिच इच्छा......      

  

Sunday, 26 January 2014

प्रजासत्ता

आज २६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस. भारतातील नागरिकांना या दिवशी राज्यघटना मंजूर करुन खरया अर्थाने लोकशाहीचा मार्ग मोकळा करण्यात आला.

पण ६५ वर्षात लोकशाहीतुन भारतीय जनतेला कितपत फायदा झाला ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हुकुमशाही किंवा राजेशाही पद्धतीत एकाधिकार सर्व मान्य असतो परंतु लोकशाहीत जनतेच राज्य असत असे म्हणतात, पण यात कितपत तथ्य आहे?

अर्थात लोकशाही निर्विवादपणे सर्वात जास्त न्याय्य पद्धति आहे. पण तेव्हा, जेव्हा ती चालवणारे वैयक्तिक आकांशा आणि स्वार्थ बाजुला सारून जनतेच्या हिताला प्राधान्य देतील तेव्हा. जर जनतेलाच नजरअंदाज केल तर ती फक्त लोकशाहीच्या बुरख्या आडची हुकुमशाही ठरू शकते.

दुर्दैवाने भारतात लोकशाही नामधारी होण्याच्या वाटेवर आहे कारण भ्रष्ट लोकप्रतिनिधींचा सुकाळ आहे. जर आपण मतदार या नात्याने सदविवेकबुद्धीचा वापर करुन फक्त  योग्य उमेदवाराला निवडून दिल तरच आपण आपल्यासाठी खरया अर्थाने लोकशाहीचा मार्ग प्रशस्त करू शकू.  जय हिन्द!      

Saturday, 25 January 2014

बदली नको बदल हवा....

श्रीकर परदेशी यांच्या बदलीसाठी सध्या लोकप्रतिनिधींकडून जोरदार प्रयत्न चालु आहेत आणि त्यांची बदली सध्या जवळ जवळ निश्चित समजली जात आहे.

बदलीचे कारणही भलतच विचित्र आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत कामावर त्यांच्या तर्फे होणारी आडकाठी साहजिक आहे जर लोकप्रतिनिधींकडूनच अस वर्तन होत असेल आणि त्यांना कुठल्या अधिकारयाचा त्रास(?)होउ लागला तर ते काय नाही करू शकत?

पण इथे मुद्दा आहे जनता जनार्दनचा त्यांच म्हणण काय आहे हे तर जगजाहिर आहे, बर्याच वर्षानंतर त्यांना एक ईमानदार जन अधिकारी (आयुक्त) भेटला आहे आणि त्याच्या सडेतोड निर्णयावर आणि कायदेशीर वागण्यावर जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे. तर इथे त्यांच्या प्रतिनिधींचा(?) खलल बिलकुलच समजण्यासारखा नाही.

आयुक्तांची बदली रद्द होण्यासाठी खरतर आंदोलनाचीही गरज नाही, पण मनमानी कारभाराला सरावलेल्या आणि आपण जनतेचे फक्त प्रतिनिधी आहोत हे विसरलेल्यांना जाग आणून देण्यासाठी कदाचित हे पाउल ही उचलाव लागेल.

आणि अस आंदोलन झालच तर ते तथाकथित लोकप्रतिनिधींसाठी फक्त एक चेतावनी असेल कारण जनतेलाही 'आप' ल हित कशात आहे हे चांगलच समजल आहे.    

Friday, 24 January 2014

अनुवंशिकता

सध्या मता मतांचा गलबला फार वाढला आहे. प्रत्येकाचा एकाच प्रश्नावर वेगवेगळा दृष्टिकोण आढळून येतो. अस म्हणतात माणसावर अनुवंशिकतेचा परिणाम फार असतो, त्यामुळेच कदाचित अस होत असाव.

तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेत याचा उल्लेख अतिशय सुरेख शब्दात एका अभंगातून केला आहे;

पहा हो देवा कैसे जन। भिन्न भिन्नसंचिते।।१ ।।
एक नाही एका ऐसे। दावी कैसे शुद्ध हीन ।।२।।
पंचभूते एका राशी। सुत्रे कैसी ओळखावी ।।३ ।।
तुका म्हणे जो जे जाती। त्याची स्तिथी तैशी ते ।।४ ।।

वरील  अभंगातून आणखी एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीही माणसाची वृत्ति आजच्याहुन काही विशेष भिन्न नव्हती.पांडुरंग हरी.… पांडुरंग हरी..

Thursday, 23 January 2014

कायद्याच बोला

दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना हटवण्याची मागणी सध्या विरोधी पक्ष आणि मीडिया कडून जोरावर आहे, कारण १५ जानेवारी रोजी त्यांनी जमावाला बरोबर घेऊन दिल्लीस्थित युगांडाच्या मुलनिवासी महिलेच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला.

इथे आरोपात तथ्य आहे अथवा नाही हा भाग अलाहिदा पण मुख्य प्रश्न असा आहे कि त्या महिलेच्या घरावर छापा टाकण्याची गरज का पडली? कारण ती महिला ड्रग रैकेट चालवत होती आणि हे भारतातील उघड़ सत्य आहे कि अफ्रीकी देशातून आलेले नागरिक अथवा विद्यार्थी सम्भवतः ड्रग्स डीलिंग मधे सक्रिय आहेत.

मग प्रार्थमिकतेचा रोख सोमनाथ भारती नसून ती महिला हवी. तिच्याकडे ड्रग्स सापडले असतील तर तिच्यावर कारवाई व्हायला हवी. असल्या वर- वर च्या वादात स्कूप शोधण्यापेक्षा मीडिया ने मुळ मुद्द्याला हात घालायला हवा कारण देशाची मुळ समस्या करवाईचे स्वरुप नसून कारवाईस दिरंगाई हा आहे.

राहता राहिला प्रश्न महिला आयोगाचा, त्यांनीही आपण कोणाचा स्टॅंड घेत आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे एका अबला आणि निराधार महिलेची बाजू घेणे वेगळ तसेच परदेशातील बेकायदेशीर घडामोडीत लिप्त महिलेची बाजु घेण वेगळ हे त्यांना समजायला हव फ़क्त ती महिला आहे म्हणून.... या मुद्द्याला अर्थ राहत नाही.

तसेच गोव्यात बेकायदेशीर रित्या राहणारया अफ्रीकी निवासींवर कारवाईचा बडगा उगरताच त्यांनी केलेल्या दंगलींचे उदाहरणही ताजेच आहे. तेंव्हा 'आप' ल्यातीलच एका ईमानदार व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा परदेशातील गुन्हेगारांवर (महिला असली तरी) कारवाई करण केव्हाही श्रेयस्कर.

Wednesday, 22 January 2014

आंदोलनात गैर काय?

'आम आदमी पार्टी' सध्या चौफेर टिकेचे धनी होत आहेत, पण ही टिका किती वास्तविकतेला धरुन आहे याचा विचार होने आवश्यक आहे.

दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने ती केंद्र सरकारच्या अधीन आहे. न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असे पोलिस खातेही त्यांच्याच अधीन आहे. परंतु यातून एक नुकसान देह गोष्ट पुढे येत आहे ती म्हणजे पोलिस यंत्रणेची अरेरावी.

जर पोलिस यंत्रणा आजपर्यंत केंद्र सरकारच्या अधीन होती तर त्यांना दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीवर चाप का बसवता आला नाही? आणि आज जेव्हा आप सरकार दिल्लीत स्थापन झाले आहे तर त्यांना पोलिस यंत्रणेकडून योग्य सहाय्य का होत नाही?

जर राजधानीत कोणताही गुन्हा होत असेल तर त्याची अप्रत्याशित जबाबदारी मुख्यमंत्र्यावर येत असेल तर त्याला विवक्षित यंत्रणेवर अधिकार नको? असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचे त्वरित समाधान मिळावे या हेतुने जर आंदोलन होत असेल तर त्यात गैर काय?

उलट आजही जर राजधानीतील मुख्यमंत्र्याला आपल्या अधिकारासाठी आंदोलन कराव लागत असेल तर ते स्वतः किती हतबल आहेत हे दर्शवत......

Tuesday, 21 January 2014

श्रद्धा

खर तर मनुष्याचा  स्वभाव धर्म 'आसरा'(Shelter) शोधण्याचा आहे. सामाजिक प्राणी असल्याने त्याला एकटेपणाच भय वाटत. आपल्याहुन उच्चतम शक्तीला तो शरण जाउन तो तिला आपलेसे करू पाहतो, तिला स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतो. सामूहिकदृष्ट्या 'मूर्तिपूजा' हे त्याच एक उत्तम उदाहरण आहे.

श्रद्धा अखिल मनुष्य जातीच शक्तिस्थान आहे. गोष्टी मना विर्रुद्ध घडत असताही श्रद्धा जगण्याच पुढे जाण्याच धैर्य देते. पुरानातील एकलव्यने एका मातीच्या पुतळ्याला गुरु मानून ग्रहण केलेली अद्भुत धनुर्विद्या हे श्रद्धेचे एक उत्कृष्ट उदहारण आहे.

वास्तविक ती त्याची स्वतःवरीलच श्रद्धा होती परंतु ती त्याने द्रोणाचार्यांच्या पुतळ्यामधे वर्ग केली हाच तो शरणागत भाव. श्रद्धा 'कर्ता' भाव न घेता पुढे चालण्याच बळ देते आणि त्यामुळेच श्रद्धावान व्यक्तीस यश -अपयश पचवण्यास मदत होते.

Monday, 20 January 2014

समर्पण भाव

वैज्ञानिक दृष्टिकोण असलेला मनुष्य श्रद्धेवर कदाचित विश्वास ठेवणार नाही, कारण श्रद्धा म्हणजे जी वस्तु किंवा चैतन्य अस्तित्वात आहे किंवा नाही याबद्दल भौतिक जगात द्विधा असू शकते अशा गोष्टींवर पूर्णपणे विसंबून राहणे किंवा समर्पण करणे.

जिथे वैज्ञानिक दृष्टिकोण आहे तिथे समर्पण बिल्कुलच ग्राह्य धरल जात नाही. कारण ते कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव जाणून घेण्यास उत्सुक असतात आणि त्या गोष्टीच्या अस्तित्वाची खात्री पटल्यावरच ते विश्वास ठेवतात.

जस की एखाद्या आस्तिकच्या दृष्टीने ईश्वर आहे ही श्रद्धा एका नास्तिकाच्या दृष्टीने अंधश्रद्धा ठरते. तस पहायला गेल तर दोघांनीही ईश्वर पाहिला नाही परंतु एकात समर्पण भाव आहे तर दुसर्यात नाही.

Sunday, 19 January 2014

पूर्णातील पूर्ण

माणसाला पूर्णत्वचा हव्यास फार, कोणतही कार्य किंवा गोष्ट जोपर्यंत पूरणत्वस जात नाही तोवर त्याला समाधान लाभत नाही. मग तो त्या कार्यातच अशा प्रकारे अडकतो कि त्या कामातून आनंद घेणच तो विसरुन जातो.

आणि शेवटी जर का ते कार्य पूर्नत्वास गेल नाही तर तो निराश होतो, हतबल होतो, स्वतः ला नाहीतर नशिबाला कोसत राहतो आणि स्वतः च अवमूल्यन करू लागतो. पण तो अनादिकालपासूनच वैश्विक सत्य विसरतो जे हजारो वर्षांपूर्वी वेदात ग्रंथित केल आहे ते म्हणजे सर्व काही पूर्णच आहे.

मग कशाला व्यर्थ चिंता..... कामापेक्षा कामातील आनंद महत्वाचा. कारण शेवटी मुक्कामापेक्षा प्रवासातील मजा काही वेगळीच.

"ते सर्व प्रकारे पूर्ण आहे. हे पूर्ण आहे. कारण त्या पूर्णातुनच पूर्ण उत्पन्न झाले आहे. पूर्णातुन पूर्ण काढून घेतल्यावर पूर्णच शिल्लक राहते."  (वैदिक प्रार्थना )

Saturday, 18 January 2014

स्वयंशासित गर्दी

काल रात्री बोहरा समाजातील धर्मगुरूंच्या अंतिम संस्काराला आलेल्या लोकांमधे अचानक कोलाहल माजून अठरा लोक मृत्यु पावले. 

भारतात घडलेली अशी ही एक मात्र घटना नाही या आधीही काही महिन्यापूर्वीच झारखण्ड भागात एका तीर्थ स्थळावर पुल तुटल्याच्या अफवेने शेकडो लोकांचा बळी घेतला तसेच मांढरदेवी दुर्घटना ही काही विशेष जुनी नाही पण आजतागायत अशा घटना घडतच आहेत.

भारत हा उत्सव प्रिय देश आहे आणि इथे छोट्या मोठ्या उत्सवात गर्दी फार होते, अशा वेळी गर्दिवर नियंत्रण ही सरकारची प्राथमिकता हवी. फक्त गर्दिवर नियंत्रण ठेवणारया भरमसाठ पथकाऐवजी शास्त्र शुद्ध रित्या प्रशिक्षित थोड्याच लोकांचे पथक जास्त कारगर ठरेल. तसेच अशा घटना घडण्यामागील प्रमुख कारण म्हणजे 'अफवा'.... यावर आळा घालणे खरतर अवघड गोष्ट आहे, यासाठी लोकांच्यातच अशा गर्दीच्या ठिकाणी स्वयंशिस्त गरजेची आहे.

कारण गर्दिवर एकवेळ नियंत्रण ठेवता येऊ शकत पण तिला काबूत ठेवणे प्रचंड अवघड आहे यासाठी लोकांनीच अशा गर्दीच्या ठिकाणी अफवेला थारा देऊ नये हा अशा प्रकारच्या घटनेवरील रामबाण उपाय आहे.

Friday, 17 January 2014

भावाचे भुकेले

सर्वोच्च न्यायालयाने शेवटी पंढरपूरच्या विठठल मंदिरातील बडवे आणि उत्पात यांची मध्यस्थी आणि हक्क काढुन घेत सरकारकडे वर्ग केले.

निश्चितच हा एक चांगला संकेत आहे पण परंपरागत बडवे जाऊन त्यांच्या जागी सरकारी बडवे येऊ नये म्हणजे समस्त वारकरयाना खरया अर्थाने विठठल पावेल.

तस पहायला गेल तर ही फार जुनी परंपरा आहे पण  परंपरेचे पाईक म्हणजे आजचे उत्पात आणि बडवे यांनी जर कालानुरूप पाउले उचलली असती तर कदाचित ही वेळ टळु शकली असती.

आपल्या समाजातही असेच राजकीय मध्यस्त आहेत जे जनतेच्या विकास आणि प्रगति रूपी देवाला भेटु देत नाहीत, मंदिरातील बडवे गेलेत आता ह्यांची वेळ आली आहे.

तस पाहिल तर देव आणि जनता हे नेहमीच भावाचे भुकेले असतात यांची जो चांगल्या भावाने सेवा करतो तो खरा भक्त तो खरा नेता.

बोला पुंडलिक वर्दे हरी विठठल..........श्री ज्ञानदेव तुकाराम........   

Thursday, 16 January 2014

ढ-सा-ळ नामे

नामदेव ढसाळ खरतर 'यांच्या' बद्दल काही अधिकाराने मी बोलू शकत नाही पण आदर जरुर करतो अवतरणातील टिंब त्याचा सज्जड पुरावा आहे.

कॉलेज मध्ये असताना 'सामना' त येणारे त्यांचे लेख वाचायचो (प्रयत्न करायचो)विशेष समजायच अस नाही पण कुतूहलाने वाचू जरुर वाटायच.

त्यांची लेखन शैली खुपच वेगळी होती उसन्या बुद्धिमत्तेचा तसुभर अंश नाही आणि वाचकावर प्रभाव पाडण्यासाठीचा सूक्ष्म अहंकारी दर्प.

त्यांची कविताही अशीच अनाकलनीय

त्यांची सनातन दया
'त्यांची सनातन दया फ़ॉकलैंड रोडच्या भडव्याहुन उंच नाही
खरच त्यांनी आपल्यासाठी आभाळात मांडव घातला नाही
बोलून चालून ते सामंतशहा त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश
लादलेल्या पडीबाज आयुष्यात फुटपाथ देखील आपली नाही'
(गोलपीठा, नामदेव ढसाळ )

त्यांच्या जाण्याने काही वेगळ झाल अस वाटत नाही पण एव्हढी जाणीव होते, कोणी तरी 'मोठा माणुस' गेला लोक त्यांना 'विद्रोही' म्हणायचे......

'विद्रोही' हे अवतरण त्यांच्या भोवती आणखी किती शतके राहिल सांगता यायच नाही अगदी त्यांच्या कवितेसारख पण राहिल एव्हढा मात्र खर मराठी साहित्यात आणि जनात.....

Wednesday, 15 January 2014

'आप' ला पाठिंबा.....

'आम आदमी पक्षाने' फ़क्त दिल्लीच जिंकली नाही तर लोकजागृतिही फार मोठ्या प्रमाणावर केली आहे, याचा भरभक्कम पुरावा आजच्या 'सकाळ' वर्त्तमान पत्रात पहिल्याच पानावर आहे.

आतापर्यंत जनतेने उपलब्ध पर्यायातून उमेदवार निवडून दिले पण आता त्यांना भ्रष्टाचार मुक्त यंत्रणेची आवश्यकता भासु लागली आहे. याचा सबळ पुरावा म्हणजे लोकांनी आघाडीचे दोन पक्ष वगळता तीसरा पर्याय म्हनुन 'आप' ला पसंती दिली आहे.

इथे 'आप' च महिमा मंडन करण्याचा प्रयत्न नाही, पण 'आप' मुळे प्रस्थापित राजकीय यंत्रणा आणि मानसिकता यांना धक्का दिला आहे. ज्यामुळे त्यांच्यात एव्हढी तरी जाणीव व्हावी की जर त्यांनी लोकभावनेचा आदर केला नाही तर त्यांच्या राजकीय करकिर्दीचा अंत निश्चित आहे.

Tuesday, 14 January 2014

कलिधर्म

सध्या वादग्रस्त विधानान्चा सुकाल पाहता हिन्दु पुरानातील एक गोष्ट  आठवते जेव्हा कलि काळ आला तेव्हा कलिला विचारण्यात आल, कलियुगात तु लोकांवर कोणत्या शस्त्राने राज्य करशील तेव्हा कलिने एका हातात 'जीभ' घेतली आणि दुसरया हातात 'लिंग' आणि म्हणाला या दोहोंणी. 

आणि आश्चर्यकारक रित्या आज आपण याची सत्यता पाहतोय एक बाजूला मोठ मोठ्या हस्ती यौन उत्पीडनासारख्या  गंभीर गुन्ह्यात अडकल्या आहेत तर दुसरया बाजुला  प्रथेप्रमाणे राजकीय नेत्यांनी जिव्हा नियंत्रण सोडल आहे.

मला आश्चर्य वाटत ते याच की शेकडो वर्षांपूर्वी या हृषिन्ना येणारया काळाची पावले अचुकपणे कशी ओळखता आली? की पुऱानोक्त चार विविध युगात लोकांचे स्वभावधर्मही बदलतात? काही जरी असल तरी आता पुरोगामी म्हणवनार्यांनी सुद्धा कलिधर्माचा अभ्यास करायला हवा.  

 

Monday, 13 January 2014

अजुन लहानच (?)

काल बरयाच  दिवसातून  शाळेतल्या मित्रांनी पिक्चरला जाण्याचा प्लान केला, पण तिकीट बुक केल रात्री पाउने अकराच्या शोच उत्साहाच्या भरात मी सुद्धा येण्याच कबूल केल.

वडिलांना एक कैजुऍ लिटि म्हणून विचारल तर सख्त नकार..... "जायच तर दिवसा जा, एव्हड्या रात्री नाही" पुढे काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता.

मी पुन्हा मित्राला फ़ोन केला आणि माझ तिकीट cancel  करायला सांगितल....... "मी सहा तिकीट बुक केलित, आधी सांगायला काय झाल....... एव्हढया रात्री आणखी कुणाला adjust करणार....... ब्ला.... ब्ला..... ब्ला

तात्पर्य : वडील आणि मित्रांच्या दृष्टीने मी अजुन लहान आहे........

Saturday, 11 January 2014

'आप' ल भविष्य 'आप' ल्या हातात

काल महराष्ट्रातल्या आम आदमी पक्षाच्या (आप) सभासद नोंदणीस प्रारंभ झाला ही मोहिम राबवण्यामागचा मुख्य हेतु हा काही फक्त समर्थन मिळवण्याचा नसुन लोक भावनेचा कल आजमावण्याचा आहे.

बेलाशक 'आम आदमी पक्ष' हा नविन पक्ष असला तरी तो लोक भावनेचा आदर करणारा पक्ष आहे, हे माझ वैयक्तिक मत असल तरी ते दृढ आहे. दोन दिवसांपूर्वी जेव्हा मी आपच्या संघटकांना भेटलो तेंव्हा त्यांनी मला पक्षाच्या स्थापनेमागील मुख्य हेतु सांगितला आणि तो मला पटलाही पण कुठल्याही पक्षाच यश अपयश त्या पक्षाच्या ध्येय धोरणांवर अवलंबून असत म्हणून कोणताही निर्णय घेण्याआधी मी पक्षाच्या वेबसाइट वर भेट दिली.

वेबसाइट वर 'व्हिजन' या टॅब अंतर्गत 'कि अजेंडा आइटम्स' वाचले तेव्हा मला पक्षाची साफ प्रतिमा दिसून आली जी प्रत्यक्षात उतरल्यावर लोकांच कल्याण करेल ते चार 'कि अजेंडा आइटम्स' असे
  1. जन लोकपाल बील 
  2. नकाराधिकार (Right to Reject)
  3. पुनः प्रत्यक्षाधिकार(Right to Recall)
  4. राजनैतिक केंद्रविघटन (Political decentralization)
    जन लोकपाल बील : भ्रष्टाचार विरोधी एक प्रावधान ज्यामधे भ्रष्ट अधिकारयांवर फास्ट ट्रॅक कोर्टात सहा महिन्याच्या आत शिक्षेची तरतुद.

 नकाराधिकार (Right to Reject) :जर मतदानाला उभा राहिलेला कोणताही उमेदवार लायक वाटत नसेल तर मतदान यंत्रावर शेवटी रिजेक्ट ऑल हे बटन असेल.

पुनः प्रत्यक्षाधिकार(Right to Recall) : जर निवडून दिलेला उमेदवार भ्रष्ट निघाला तर सामान्य जनतेला इलेक्शन कमीशन ला तक्रार करुन पुनः निवडणूक घेण्याचा अधिकार असेल त्यासाठी पाच वर्ष थांबन्याची गरज नाही.

 राजनैतिक केंद्रविघटन (Political decentralization) : थोडक्यात सांगायच तर लोकाभिमुख यंत्रणा ज्यामधे कोणत्याही महत्वपूर्ण निर्णयात लोकांचा सहभाग.

(वरील माहिती फारच थोडक्यात सांगितली आहे तरी विस्तारपूर्वक माहितीसाठी aamaadmiparty.org या वेबसाइट ला भेट दया )

वरील मुद्दे आणि पक्षाची धोरणे मला पटली म्हणून मी आज पक्षाचा भाग आहे तुम्हीही होउ शकता.....

सभासद नोंदणीसाठी 
भेट दया aamaadmiparty.org  किंवा
मिस्ड कॉल करा 07798220033

Friday, 10 January 2014

अंताची सुरुवात

प्रत्येक गोष्टीला अंत आहे कारण तीची सुरुवात झाली होती. मग ती चांगली असो वा वाईट तस नसत तर चांगली माणस अमर झाली असती.

रावणाचा अंत झाला तसा राम राज्याचाहि, फरक इतकाच कि रामाच फक्त राज्य गेल पण हजारो वर्षात लोकांच्या मनातुन राम काही गेला नाही.

अंत कितीही कठोर असला तरी तो सर्वांना जाणीव करून देतो कि तुझी इच्छा असो वा नसो तुला थांबाव लागेल, पण तुझा शेवट कसा असेल यावर तुझ यश अवलंबून राहिल.

रावण गेला पण तो राक्षसत्वात निमाला आणि राम ही गेला पण तो देवत्व पावला, फरक अंतात होता आणि यश ही  अंतातच

आजही एका अंताची सुरुवात होतेय आणि येणारया सुरुवातीलाही अंत असेल, पण फरक शेवट कसा होतो हे ठरवेल.......  

Thursday, 9 January 2014

टॅक्स विरहित प्रशासन

सध्या रामदेव बाबांच टॅक्स विरहित प्रशासनिक मॉडेल चांगलच चर्चेत आहे. खरतर त्यांनी डायरेक्ट आणि  इंडायरेक्ट टॅक्सच्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी एक सुचारु आणि सुविहीत संकल्पना मांडली आहे जी नक्कीच प्रशंसनीय आहे.

पण काल एका न्यूज़ चैनलवर यासंदर्भात जेंव्हा चर्चा झडत होत्या तेंव्हा या संकल्पनेच खंडन करण्याकडेच अधिकांश कल होता. तिथे एक अर्थशास्त्री होते, मुख्य संपादक, कर विशेषज्ञ आणि आपले पुण्याचे दिपक करंजीकरही होते ज्यांनी एक वेगळी संकल्पना मांडली होती. या चर्चा सत्रातून फलस्वरूप काही निष्पत्ति तर झाली नाही पण एक सामाज्ञ विचारसरणी पुन्हा जगजाहिर झाली आणि ती म्हणजे प्रोत्साहना ऐवजी टिकेची.

खर तर अशा चर्चासत्रांमधून चर्चा या सकारात्मक असाव्यात तिथे असा टॅक्स लागू होन शक्य आहे कि नाहि यापेक्षा, टॅक्स संदर्भातील मुळ ढाच्यामधे इतक्या वर्षात काही अपवाद वगळता बदल का झाले नाहीत? का टॅक्स सरलीकरण झाल नाही? यासंदर्भात टॅक्स डिपार्टमेंट कडुन काही संशोधन झाल आहे का? इत्यादी मुद्दे उपस्तिथ व्हायला हवेत पण ते झाले नाही.

रामदेव बाबांची टॅक्स विरहित प्रशासनिक संकल्पना तांत्रिकदृष्टया योग्य आहे कि नाही हा भाग अलहिदा, पण त्या संकल्पनेला विचार न करता टाळण हे सुद्धा चुकीचे ठरेल. शेवटी प्रत्येकाला आयुष्य आणि टॅक्स सरळ- साधे-सोपे असावे अस वाटत, जरी ते नसले तरी :)     

Wednesday, 8 January 2014

आर्ट ऑफ़ लिव्हिंग

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ़ लिव्हिंग तर्फे घेण्यात येणारया बेसिक कोर्स चा काही वर्षांपूर्वी मी भाग होतो आणि या ६ दिवसीय कार्यशाळेत सुदर्शन क्रिये बरोबरच सुखी जीवनाच्या पंचसूत्री सांगण्यात आल्या त्याच महत्व त्रिकालबाधीत आहे....

1) विरोधाभास एकमेकांना पूरक आहेत
(सुख- दुःख, रात्र- दिवस, युद्ध- शांतता)

2) परिस्तिथीचा आहे तसा स्वीकार करा
(पाउस आला म्हनुन चीड़-चीड़ करण्यापेक्षा छत्री घेऊन बाहेर पडा, हीच बाब व्यक्तींबाबत ही लागु करा )

3) अहंकार सोडा
(अहंकार तुमच्यातील सुप्त दिव्य गुण व्यक्त करण्यात अडचण निर्माण करतो )

4) क्षमा करा
(ज्याप्रमाणे चुक झाल्यावर आपण स्वतःला क्षमा करतो तसेच इतरांनाही क्षमा करा, लोकांना सुधारण्याची संधी दया )

5) वर्तमानात जगा
(भूतकाळात रमने आणि भविष्याची चिंता करणे या दोन्ही गोष्टी वृथा आहेत म्हणून वर्तमानात जगा आनंदी रहा)  



Tuesday, 7 January 2014

निघंटरत्नाकर दिनचर्या

काहि दिवसांपूर्वी निघंटरत्नाकर हा फार जुना आयुर्वेदिक ग्रंथ वाचनात आला त्यात बरयाच रोग आणि ज्वरांची सम्पूर्ण माहिती आहे

आयुर्वेदामधे मनोवृत्तीचा सम्बन्धही आजाराशी जोडला जातो ज्याला आपण मनो शारीरिक विकार म्हणतो म्हणून माणसाची वृत्ति आणि वर्तन कस असाव याची महितीही  ग्रंथात दिली आहे त्यातीलाच हा थोडासा अंश

निघंटरत्नाकर दिनचर्या

साधु व दृष्ट यांच्याशी मैत्री करावी त्या मधून साधूंशी तर सर्वदा करावीच व संसर्ग उत्त्तमांशी ठेवावा
(साधु म्हणजे सज्जन आपल्यासारखे (?) )

आपल्या घरी आलेल्या अतिथीला विन्मुख पाठवू नये
(न बोलवता आला तरी)

कोणाचाही अपमान करू नये आणि सर्वदा विनययुक्त राहावे
(अमिताभ बच्चन आदर्श रोल मॉडेल )

गुरुजवळ पाय पसरून वेडे वाकडे बसू नये
(आजच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य )

कोणी आपल्यावर अपकार केला असताही आपण त्यावर उपकारच करावे
(वाचून अजीर्ण झाल असेल तर हाजमोला खा )

आपले शत्रु व मित्र आणि आपण कोणाचा द्वेष करतो व अपमान हे हि कोणाजवळ सांगू नये
(आजकल सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात अवघडच पण प्रयत्न जरूर व्हावा )

लोकांचे अंतः करण जाणून जो जसा संतुष्ट होईल तसे वागावे व मी एक सुखी असे मानू नये
( डेल कार्नेजी ची पुस्तके वाचा)

तळटिप : कंसातला मजकुर मुळ ग्रंथातील नाही:)

Monday, 6 January 2014

'इस्रो'

'भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र' (Indian Space Research Organisation) ज्या प्रकारे अंतराष्ट्रीय स्तरावर भारताच नाव उज्वल करत आहे, त्यावरून अस अनुमान निघु शकत की भारताला इतर संयुक्त राष्ट्रे फ़क्त एक प्रगतिशील राष्ट्र म्हणूनच ग्राह्य धरु शकत नाही तर त्यांना जाणीव करुन देतो की भारत अद्यायवत तंत्रज्ञानात   अर्थपुर्ण भूमिकाही बजाऊ शकतो.

डॉक्टर विक्रम साराभाई, ज्यांना आपण भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक मानतो त्यांनी १९६९ साली केलेल्या भाषणात विदीत केल होत की,"आमच्यासाठी ध्येयाप्रती कोणतीही द्विधा अवस्था नाहीये. चंद्र किंवा इतर ग्रहांवरील मोहिमा अथवा मानवी अंतरिक्ष उड्डाण याकरिता आर्थिक दृष्टीने पुढारलेल्या देशांशी स्पर्धा करण्याचा आमचा कोणताही हेतु नाही. पण आम्हाला विश्वास आहे की जर आम्हाला राष्ट्रीय आणि संयुक्त राष्ट्रीय दृष्टया महत्वपूर्ण भूमिका बजवायची असेल, तर आम्हाला काहीच नाही तर दुसरया स्थानावरून  मानवीय आणि सामाजिक अडचणीसाठी आधुनिक तंत्र ज्ञानाचा अंमल करावा लागेल."

२०१३ सालच 'मार्स ऑर्बिट मिशन' आणि आताच्या 'जी एस एल व्ही डी ५' या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर असलेल्या प्रक्षेपकाचे यशस्वी उड्डाण हे दोन अवकाशीय कार्यक्रम डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या भाषणाला पृष्टि देतात तसेच 'मानव जातीच्या सेवेसाठी अवकाश तंत्रज्ञान' या 'इस्रोच्या' बोधवाक्याला ही जागतात. भारताच्या राजकीय उलथा-पालथीत संशोधन प्रकल्पांची अशी स्थिरता आणि प्रगति निश्चितच प्रशंसनीय आहे.

Sunday, 5 January 2014

व्यक्ति केंद्री

सध्या भारतीय राजकारणात पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी दोन व्यक्ति चांगल्याच केंद्रस्थानी आल्या आहेत सांगण्याची आवश्यकता नाही राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यात भर म्हणून मीडिया ने अरविन्द केजरीवाल यांनाही या व्यक्ति केंद्री युद्धात सामिल केल आहे.

भारतीय राजकरणाची आणि पर्यायाने लोकशाहीची ही फार मोठी शोकांतिका आहे, इथे लोक तत्वांऐवजी व्यक्ति पूजतात म्हणूनच इथे आमदारचा मुलगा/मुलगी आमदार होतात, मोठ मोठ्या पक्षांचे वारस संस्थापकांच्या घरातलेच असतात भलेही त्यांना अनुभव असो वा नसो मग लोकशाहीला अर्थच काय?आणि सामान्य लोकांना संधि मिळणार तरी कधी?

इथे राजकीय नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाही आपल्यालाच आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल आपली निष्ठा नेहमीच तत्वांशी असावी व्यक्तीशी नव्हे कारण  व्यक्तिंमधे स्वार्थ आढळतो तत्वांमधे नाही तत्व मग ती भलेही कोणत्या का पक्षाची असेनात उमेदवार निवडतानाही तो कोणाचा यापेक्षा काय आहे याला महत्व देण्यात याव.

वर सांगितल्याप्रमाणे संधी मिळणार नसेल तर आपल्याला ती निर्माण करावी लागेल, का म्हणून आपण आपल्यातल्याच एखादया ईमानदार नेतृत्वाला संधी देऊ नये भलेही मग तो अपक्ष का असेना, मग तो उमेदवार कोणी का असेना, प्रत्यक्षात तुम्हीही... हो, हा ब्लॉग वाचनारे तुम्ही. अलबत राजकरणा ऐवजी समाजकारण करणार असाल तर...

 

Saturday, 4 January 2014

खर जनलोकपाल

कालच्या बातम्यांमधे राजकारण्यांचा हवाई उड्डाण आणि सरकारी निवास स्थांनांवरील वार्षिक खर्च दाखवण्यात आला, आणि तो लाखांच्या घरात होता. एव्हढा खर्च की सामान्य जनतेला अशा जीवनाचा हेवा वाटावा.

प्रत्येक राज्यातील मंत्र्यांच्या खाजगी ताफयांवर आणि त्यांना देण्यात येनारया सुरक्षा यंत्रणेवर ही चर्चा झडल्या पण उपयोग काय अशा चर्चांचा? कारण जोपर्यंत अशा अवास्तव खर्चांवर नियंत्रण ठेवणारी ऑडिट यंत्रणा स्वयंशासित आणि सरकारी नियंत्रणाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत अशा नियमबाह्य खर्चावर आळा घालणे अवघड आहे.

प्रत्येक व्यक्तीला स्वार्थ आणि अरेरावी पासून दूर ठेवण्यासाठी नियंत्रणाची आवश्यकता असते आणि अस नियंत्रण राज्यकर्त्यांवरही असाव पण ते नाम मात्र असू नये. 'लोकपाल बील' अशा नियंत्रणाची गरज पूर्ण करते पण ते राज्यकर्त्यांच नसून सामान्य जनतेच असाव तरच ते खर जनलोकपाल होईल.

Friday, 3 January 2014

आपली अस्मिता

आपल्या इथे एक मानसिकता सर्रास पहायला मिळते ती म्हणजे 'चलता है'. सिग्नल तोडला चलता है, कचरा पेटीच्या बाहेर फेकला चलता है, रस्त्यावर थुंकला चलता है... ही यादि आणखीही बरीच मोठी आहे पण तूर्तास एवढेच, तो मुख्य मुद्दा नाही.

मुद्दा आहे मानसिकतेचा,या मानसिकतेचे मूळ काय? आणि ती का आहे याचा, माइ-या मते तरी 'अस्मितेचा' अभाव. कदाचित आश्चर्य वाटेल एव्हढया लहान गोष्टीत कसली आली आहे अस्मिता? पण आपण १५ ऑगस्ट दिवशी अस्मितेने भारले असताना 'भारत माझा देश आहे' असे अभिमानाने म्हणतो तीच अस्मिता आपण या लहान-सहान गोष्टीत का दाखवत नाही, जर मी माझ घर स्वच्छ ठेवतो तर मी रस्ता, कचरा पेटी इथे का म्हणून घान करावी हि सुद्धा आपलीच मालमत्ता आहे.…

ही 'अस्मिता' हे 'माझ' पण आपण फक्त बोलुन नाही तर व्यवहारिकतेत उतरवुया आणि आपल्या घरा बरोबरच आपला देशही स्वच्छ ठेउया...

Thursday, 2 January 2014

आप आए बहार आयी...

'आम आदमी पार्टीचा' (आप ) इफेक्ट जाणवेल हे माहित होत पण इतक्या लवकर याची कल्पना नव्हती, आज सकाळच्या बातम्यांमधे याचे परिणाम प्रत्यक्षात पहायला मिळाले.

राजस्थानच्या मुख्यमंत्री सरकारी निवासस्थान नाकारतात तर इकडे छत्तीसगढ चे मंत्री महोदय आपल्या मंत्री गणांना भ्रष्टाचाराशी निपटनयाचे आदेश देत आहेत आणि सर्वात कडी म्हणजे स्वतः कॉंग्रेसचे एक नेते वीज दर कमी केले नाहीत तर स्वतःच्याच पक्षा विरुद्ध आंदोलनाचा इशारा देत आहेत.

एका अर्थी आपच्या इफेक्ट मुळे प्रस्थापितांना खडबडून जाग आली आहे, हा इफेक्ट असाच कायम राहो हिच प्रार्थना... बाकी आम आदमी पार्टीसाठी म्हणावस वाटत 'आप आए बहार आयी...'  

Wednesday, 1 January 2014

कुणी - काय - केल्यावर....

कुणी ,

अपमान केल्यावर- दुसर्यांचा करू नये

पाय खेचल्यावर- प्रोत्साहन द्यावे

शिक्षा दिल्यावर- क्षमा करावी

कपट केल्यास- संधी द्यावी

उद्धट वागल्यास- नम्र राहव

रागावल्यावर - स्मित कराव

रडल्यावर वर - हसवाव

वर सांगितल्याप्रमाणे,

जमल तर - कराव

नाहीतर - जरूर कराव......:)